जंगली केळी (कवदर)
‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची भाजी, जंगली केळी (कवदर)…
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
शास्त्रीय नाव : Ensete superbum
स्थाननक नाव : रान केळी, चवेणी
डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये आपल्याला केळीपेक्षा लहान आकाराची, केळीसारखी दिसणारी झाडे दिसतात. त्यांना रानकेळी म्हणतात. आदिवासी लोक यांना ‘कवदर’ असेही म्हणतात. ही रानकेळी जंगलामध्ये, अडचणीच्या ठिकाणी तसेच खडकांच्या कपारीत, दऱ्यांमध्ये उगवतात.
रानकेळी सामान्य केळीप्रमाणेच असतात. त्यांची फळे केळीपेक्षा लहान आणि पिवळ्या रंगाची असतात. या रानकेळीमध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. या बिया आपल्या शेतात बांधावर टाकल्यास रानकेळी सहज उगवतात.
औषधी उपयोग : शरीरातील खनिज वाढविणे, मासिक रक्तस्त्राव कमी करणे व हृदय रोग यात उपयोगी
रानकेळीच्या फळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. ताप, खोकला, ब्राँकायटिस, आव (अमाश), संसर्ग, लैंगिक संक्रमित संक्रमण (एसटीआय) आणि काही असंक्रमित रोगांवर त्या उपयुक्त ठरतात. आपली प्रतिकारशक्ती वाढते. गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात. मासिक पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्राव आणि मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी त्या उपयोगी आहेत. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही त्या मदत करतात.
पाककृती :
- सर्वात पहिले केळफुलाची सालपट/ आवरण काढून त्या मधील फुलं काढणे .
हे करत असताना हाताला तेल लावावे कारण केळफुलात चीक असतो. हे चीक हाताला लागून हात काळे पडू शकतात. केळफूल साफ करणे महत्वाचे आहे. फुल साफ झाली कि ते कापून मिठाच्या पाण्यात 2 तास ठेवावे. - एका पॅन मध्ये साफ केलेली केळफूल टाकावी आणि त्यात मीठ आणि हळद टाकून मंद आचेवर 5-7 मिनिटे वाफवून घ्यावी.
- शिजलेली भाजी एका प्लेट मध्ये काढून घ्यावी.
- कढईत 2 चमचे तेल टाकावे आणि त्या मध्ये आला – लसूण-मिरची पेस्ट, हिंग, जीरा टाकावे
त्या नंतर कांदा आणि टोमॅटो टाकून शिजवून घ्यावे.
त्यात नंतर हळद, लाल मिरची, गरम मसाला आणि कोथिंबीर टाकावी आणि मिक्स करून घ्यावे. त्यात वाफवलेली भाजी टाकावी.
त्यात चावी प्रमाणे मीठ आणि किसलेला खोबरं घालावे. मंद आचेवर्ती 5 मिनिटे झाकून भाजी शिजवून घ्यावी. किसलेला खोबरं आणि कोथिंबीर ने गार्निश करावा.
