April 27, 2026
डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘काळीजकळा’ ही ग्रामीण जीवनातील संघर्ष, भावनिक गुंतवणूक आणि माणुसकी हरवत चाललेल्या नात्यांचं वास्तव मांडणारी हृदयस्पर्शी कादंबरी आहे.
Home » सर्वसामान्यांच्या घरातलं वास्तव कथानक – ‘काळीजकळा’
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सर्वसामान्यांच्या घरातलं वास्तव कथानक – ‘काळीजकळा’

डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात लिहावे वाटले.

प्रा. भास्कर बंगाळे, पंढरपूर
मो. ९८५०३७७४८१


डॉ. श्रीकांत पाटील हे मराठी साहित्यातील अनेक साहित्य प्रकार हाताळलेले सर्व परिचित साहित्यिक व्यक्तिमत्व. विशेषतः वर्तमानात मानवाकडून होत असलेले निसर्ग आणि सामाजिक वर्तन याचे चित्रण करणारे आणि वाचकाला अंतर्मुख करून योग्य दिशेने कार्यप्रवृत्त करणारे, समाजाला योग्य दिशा देणारे साहित्यिक म्हणायला हरकत नाही. त्यांनी कादंबऱ्यातून सामाजिक ज्वलंत प्रश्न मांडले असून त्यावर उपायही सुचवले आहेत.

मानवावर येणाऱ्या अवर्षण (दुष्काळ), अतिवृष्टी, महापूर, त्सुनामी, भूकंप…. अशा संकटांना केवळ निसर्गच जबाबदार नसून माणसाच्या नदीकाठची झाडे, जंगल व इतरत्र असलेली झाडे तोडणे, डोंगर पोखरणे, फोडणे…. अशा कृतीही तितक्याच जबाबदार असतात. कोरोनाविषयीची ‘लॉकडाऊन’, सामान्य शेतकरी आणि मजूर यांच्या समस्यांवरची ‘ऊसकोंडी’, नदीला आलेल्या महापुरामुळे लोकांचे होणारे हाल, त्यांची दयनीय अवस्था ‘पाणीफेरा’ आणि इमारती व रस्ते बांधकामासाठी डोंगर फोडल्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या याचे चित्र म्हणजे ‘कडेलूट’ ही कादंबरी आहे.

डॉ. श्रीकांत पाटील हे नेहमी ज्वलंत प्रश्नांना हात घालतात. त्यांची पाचवी प्रकाशित झालेली ‘काळीजकळा’ ही एक ‘उत्कृष्ट’ कादंबरी आहे. मी ‘उत्कृष्ट’ यासाठी म्हणतो की या कादंबरीचे कथानक, घटना, प्रसंग प्रत्येक गावात, प्रत्येक घरात घडत असताना दिसतात. यातील साधीभोळी माणसं, स्वार्थी, अहंकारी, बेरकी, बेगडी, मुखवटाधारी माणसं आपणास पावलोपावली भेटतात, सभोवती वावरताना दिसतात. त्यांचे नातेसंबंध, उलाढाली, दैनंदिन व्यवहार…. थोडक्यात चालू जमान्याचे प्रतिबिंब या कादंबरीत उमटले आहे.

रामा व हौसा यांचे गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंब. त्यांना एक मुलगा सुजित, सुषमा आणि अलका या दोन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुली. सुषमा पदवीधर तर अलका बारावीला शिकते आहे. रामाची बहीण शेवंता श्रीमंत पैसेवाली ! तिचा नवरा सुभानराव!गावातले बऱ्यापैकी सधन राजकारणी ! त्यांना दोन मुले उदय आणि संपत व एक मुलगी संगीता विवाहित. त्यापैकी उदयला सुभानरावनी कारखान्यात कामाला लावला आणि एका श्रीमंत घरच्या मुलीशी भरपूर हुंडा, मानपान घेऊन लग्न केले.

