कोल्हापूर – पुलाची शिरोली येथील रूथ मधाळे- कांबळे यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत पीएचडी पदवीला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे त्यांचा अभ्यासाचा विषय हा प्रदुषित पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. त्यांनी संजय घोडावत विद्यापीठातून पीएच. डी मिळवली आहे. यासाठी त्यांना सहयोगी प्राद्यापक डॉ. पल्लवी भांगे, डॉ. देवेंद्र भांगे, डॉ. प्रविण व्हनगुत्ते, अजित कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल बोलताना सौ. रूथ म्हणाल्या, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका…, पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पुर्ण होईपर्यंत हार मानू नका…याच विश्वासाने कार्यरत राहून डॉ. पल्लवी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली.
डेव्हलपमेंट ऑफ नॉव्हेल फोटोकॅटलायटीक मटेरीयल्स फॉर वॉटर स्पिल्टींग इनव्हायरमेंटल रेमीडीएशन अॅन्ड अॅन्टीमायक्रोबीयल अॅक्टीव्हीटी हा डॉ. रुथ यांचा अभ्यासाचा विषय होता. या संदर्भात त्यांचे दहा शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत तसेच एक पेटंटही त्यांनी मिळविले आहे.
साखर कारखान्याची मळी नदीच्या पाण्यामध्ये सोडली जाते. यामुळे पाणी प्रदुषित होते. याचा परिणाम नदीच्या जैवविविधतेवरही होतो. हे पाणी शुद्ध करण्यासाठी डॉ. मधाळे-कांबळे यांनी पाणी शुद्ध करण्यासाठी सेमीकंडक्टर फोटोकॅटेलिस्ट तयार केले. यामुळे पाणी शुद्ध तर होतेच तसेच त्याचे दुष्परिणामही नाहीत. पाण्यामध्ये घातक असे क्रोमियम असेत. याचा धोका मानवासह अन्य जीवांनाही असतो. पण हे क्रोमियम सुद्धा आपल्याला कसे उपयुक्त ठरेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनची निर्मिती, अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीमायक्रोबियल अॅक्टिव्हीटी यासाठीही डॉ. मधाळे-कांबळे यांनी प्रयत्न केले आहेत.
सौ. रुथ या उद्योजक मुकूंद कांबळे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशात पती मुकुंद, दीर बाबासाहेब कांबळे, सासरे आनंदा कांबळे व माजी सरपंच मिनाक्षी कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा






