fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 22, 2026
Home » उत्तम माणूस बनणे हाच गांधीना समजून घेण्याचा योग्य मार्ग – अजय कांडर
काय चाललयं अवतीभवती

उत्तम माणूस बनणे हाच गांधीना समजून घेण्याचा योग्य मार्ग – अजय कांडर

Poet Ajay Kandar delivering a lecture on understanding Mahatma Gandhi’s philosophy

गांधी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन

राजापूर – गांधी हे केवळ व्यक्तिमत्त्व नाही, तर एक चळवळ आहे. त्यांनी जगाला नैतिकतेचे अधिष्ठान दिले.गांधी नीट समजून घ्यायचे असेल तर आपल्यालाच आधी चांगले माणूस बनावे लागते. गांधींच्या विचाराचा एक रेषीय अर्थ काढू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक विचाराचा अन्वयार्थ लावून त्यानुसारही जगाला समजून घ्यावे लागते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या व्याख्यानात केले.

गांधीतीर्थ स्वच्छ अभियानाच्या निमित्ताने ओणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे ओणी येथे आयोजित करण्यात आलेल्या गांधी व्याख्यानमालेचा शुभारंभ कवी अजय कांडर यांच्या व्याख्यानाने करण्यात आला. यावेळी बोलताना कांडर यांनी हे जग सुंदर बनविण्याची प्रक्रिया जोपर्यंत चालू राहणार आहे,तोपर्यंत गांधी राहणार आहेत कारण जगातलं जे जे सुंदर आहे त्या सगळ्याचा स्वीकार गांधींनी केला होता असेही आग्रहाने सांगितले. ॲड.वासुदेव तुळसणकर हे अध्यक्ष राहिलेल्या या कार्यक्रमाच्यावेळी राजापूर महाविद्यालयाचे प्राचार्य राठोड सरकारी वकील भावचंद्र सुपेकर, कार्यवाह ऍड. गुरुदत्त खानविलकर, शाला समिती अध्यक्ष श्री वागळे, संचालक डॉ. शैलेश शिंदेदेसाई, डॉ. महेंद्र मोहन,मुख्याध्यापक विनोद मिरगुले आदी उपस्थित होते.

कांडर म्हणाले महात्मा गांधी हे त्यांच्या हयातीत आणि मृत्यू पश्चात एक दंतकथा बनून राहिलेले आहेत. महात्मा गांधी ही केवळ एक व्यक्ती नाही, तर जगभरात अहिंसेने आणि निवळ माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या लोकांचे ते प्रेरणास्थान आहेत आणि जीवनदायी ऊर्जा पुरवणारी एक विचार चळवळ बनून राहिले आहेत. विशेष म्हणजे गांधी हत्येनंतरही त्यांच्या विचारांचा परिणामकारक अंश जगाच्या कणाकणात व्यापून राहिल्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा मारण्यात येत आहे. कधी त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून, कधी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंब परिवाराचे चारित्र्यहनन करून, कधी त्यांचे पुतळे उद्ध्वस्त करून, कधी त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा नष्ट करून, कधी त्यांच्यावर जी लाखो पुस्तके लिहिली गेली ती अग्नीच्या भक्ष्यस्थानी टाकून त्यांना संपविण्याचा प्रयत्न सतत केला जात आहे. परंतु त्यांच्या नावाच्या उच्चाराने मनोरुग्ण झालेल्या, सतत उजवीकडे बघण्याच्या नादात डावीकडे बघण्याचा प्रचंड त्रास होणाऱ्या गांधींच्या विरोधकांना काही केल्या गांधींच्या विचारांना नष्ट करता येत नाही. कारण गांधींची जीवनदृष्टी आणि विचारांचा पाया हा “सत्याचा” आहे. त्यामुळे काळ कोणताही असो, आपल्याला ‘अजूनही जिवंत आहे गांधी!’ असेच म्हणावे लागते. महात्मा गांधी हे नाव अहिंसा या तत्त्वाशी कायमचे जोडले गेले. वास्तविक हिंसा न करणे म्हणजे अहिंसा असं समजलं जातं. पण गांधी गांधींच्या अहिंसेचा तेवढ्या पुरताच सीमित विचार करून चालत नाही. हिंसा वाईट असते हे मान्यच आहे, पण गांधी अहिंसेचा अन्वयार्थ शोधताना, हिंसेबरोबरच माणसाची गुलामीही तेवढीच वाईट असते, हे समजून घ्यायला हवे. गांधींनी हिंसेचे आणि गुलामीचे कधीच समर्थन केले नाही. पण प्रसंगी हिंसा करणाऱ्यांच्या विरोधात आपली ताकदही त्यांनी लावली. १९४२ मध्ये हिटलरच्या विरुद्ध ब्रिटनच्या बाजूने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उतरण्यास गांधींची तयारी होती. १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर गांधी नेहरूंच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. जनतेने शस्त्र हातात घ्यावे आणि यश मिळवावे, याला स्वातंत्र्य म्हणता येत नाही हा गांधी विचार होता. त्यामुळे त्यांनी लाखो करोडो भारतीयांच्या हातात शस्त्र देण्याचा विचार कधीच केला नाही. तरीही गांधींचे मोठेपण हे की गांधीजींनी शस्त्राविना या देशाला निर्भय बनवले. आपल्या मृत्यूची ज्यांना ज्यांना भीती वाटत नव्हती ते ते लोक रस्त्यावर उतरण्यास तयार झाले. रस्त्यावर उतरल्यानंतर होणाऱ्या सगळ्या परिणामांना भोगण्याची त्यांची तयारी होती. अशी नि:शस्त्र जनता हा गांधी विचारांचा आवाज होता आणि हेच गांधींचे सर्वात मोठे यश होते.

सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. प्रास्ताविक श्री. वाजंत्री यांनी केले. आभार शुभांगी शिंदेदेसाई यांनी मानले.

Related posts

कामेश्वरी साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार मांडणार महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर मते

शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!