कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू शेतीत येणाऱ्या पिका पाण्याचा घमघमाट आहे. कोरडवाहू शेतीत येणारं दुःख दैन्य त्यांनी आपल्या कवितेत अगदी सहजपणे उलगडून दाखवले आहे. चपखल शब्द रचना करून शेतकऱ्याला होणाऱ्या यातना, वेदना त्यांनी भुईकळा या काव्यसंग्रहात मांडल्या आहेत.
पुष्पराज गावंडे, अकोला
युवा वऱ्हाडी कादंबरीकार, स्तंभ लेखक, कवी
कवी संदीप रामेश्वर साठे, मु. वैरागड पो. उंद्री ता. चिखली जि. बुलढाणा यांचा ‘भुईकळा’ हा पहिलाच काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेतून प्रकाशित झाला आहे. कवी संदीप साठे हे खरोखरच भुईशी म्हणजे जमिनीशी जुळलेले कवी आहेत. त्यांची कविता ही गाव खेड्याशी नातं सांगणारी आहे. तिथल्या ग्राम संस्कृतीचं दर्शन घडवणारी आहे. अशा खेड्यापाड्यात रमणाऱ्या व माय मातीशी इमान राखणाऱ्या या कवीची कविता म्हणजे वऱ्हाडी बोलीचं अनमोल लेणं आहे. त्यांची आष्टाक्षरी रचना खूप गेय आहे. लयबद्ध आहे. शब्द रचना खूप चपखल आहे. त्यांची कविता ही निसर्गाला आर्जवे करणारी आहे. जसे की
दिसे भयान वावरं
भेगाळली भुई सारी !
रानातल्या विठू साठी
यावी पावसाची वारी !
किंवा मग
याव्या सरीवर सरी
द्यावे अंकुराला दान !
धरणीच्या लेकराची
पाण्या ठेव जरा जाण !
अशा साध्या सोप्या भाषेत ते निसर्गाला विनवणी करतात.
कवी संदीप साठे यांची कविता बळी राजाचं दुःख दैन्य आपल्या शब्दात मांडणारी आहे. कविता कुठेही दुर्बोध होताना जाणवत नाही. कुठलाच बडेजाव नाही की किचकट शब्द रचना नाही. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील शब्द कळेतून ते ओघवती कविता साकारताना दिसतात. संदीप साठे हे प्रत्यक्ष शेतावर राबून, काम करून, घाम गाळून पिक घेणारे कष्टाळू शेतकरी आहेत. त्यांचा शेती मातीचा अनुभव हा निढयीच्या घामाचा सुंगध देणारा आहे. त्यामुळे त्यांची कविता ही वास्तव समोर ठेवते व प्रगट होते.
कवितेत कुठलीच गोष्ट कृत्रिम नाही. सर्व काही अगदी नैसर्गिक आहे. कविता करावी म्हणून केलेली नाही तर काही तरी पोटतिडकीने सांगायचे आहे, मांडायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे, या भावनेतून त्यांची कविता जन्माला येते. दुबार पेरणी ते सुगीचे दिवस व मिरगाचा किळा ते बैल पोळा अशी त्यांची कविता शेत शिवाराची चौफेर मांडणी करते. घर आंगणा पासून ते वावरा शिवरा पर्यंत ती मुक्त संचार करताना दिसते.
कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू शेतीत येणाऱ्या पिका पाण्याचा घमघमाट आहे. कोरडवाहू शेतीत येणारं दुःख दैन्य त्यांनी आपल्या कवितेत अगदी सहजपणे उलगडून दाखवले आहे. चपखल शब्द रचना करून शेतकऱ्याला होणाऱ्या यातना, वेदना त्यांनी भुईकळा या काव्यसंग्रहात मांडल्या आहेत. वाचकाला समजावी उमजावी अशा भाषेतून अलिकडे कविता जन्माला येते आहे ही खुपच जमेची बाब आहे. वाचक वर्ग हा अलिकडे खूप दुर्मिळ झाला आहे. टीव्ही व मोबाईलच्या युगात तर तो आणखी कमी झाला आहे. एकीकडे शिक्षणाचा प्रचार प्रसार वाढत असताना, सुशिक्षित वर्ग झपाट्याने वाढत असताना सुद्धा वाचक कमी होत आहे. साहित्य रसिक, अभ्यासू, व्यासंगी वृत्ती कमी होते आहे. ही खूप चिंतेची बाब आहे.
मराठी प्रांतात वाचन संस्कृती हा आधी पासून चिंतेचा विषय आहे. सर्जनशील लेखन करणारा वर्ग वाढत असताना, शिक्षण घेणारांच्या प्रमाणात वृध्दी होत असताना, वाचक मात्र कमी होत आहे, ही खूपच विचित्र घटना आपल्या कडे घडताना दिसते. मराठी साहित्य दर्जेदार निर्माण होते आहे. लेखनाचा पोत सुधारतो आहे तरीही वाचक का रोडावतो आहे ? हे एक न उलगडणारे कोडे आहे. संदीप साठे सारखे ताकदीने लिहिणारे लेखक कवी अगदी खेड्यापाड्यात निर्माण होत आहेत ही खूपच प्रेरणादायी बाब आहे. साहित्य संस्कृती मंडळ त्याची दखल घेत आहे ही त्याहूनही आनंदाची गोष्ट आहे. फक्त वाचकांनी ते वाचनाची तेवढी तसदी घ्यावी असे या निमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते.
इंग्रजी शाळा व इंग्रजी शिक्षण याला जबाबदार आहे असं सांगून मोकळे होता येणार नाही. आपली बोली व आपली मातृभाषा ही एक नाळ जोडणारी विलक्षण बाब आहे. आपली माय ही आपली खूप मोठी कमाई आहे. तो आपला एक अनमोल ठेवा आहे. त्याला असं अडगळीत टाकून चालणार नाही हेही तितकेच खरे आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी खूप प्रयास झाले पाहिजे म्हणजे मग असली भावनिक आवाहनं करायची गरज पडणार नाही हे पण तेवढंच सत्य आहे.
संदीप साठे यांचा काव्यसंग्रह वाचला अन् मातीचा सुगंध मनात दरवळला. शिवार फेरीचा आनंद घर बसल्या मला प्राप्त झाला. त्यांच्या शब्दांची किमया इतकी मोठी आहे की ते अख्खा गाव शिवार आपल्या समोर कवितेच्या माध्यमातून हुबेहूब निर्माण करतात. एकेक शब्द त्यांचा मनावर खोल घाव करतो. शेतकऱ्यांची अवस्था सांगून जातो. भाराभर शब्द मांडून कविता निर्माण करणे, हा त्यांचा छंद नाही. ते मोजक्या व नेमक्या शब्दात आपली शेतकरी व्यथा मांडतात अन् शेतकरी कसा जगतो, कसा सोसतो ते बखान करतात. भुईकळा हा भुईच्या व शेतकऱ्यांच्या सुखदुःखाच्या खरा सातबारा आहे. यात कुठेही कल्पनाविलास नाही. शब्दांचा फाफटपसारा नाही. की काल्पनिक प्रेम प्रसंगाची फालतू रेलचेल नाही. जे आहे ते खरं अन् वास्तव आहे.
बरेच लोक प्रेम कविता काल्पनिक पध्दतीने रचून, मानाचे मनोरे निर्माण करतात. उगाच निरर्थक शब्दांची उधळण करत कविता तयार करतात. असे लोक कवितेचं नुकसान करतात अन् कवीला बदनाम करण्याचं काम करतात. कवींची मान प्रतिष्ठा कमी होईल व मराठी साहित्याचा दर्जा खालावेल असं काही होऊ नये याची पण आपण काळजी घ्यायला हवी.
मराठी साहित्यात कवितेचं दालन हे सर्वात समृद्ध व श्रीमंत दालन आहे. केशवसुत, बहिणाबाई, बालकवी, कुसुमाग्रज, ग्रेस ते अगदी आमचे व-हाडी मायबोलीचे डॉ विठ्ठल वाघ सर पर्यंत सर्वांनी माय मराठीत कवितेला भरभरून दिलं, ओसंडून दिलं आहे. त्यात आपला खारीचा वाटा घेऊन कवी संदीप साठे उतरले आहेत. त्यांचं स्वागत मराठीचे रसिक व समिक्षक नक्कीच करतील.
पुस्तकाचे नाव – भुईकळा कविता संग्रह
कवी – संदीप रामेश्वर साठे, वैरागड
प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई
पुस्तकासाठी संपर्क – 9922514856
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
