मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह. वैयक्तिक वेदना, सामाजिक जाणिवा आणि स्त्रीशक्तीचा ठाम स्वर यांची सांगड घालत, हा संग्रह वाचकाला अंतर्मुख करत आशावादाची नवी दिशा दाखवतो.
सुरेखा चिखलकर, सांगली
कवयित्री मो. 8806913315
गुंता’ ही गोष्टच अशी आहे की ती समोर आली की मन अस्वस्थ व्हायला लागतं. मग तो गुंता दोऱ्याचा असो किंवा विचारांचा, तो सोडवण्याची एक उपजत ओढ माणसाला असते. गुंता कधीच सांगून येत नाही. नात्यांमध्ये तो शब्दांच्या चुकीच्या अर्थामुळे होतो, तर प्रश्नांमध्ये तो परिस्थितीच्या रेट्यामुळे. गुंता झालाय हे लक्षात येईपर्यंत आपण त्यात बरेच खोलवर अडकलेले असतो. आयुष्य जर अगदी सरळ रेषेत असतं, तर त्यात काहीच शिकण्यासारखं उरलं नसतं. गुंता आपल्याला लवचिकता शिकवतो. तो सोडवताना जो त्रास होतो, तो खरं तर बदलाचा किंवा प्रगतीचा एक भाग असतो. प्रत्येक वेळी गुंता सुटेलच आणि यश येईलच असं नाही. कधीकधी आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करून थकून जातो. एक तर आपल्याला स्वतःच्या सहनशक्तीची जाणीव होते. दुसरं म्हणजे, भविष्यात असे नवीन ‘गुंते’ कसे टाळायचे, याची समज येते. आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही ‘गुंता’ येतोच. हा गुंता कधी नात्यांचा असतो, कधी संघर्षाचा, तर कधी आठवणींचा. पण या गुंत्यातून सुटण्यापेक्षा तो शब्दांत गुंफून त्याचा अर्थ शोधणं जास्त महत्त्वाचं असतं.
कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह नेमकी हीच भूमिका पार पाडताना दिसतो. काळे यांची ही साहित्यसेवा ‘सहज’ घडलेली नाही, तर ती एका मोठ्या संघर्षातून आणि जिद्दीतून आकाराला आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि लग्नानंतर पुण्यात स्थिरावलेल्या कविताजींच्या आयुष्यातील ‘अर्चना’ ते ‘कविता’ हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या जन्मकथेपासूनच संघर्षाने त्यांची साथ सोडली नाही, पण साहित्याची ओढ इतकी प्रबळ होती की, मृत्यूच्या दारातून परत आल्यावरही त्यांची लेखणी थांबली नाही. हॉस्पिटलच्या बेडवर असताना किंवा अगदी वर्तमानपत्राच्या तुकड्यावर उमटलेल्या त्यांच्या पहिल्या चार ओळी हीच त्यांच्या काव्यप्रवासाची खरी नांदी होती.आपण म्हणतो की, “साहित्य हे समाजाचा आरसा असते,” आणि त्यांच्या कविता वाचताना हे प्रकर्षाने जाणवते. अतिशय साध्या, सरळ व्यक्तिमत्त्वाच्या या कवयित्रीकडे उपजतच मोठी बुद्धिमत्ता लाभलेली आहे. त्यांच्या कवितांमधून निसर्ग, सामाजिक जाणिवा आणि वैयक्तिक अनुभव यांचा एक सुंदर कोलाज उभा राहतो. त्यांच्या शब्दांना एक ‘धार’ आहे, पण त्यात कोणाविषयी द्वेष नाही, तर परिस्थिती मांडण्याची एक प्रांजळ ओढ आहे.
गुंता’ या संग्रहात कविता काळे यांच्यातील ‘गझलकार’ विशेषत्वाने समोर येतो. गझल हा प्रकार अत्यंत शिस्तबद्ध आणि संवेदनक्षम असतो. त्यांनी या प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या गझलांमधील ‘शेर’ वाचकाला अंतर्मुख करायला लावतात. जीवनातील दु:खाच्या वाटा सरताना सुखाचा क्षण शोधणारी त्यांची वृत्ती त्यांच्या साहित्यातून प्रकट होते.
”दु:खाच्या या वाटा सारुणी क्षण सुखाचे आले,
गुंता हाती देत रसिका, आनंदून मन गेले…”
विविध साहित्य चळवळींशी जोडल्या गेल्यामुळे त्यांच्या लिखाणाला एक परिपक्वता आली आहे. “सावित्रीची लेक” म्हणून त्या ज्या आत्मविश्वासाने आपली मते मांडतात, ती आजच्या काळातील स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहेत. गरिबी, मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तरीही साहित्याप्रती असलेली निष्ठा हे या पुस्तकाचे शक्तिस्थान आहे.कविता वाचल्यानंतर त्यांच्या लेखणीची ताकद आणि खोली अधिक स्पष्ट होते. विशेषतः ‘जखम’ आणि ‘गुंता’ या दोन कविता एकमेकींच्या अगदी विरुद्ध पण तितक्याच प्रभावी भावना व्यक्त करतात. कविता केवळ रडगाणे गात नाही, तर ती संघर्षाची मशाल हाती घेते.
”होते अहिल्या सावित्री, मीच जिजाऊ रमाई,
माझ्या जखमेची आता, मीच होते स्वतः आई.”
