fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 9, 2026
Home » अनंता सूर यांच्या कोंडमारा कथासंग्रहाला पथदर्शी साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर
काय चाललयं अवतीभवती

अनंता सूर यांच्या कोंडमारा कथासंग्रहाला पथदर्शी साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर

Marathi writer Ananta Sur receiving recognition for Kondmara story collection Pathdarshi Sahitya Award 2025

अनंता सूर हे विदर्भातील सामाजिक जाणिवांचे महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. वाताहात, भोगवाट, हेळसांड यानंतर आता त्यांचा ‘कोंडमारा’ हा बारा कथा असलेला चौथा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. यातील कथांतून गावगाड्यातील माणसांच्या जीवनसंघर्षाचे सुक्ष्मातीसूक्ष्म निरीक्षण प्रत्ययकारीपणे येताना दिसते.

जागतिकीकरणाच्या रेट्यात ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी सामान्य माणसांना करावा लागणारा संघर्ष ह्या कथा प्रखरतेने चित्रित करतात. भटक्यांच्या समस्यांसोबतच शेतकरी आणि शेतमजुरांच्या जगण्यातील बारकावेही या कथांमधून अगदी सहज शब्दबद्ध झाले आहेत. या कथांतील प्रसंगानुरुप येणाऱ्या संवादातून वैदर्भीय भाषेचा लहेजा ठळकपणे अभिव्यक्त होतो.

ग्रामीण जीवनातील ताणतणाव, बेरोजगारीचा प्रश्न, वृद्धांचे जगणे, कोरोनाने निर्माण केलेल्या समस्या, मानवी जीवनाची क्षणभंगुरता, शेतकऱ्यांच्या निसर्गाशी चाललेला बारमाही संघर्ष, शेतमालाच्या हमीभावाच प्रश्न, सरकारी योजनांचा कमकुवतपणा, भटक्यांची स्वप्न आणि त्यांची होणारी वाताहत, पोलिसांच्या हेकेखोरपणा, स्क्षीकडे पाहण्याचा अमावनी दृष्टिकोन यांसारख्या अनेक सामाजिक समस्यांकडे अनंता सूर यांची कथा जाणिकपूर्वक वाचकांचे लक्ष वेधते.

डॉ. माधव जाधव, नांदेड

नागपूर – पथदर्शी साहित्य संघ विदर्भ प्रांत द्वारा उत्कृष्ट काव्यसंग्रह (गजल) आणि उत्कृष्ट कथासंग्रहासाठी पथदर्शी साहित्य पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. कालकथित बहिणाबाई हरिभाऊ मनवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयु. गजानन हरिभाऊ मनवरे यांचे वतीने उत्कृष्ट कथासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या पथदर्शी साहित्य पुरस्कार २०२५ साठी अनंता सूर यांच्या ‘कोंडमारा’ची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण २१ मार्च २०२६ रोजी वर्धा येथील सार्वजनिक बजाज वाचनालय येथे डॉ. अरविंद पाटील, डॉ. सिद्धार्थ भगत, मार्शल धम्मा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून रोख १०,०००/- सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी साहित्याच्या प्रांतातील हा महत्त्वाचा कथासंग्रह असून या कथासंग्रहाला यापुर्वी वैखरी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (खामगाव), शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (पिंपळगाव जलाल), विठाई स्मृती शिवांजली कथा सन्मान (चाळकवाडी), मसाप शाखेचा निर्मलाताई मठपती कथासंग्रह पुरस्कार (सोलापूर), दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार (चेंबूर), विदर्भ साहित्य संघाच्या वा. कृ. चोरघडे स्मृती कथा पुरस्कार (नागपूर) हे सहा पुरस्कार प्राप्त झालेले असून हा सातवा मानाचा पुरस्कार आहे.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्द्ल डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ.मोना चिमोटे, डॉ. गजानन मुंदे, डॉ. अण्णा वैद्य,’बिराड’कार अशोक पवार, कवी इंद्रजीत भालेराव, डॉ. सुधा मालधुरे, डॉ. संतोष देठे, डॉ. संजय लाटेलवार, डॉ. गजानन घोंगटे, डॉ. पद्माकर तामगाडगे, डॉ. भास्कर बंगाळे, डॉ. अनिल दडमल, डॉ. अशोक इंगळे, डॉ. रुपेश कऱ्हाडे, डॉ. भास्कर पाटील, डॉ. इसादास भडके, डॉ. विद्याधर बनसोड, डॉ. सुहासकुमार बोबडे, नाटककार चुडाराम बल्लारपुरे, डॉ. सतेज दणाणे, संतोष रामगिरवार, सुरेश पेंढरवार, नागोराव कोंम्पलवार, गणेश बुटे, लक्ष्मण काकरवर यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts

मराठी बालकुमार साहित्य सभेतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

खेड चिपळूणात नवरंगाचे दर्शन…

नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न – मोदी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!