संपत याला शेतीतल्या कामासाठी म्हणून शाळेतून काढला. संपतसाठी बरीच स्थळे पाहिली पण त्याला कोणी पसंत करत नाहीत. अलीकडे शेती करणाऱ्या मुलाशी लग्न करायला मुली आणि त्यांचे आई-वडीलही तयार होत नाहीत. त्यांना नोकरीवालाच हवा असतो. तेव्हा भावाच्या घरी कधी न येणारी, श्रीमंतीच्या तोऱ्यात आणि घमेंडीत असलेली शेवंता भाऊ रामाच्या घरी आली. जुने नाते जोडायला. भावाची मुलगी करून माहेरची वाट चालू ठेवायला.

‘एक तर तुझी सुषमा माझ्या संपतला दे, नाहीतर घर आणि जमिनीचा हिस्सा दे’ अशी अट घातली. दोन एकरातली जमीन आणि घर तिने वाटून घेतल्यावर आम्ही खायचे काय आणि राहायचे कोठे? हा रामा व हौसाच्या कुटुंबापुढे प्रश्न पडला. आई-वडिलांच्या इस्टेटीत बहिणीचा हिस्सा असतो असा कायदा असल्याने शेवंता गैरफायदा घेते. सुषमा शिकलेली असून तिचे आई-वडील व कुटुंबावर आलेल्या संकटामुळे संपतसारख्याशी लग्न करायला तयार होते. लग्नाचा खर्च रामाला होऊ देणार नाही असा आधारही द्यायचे शेवंता कबूल करते पण प्रत्यक्षात तसे होत नाही. सुजितने दुबईवरून आणलेले तीन लाख रुपये लग्नासाठी खर्च केले जातात. दोन तोळे सोने, अर्ध्या तोळ्याची अंगठी आणि दारात लग्न करून देण्यात येते.

बारीक-सारीक तपशिलांसह लग्नाचे खूप सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. सुषमा नांदायला सासरी जाते. आई-वडिलांना सारी मुलं सारखीच असतात; पण सुभानराव व शेवंता यांनी थोरल्या उदयला वशिला लावून कारखान्यात नोकरीला लावला. थाटामाटात लग्न केलं. सुषमाची थोरली जाऊ राणी श्रीमंता घरची. तिनं नवरा बैल केलेला. राणी पैसेवाले माहेर असल्याने स्वार्थी, अहंकारी, हट्टी, दुसऱ्याला किंमत न देणारी, एखादी गोष्ट घ्यायची म्हटले की सारखी पिच्छा पुरवणारी, सासू-सासरा सर्वांनाच घालून पाडून बोलणारी, सर्वांना उलट सुलट बोलून मने दुखवत होती. तिची ऐट वेगळीच होती. याउलट सुषमा सुस्वभावी, सर्वांशी प्रेमाने, आदराने वागणारी असूनही घरात तिचा कोंडमारा होत होता. बोलून उपयोग होत नव्हता.

तिच्या नवऱ्याला संपतला मात्र घरात स्थान नव्हतं. तो शेतात राबराब राबायचा. मजुरांकडून काम करून घ्यायचा. ऊस पिकवायचा; पण हातात पैसा नाही. त्याला घरात किंमत नाही. थोरल्याला बंगला बांधून दिला. राणी व उदय बंगल्यात राहू लागले. सुषमा संपत सासू-सासरा सह जुन्या घरात. राणी ऐतखाऊ. कामाचा लोड सुषमावर पडायचा. त्यातून त्यांचे भांडण. उदयला चार चाकी गाडी घेऊन दिली पण संपाला ट्रॅक्टर घेऊन द्यायला नकार दिला. उदयला शहरात फ्लॅट घेऊन दिला पण संपाला जुनं घर दुरुस्त करून द्यायला नकार दिला. त्यात तिची नणंद संगीता वारंवार माहेरी येऊन शक्य असेल तेवढे ओरबाडून घेऊन जायची.