या ओळींमधून त्या स्त्रीशक्तीचा आणि आत्मसन्मानाचा जो हुंकार देतात, तो वाचकाला स्तिमित करतो. स्वतःच्या दु:खावर स्वतःच फुंकर घालत उभं राहण्याची ही जिद्द त्यांच्या साहित्याला एक वेगळीच उंची देते.पुस्तकाच्या शीर्षक कवितेत, म्हणजेच ‘गुंता’ मध्ये, मानवी मनाच्या गुंतागुंतीचे अतिशय सुंदर चित्रण आढळते. आठवणींच्या शीतल झुळकेपासून ते मनाच्या सागरात उसळणाऱ्या लाटांपर्यंतचा प्रवास त्यांनी शब्दबद्ध केला आहे. आयुष्याचा गुंता सुटण्यापेक्षा, तो कुठेतरी शांतपणे विसावावा, ही त्यांची ओढ वाचकाच्या काळजाला स्पर्श करते.
“कुठेतरी थांबवावंच लागतं त्याला,
जिथे मनाला शांतता मिळेल अशा जागी…”
आयुष्यातील लख्ख ताऱ्याच्या प्रकाशात हा गुंता सुटेल, ही आशा त्यांच्यातील सकारात्मक कवयित्रीचे दर्शन घडवते.गुंता’ हा काव्यसंग्रह वाचताना आपण एका अशा प्रवासाला निघतो, जिथे दुःख आहे पण निराशा नाही, संघर्ष आहे पण हार मानण्याची वृत्ती नाही. सामाजिक प्रश्नांपासून ते वैयक्तिक भावविश्वापर्यंतचा हा प्रवास वाचकाला अंतर्मुख करतो. एका सामान्य कुटुंबातील स्त्री जेव्हा आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि प्रतिभेच्या जोरावर असा कसदार शब्दसंग्रह उभा करते, तेव्हा ते केवळ त्यांचे यश नसून, संपूर्ण मराठी साहित्यासाठी एक अभिमानाची गोष्ट ठरते.त्या केवळ बाह्य संघर्षावर लिहीत नाहीत, तर मानवी मनाच्या अंतर्भागात चालणाऱ्या द्वंद्वाचाही त्या वेध घेतात. ‘अंतर’ ही कविता याचे उत्तम उदाहरण आहे. नात्यांमध्ये आलेले अंतर, मग ते विचारांचे असो वा भावनेचे, त्यांनी अत्यंत तरलतेने मांडले आहे. या संग्रहात केवळ हळवेपणा नाही, तर अन्यायाविरुद्धचा एक सुप्त ज्वालामुखीही आहे. ‘सावित्री… तू पुन्हा जन्म घे’ ही कविता आजच्या काळातील दांभिकतेवर आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर धारदार प्रहार करते.
“हातात लेखणीचे धारदार शस्त्र धरून दांभिकतेवर प्रहार करत…” असे म्हणणारी कवयिती जेव्हा स्त्री-शक्तीचा जागर करतात, तेव्हा त्या एका आधुनिक सावित्रीच्या भूमिकेत दिसतात. ‘खैरलांजी’पासून ते गर्भात होणाऱ्या स्त्री-भ्रूणहत्येपर्यंतचे विषय त्या अत्यंत प्रभावीपणे मांडतात. कविता काळे यांची गझल विषयाची मांडणी आणि वृत्ताची जाण वाखाणण्याजोगी आहे. साध्या शब्दांतून खोलवर अर्थ व्यक्त करण्याची त्यांची शैली त्यांना एक ‘उत्तम गझलकार’ म्हणून सिद्ध करते. त्यांच्या रचनांमध्ये केवळ यमक-अनुप्रास नसून, त्यामागे एक ठोस विचार आणि सामाजिक बांधीलकी आहे.त्याच्या लेक,मैत्री, माय,भीमराया,सावली,श्रावण, शेणा मातीचा सुगंध ,आई, शिवराय, सिंधुताई , रमाई या कविता ही मनाला स्पर्शून जातात. त्यांच्या सर्वच कविता आपल्याला एका उंचीवर आणून ठेवतात.गुंता’ हा काव्यसंग्रह म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून तो एका प्रगल्भ स्त्रीच्या अस्तित्वाचा हुंकार आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून येऊन, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर साहित्यात आपले स्थान निर्माण करणाऱ्या कविता काळे यांचे हे यश कौतुकास्पद आहे. एक आई,एक मैत्रीण आणि मुळात एक माणूस म्हणून आपल्या सर्व जबाबदाऱ्या ती निभावते याचे नक्कीच कौतुक वाटते.ज्यांना जीवनातील क्लिष्ट भावना आणि सामाजिक वास्तव सोप्या भाषेत अनुभवायचे आहे, त्यांनी हा संग्रह वाचायलाच हवा. सकस शब्दकळा, प्रभावी गझल रचना आणि सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या या ‘गुंता’ संग्रहाचे स्वागत रसिक प्रेक्षक नक्कीच करतील, यात शंका नाही.
काव्यसंग्रह – गुंता
कवयित्री – सौ. कविता काळे, मोबाईल नंबर – 7507736519
प्रकाशन – भक्ती प्रकाशन, मिरज. मोबाईल नंबर – 9665722838
पृष्ठे – 112
किंमत – 175 रुपये
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
