रानभाज्यांच्या जगात
काही फळं, फुलं वर्षभर मिळत असतात तर काही भाज्या का वर्षातून एकदाच मिळत असतात. कोणी त्याचा आहारात समावेश करतात तर कोणी त्याकडे ढुंकूनही बघत नाही. म्हणून आजकाल बिनखताचे आणि कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी न केलेल्या वनस्पतींचा आहारात समावेश होत नसल्याने आजारात वाढ होत आहे, ही आजची वास्तविकता आहे. म्हणून जाणकार माणसं नेहमीच सांगत असतात की, वर्षातून एकदा तरी रानातील भाज्या आवर्जून खाल्ले पाहिजे जेणेकरून आरोग्य सुदृढ राहील व निरोगी आयुष्य जगता येईल.
संगीता ठलाल
मोबाईल – ७८२१८१६४८५
आज अशाच कंदमुळांची, तृणभाज्यांची रानभाज्यांची गावरान भाज्यांची, रानफळांची तसेच रानफुलांची गरज आहे. एक रानातील बहुगुणी असलेलं कंदमुळं आहे ज्याता झाडीबोलीत कडूकांदा या नावाने ओळखले जाते. मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यावर हा कडूकंद जंगलात, शेतातील उंच पारावर किंवा रस्त्याच्या कडेला तसेच पठारी जागेत उगवतो. जुलै तसेच ऑगस्ट या महिन्यात त्याला खोदून आणले जाते. जसजसे याचे वेल लांब जातात आणि पानं मोठे होतात तसं तो कंद वाढतो. त्याच्यावर बारीक सुतासारख्या लांब मिशा असतात. याची पानं हृदयाच्या आकाराचे असतात. हा कंद फार गरम असतो. हा कडूकांदा खाल्ल्याने अंगात असलेला हड्डी ताप कायमचा निघतो.
कोणत्याही वयोगटातील लोकांना तो फायदेशीर आहे. लहान मुलं गोड वस्तू जास्त खात असल्याने त्यांच्या पोटातील विकार दूर होतात. त्याला उकडून घेण्याची पध्दत फार सोपी आहे. आधी त्या कंदाला खोदून आणल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर त्यावर असलेल्या बारीक सुतासारख्या मिशा काढतात. मोठं कंद असल्यास त्याच्या चकत्या करतात व लहान कांदा असेल तर त्याला तसंच शिजवतात. मातीच्या भांड्यात किंवा जर्मनच्या भांड्यात दोन तांबे पाणी घालून त्यात चिमूटभर मीठ टाकतात. कडूकांदा अतिशय कडू असल्याने त्याचा कडूपणा निघण्यासाठी एक वाटी सुकलेली मोहफुलं स्वच्छ पाण्याने धुवून त्यात टाकतात. नंतर त्यावर झाकण ठेवून पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवतात. पाणी आटल्यानंतर ते कंदमुळे आणि कडूकांदे चाळणीत काढून घेतले जायचे नंतर शिजलेले मोहफुलं बाजूला सारून घेतले जाते. ते शिजलेले मोहफुलं फेकण्याऐवजी बैल, शेळ्यांना खाऊ घातले जाते. नंतर शिजलेल्या कडूकांद्यावरचे साल काढून खातात. त्यात जास्त कडूपणा राहत नाही कारण, सुकलेल्या मोहफुलांचा रस त्याच्यात मिसळलेला असतो. गावखेड्यातील लोक आजही हा कडूकांदा मोठ्या आवडीने खातात आणि वर्षातून एकदा निघणाऱ्या या कंदाला आवर्जून खाण्याचा सल्ला देतात.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