राणी आणि सुषमा या जावाजावामधला संघर्ष खूप सुंदर वर्णन केला आहे. सुषमा शिकलेली होती. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कर्तुत्व सिद्ध करण्याची तिची जिद्द होती; पण तिच्या सर्व इच्छा आकांक्षांची होळी झाली होती. ती आतल्या आत झुरत राहिली. घरातल्या या बाबीमुळे सुषमा चिडचिडी बनली. तिला कॅन्सर झाला. कॅन्सरचे निदान व उपचार व तिचा अंत याचे सविस्तर वर्णन केले आहे. संपतचे दुसरे लग्न लावून दिले जाते. सुषमाच्या दोन लेकरांची हेळसांड होते. पुढे रामा शेत आणि घर विकून शामा या मित्राच्या आश्रयाने कष्ट करत जीवन जगतो. असे हे कथानक.

ही कादंबरी केवळ सुषमा या नायिकेची शोकांतिका नसून सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाची शोकांतिका आहे. जीवनमूल्ये बदलत चाललेल्या ग्रामजीवनाचे, ग्रामसंस्कृतीचे वास्तव चित्रण म्हणजे ‘काळीजकळा’ ही कादंबरी होय.

पूर्वी गावगाड्यात आत्मीयता, जिव्हाळा, माणुसकी होती. राजकारणात स्वार्थीपणा नव्हता. बहीण भावाच्या नात्यात प्रेम होते. जावाजावात सलोखा होता. पण अलीकडं गावं बदलली. सिमेंट काँक्रीटच्या इमारती झाल्या. ट्रॅक्टर आले. दूध डेअरी झाल्या. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका आल्या. मुलं-मुली शिकू लागल्या. पदवीधर होऊ लागल्या. मुलं परदेशात जाऊ लागली पण माणसं माणसापासून तुटत चालली. पैसा आणि भौतिक सुखाच्या मागे धावू लागली. नात्यातल्या माणुसकीपासून दूर चालली. एक वेळ आई-वडिलांना घरातून हाकलून देऊन कुत्रे उशाला घेऊन झोपतील अशी अवस्था निर्माण झाली आहे.

कादंबरीतील रामा, हौसा, सुजित, सुषमा, अलका, शेवंता, सुभानराव, उदय, राणी, संगीता ही मोजकीच पात्रे असली तरी वाचकांच्या हृदयात घर करून राहतात. ती विसरता येत नाहीत. कादंबरीतील संवाद प्रसंगानुरूप, पात्रांच्या मानसिकतेनुसार अगदी समर्पक असे आहेत. साधी सोपी बोलीभाषा आणि संवाद आपल्या सभोवती किंवा आपल्या घरातच चाललेला आहे असे वाटते.

एखादी साहित्यकृती जेव्हा वाचकाला आपलीच आहे असे वाटायला लागते तेव्हा ती सर्वोत्कृष्ट साहित्यकृती असते. प्राचार्य वसंत बिरादार यांनी कादंबरीचे विविध पैलू उलगडून दाखवणारी दीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे तर ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पाठराखण केली आहे. त्यामुळे कादंबरीची उंची अधिकच वाढली आहे. सुषमा ही रामा, हौसा, सुजित, अलका यांचं काळीज होतं. तिच्या मृत्यूने त्यांच्या काळजाला होणाऱ्या वेदना म्हणजे ‘काळीजकळा’. हे कादंबरीचे शीर्षक अतिशय समर्पक असे आहे. ‘काळीजकळा’ वाचल्यानंतर वाचकांच्या काळजात कळा आल्याशिवाय राहत नाहीत इतकी ही प्रभावी कादंबरी झाली आहे.

पुस्तकाचे नाव – ‘काळीजकळा’
लेखक – डॉ. श्रीकांत पाटील
साहित्यप्रकार- कादंबरी
प्रकाशक – रंगतदार प्रकाशन, ठाणे
पृष्ठे – २१६
किंमत ३०० रुपये

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

सबका साथ सबका विकास नव्हे जो हमारे साथ-उसका विकास

भात खाल्ल्याने जाडी वाढते का ? जाणून घ्या…

डबल कोकोनट

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!