मुंबई कॉलिग –
आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीतील विक्रमी मतदानाने भारतीय मतदार केवळ प्रेक्षक नसून लोकशाहीचा सजग आणि निर्णायक घटक आहे, हे अधोरेखित केले. वाढती मतदानाची टक्केवारी ही जनतेचा लोकशाहीवरील दृढ विश्वास, बदलाची अपेक्षा आणि राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागाची स्पष्ट साक्ष ठरत आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेला देश म्हणून भारताकडे बघितले जाते पण लोकसभा, विधानसभा किंवा महापालिका –नगरपरिषदा- जिल्हा परिषदा निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले असे ऐकायला मिळत नाही. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत साठ- पासष्ट टक्के मतदान झाले तरी राजकीय पक्ष समाधानी दिसतात. मतदान वाढावे व प्रत्येकाने मतदान करावे यासाठी सरकारी पातळीवर पारंपारीक आवाहन केले जाते पण राजकीय पक्ष १०० टक्के मतदानासाठी प्रयत्न करतात असे चित्र दिसत नाही.
नुकत्याच झालेल्या आसाम, केरळ व पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानातून मतदार किती सजग झाला आहे, मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे आणि विक्रमी मतदानाने राजकीय बदलाचे संकेत दिले आहेत, हेच दिसून आले . आसाममधे विधासभेच्या १२६ जागा आहेत, केरळमधे १४० तर पुद्दुचेरीत विधानसभेच्या ३० जागांसाठी मतदान झाले. झालेल्या विक्रमी मतदानाचा लाभ कोणत्या राजकीय पक्षाला आणि कोणाचे नुकसान होणार हे ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
आसाम व केरळ या राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित राज्यात दि. ९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानातून तिथल्या आकडेवारीने देशातील जनतेला सुखद धक्का बसला. आसाममधे ८५ टक्के, केरळमधे ७८ टक्के तर पुद्दुचेरीमधे ९० टक्के मतदान झाले. भारतीय मतदार केवळ एका प्रेक्षकाच्या भूमिकेत नाही तर तो संसदीय लोकशाहीत सक्रीय व निर्णायक भागिदार होऊ इ्छितो हेच विक्रमी मतदानाने दाखवून दिले आहे. लोकशाही प्रक्रियेविषयी मतदारांच्या मनात विश्वास, प्रतिबध्दता आणि अपेक्षा आहेत हेच या मतदानाने दिसून आले.
निवडणुकीत मतदान हे केवळ सत्ता परिवर्तनाचे माध्यम नाही तर मतदारांच्या मनातील सरकार स्थापन व्हावे ही त्यामागची भूमिका आहे. आसाममधे ग्रामीण क्षेत्रापासून शहरी भागापर्यत सर्वत्र मतदारांमधे मोठ्या उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. प्रत्येक निवडणूक ही मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला व विरोधी पक्षाला संधी असते. विक्रमी मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडते यासंबंधी वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.
आसाममधे भाजपाचे सरकार आहे तर केरळ मधे कम्युनिस्ट राजवट आहे. केरळमधील मतदार सुशिक्षित आहे. देशात सर्वात मोठी साक्षरता असलेले राज्य म्हणून केरळची प्रतिमा आहे. केरळमधील मतदान पारंपारिक होते व त्याला वैचारीक आधार असतो. केरळमधील वाढलेली मतदानाची टक्केवारी डाव्या पक्षांना सरकार स्थापनेचा पुन्हा जनादेश देऊ शकेल पण राज्यात भाजपाच्या मतदानाच्या टक्केवारीत किती वाढ होते, याची सर्वच राजकीय पक्षांना मोठी उत्सुकता आहे.
पुद्ददुचेरी हे राज्य छोटे असले तरी तेथे झालेल्या ९० टक्के मतदानाने सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यात लोकसंख्या किती आहे त्यापेक्षा राज्यातील मतदारांचा कल मोठ्या संख्येने कुणाकडे आहे हे पुद्दुचेरीतून बघायला मिळणार आहे. या तिनही राज्यातील मतदानाची टक्केवारी सर्व देशाला प्रेरणादायी आहे.
आसाम, केरळ व पुद्दुचेरी या तिनही राज्यात पुरूष, महिला व युवकांचा मतदानाच्या दिवशी असलेला उत्साह शब्दात सांगता येणार नाही. या तिनही राज्यातील मतदार वेगळे आहेत, तिनही राज्यातील समस्या वेगळ्या आहेत. केरळ- आसाममधील भाषा व संस्कृती वेगळी आहे. पण मतदारांचा दांडगा उत्साह हाच लोकशाहीवरचा विश्वास आहे. महिलांसाठी विविध राज्यात लाडकी बहिण च्या धर्तीवर योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील बहिणींच्या बँक खात्यात आता दरमहा हजार – दोन हजार रूपये थेट जमा होऊ लागले आहेत. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर त्या राज्यातील सरकारे बहिणींच्या खात्यात कल्याणकारी योजनेच्या नावाखाली मोठी रक्कम जमा करण्याची नवी मालिका सुरू झाली. त्याचा परिणाम महिला मतदारांचा उत्साह वाढला आहे व मतदानाची टक्केवारी वाढली आहे. निवडणुकीच्या राजकारणात सत्तेवर जाण्याचा मार्ग हा महिला शक्तिच्या हाती आहे हे सत्ताधारी पक्षांनी विशेषत: भारतीय जनता पक्षाने ओळखले आहे.
विकासकामांपेक्षा लाडकी बहिण योजना निवडणुकीत विजय मिळवून देते तसेच महिला मतदारांची व्होट बँकच विजयाची हमी देते हे नवे समिकरण गेल्या काही वर्षात रूढ झाले आहे. त्याचा परिणाम आसाम, केरळ , पश्चिम बंगाल व तामिळनाडूत किती होणार हे ४ मे रोजी स्पष्ट होईल.
राज्यातील विधानसभा असो की लोकसभा निवडणूक असो, निवडणूक आयोगापुढे मोठे आव्हान असते. निवडणूक आयोगाची परीक्षा असते. यंदा तर मतदार याद्यांच्या सुधारणेवरून देशात मोठे वादंग निर्माण झाले. निवडणूक म्हणजे कडक सुरक्षा. सुरक्षा दलांनानाही मोठे आव्हान असते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शांतता व सुवस्था कायम राखणे हे सर्वात महत्वाचे असते.
इव्हीएमची देखभाल, व्यवस्था, नियोजन हे सर्वात महत्वाचे असते. निवडणूक पूर्ण होईपर्यंत हजारो कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा दले राबत असतात. शिवाय डिजिटल अभियान व सोशल मिडियावरून अहोरात्र चालू असलल्या प्रचाराने मतदार सजग झाला आहे. विक्रम मतदानातून मतदारांची प्रगल्भता व आत्मविश्वास या तीन राज्यात दिसून आली आहे. तेवीस व एकोणतीस एप्रिल रोजी विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या तामिळनाडू ( द्रमुक ) व पश्चिम बंगालमधे ( तृणमूल काँग्रेस ) होणाऱ्या मतदानाच्या वेळी हाच उत्साह दिसेल अशी चिन्हे आहेत.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
