स्टेटलाइन
यापुर्वी नगर परिषद, नगर पंचायत अगदी जिल्हा परिषद निवडणुकांमधेही राज्याचे मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एवढ्या हिरीरीने मैदानात उतरलेले कधीच दिसले नाहीत. हर्षवर्धन सकपाळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, विश्वजित कदम, हे नेते राज्यात फिरताना कुठे दिसले नाहीत. ठाकरे ब्रँन्ड ने मुंबईतच राहणे पसंत केले.
डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्रात जवळपास दहा वर्षांनी नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक प्रक्रियेतील गोंधळामुळे २४ नगराध्यक्ष व २०४ नगरसेवकांच्या निवडणुका आयोगाने ऐनवेळी पुढे ढकलल्या. आयोगाच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने संताप व्यक्त करणे समजू शकते पण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नापसंती व्यक्त करतात हे आश्चर्यकारक आहे. निवडणुका पुढे ढकलणे किंवा मतदानाच्या आदल्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराला परवानगी देणे हे दोन्ही निर्णय अनाकलनीय आहेत. हे निर्णय नियमानुसार होते की मनमानी पध्दतीचे होते ? निवडणुकीत साम, दाम , दंडाचा मुक्त वापर झाल्याने निकाल एकतर्फी लागले तर आश्चर्य वाटू नये. निवडणुकीत विरोधी नेत्यांचे दर्शन झालेच नाही. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरूध्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सत्ता संघर्ष बघायला मिळाला.
पहाटे पाच वाजता महिला उमेदवाराला पोलिसांच्या संरक्षणात आपला अर्ज भरण्यासाठी जावे लागले हे काय भयमुक्त वातावरण आहे का ? जवळपास अडिच ते तीन डझन उमेदवार हे मंत्री, आमदार, नेत्यांच्या परिवारातील आहेत. बिनविरोध निवड व्हावी म्हणून दबाव नि धाक धपटशा मार्गाचा वापर करण्यात आला पण कुठे तक्रारीची नोंद नाही.
सिंधूदू्र्गमधील भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात पंचवीस लाख रोकडअसलली थैली मिळते. शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केले म्हणून पैशाचा बाजार कसा चालू आहे हे महाराष्ट्रातील जनतेला घरात बसून बघायला मिळाले. ज्याच्या घरी रोकड सापडली तो मोकाट आहे, पण तक्रारदार नीलेश राणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका प्रभागात १३०० मतदार आहे पण तेथे दुपट्टीपेक्षा जास्त मतदान झाले. एका घरात तर बोटावर लावलेली शाई पुसायच्या बाटल्या मिळाल्या. अनेक ठिकाणी पंधराशे ते सतराशे रूपये किमतीच्या साड्या वाटप झाले. एका मताचा दर तीन ते पाच हजार होता अशी चर्चा झाली. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे तीन ते पाच कोटी खर्च होणार असतील तर तो निवडून आल्यावर समाजसेवा करेल की दुसऱ्या दिवसापासून वसुलीला सुरूवात करेल ?
पंचायत ते पार्लमेंट स्वबळावर शतप्रतिशत सत्ता काबीज करणे हे भाजपाचे ध्येय आहे. अयोध्यतील राम मंदिराप्रमाणेच शतप्रतिशत हा भाजपाचा जुना अजेंडा आहे. केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता आहे. महाराष्ट्रासह दिड डझन राज्यात भाजपाची सत्ता आहे. नगर परिषदा, नगर पंचायत, महापालिका, जिल्हा परिषदांमधे कमळ फुलविण्याची हीच योग्य वेळ आहे हे भाजपाने बरोबर हेरले आहे. राज्यात काँग्रेस, उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) या तीन प्रमुख पक्षांना भाजपने पराभवाच्या गर्तेत लोटले आहे. आता शिवसेना (शिंदे ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या मित्र पक्षांना कमकुवत करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधे भक्कम पाया रोवणे, विस्तार करणे व सत्ता काबीज करणे हा भाजपचा आराखडा आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत पण ते अर्थमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यावर समाधानी असतात. पण एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री व ठाण्यापुरते समाधानी नाहीत, ते महत्वाकांक्षी आहेत. मुख्यमंत्रीपदाची ताकद काय असते हे त्यांनी अनुभवले आहे. ते शांत बसत नाहीत. थकत नाहीत, दौरे थांबवत नाहीत. शिवसेनेकडे विधानसभेत ५७ आमदार आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
अमितभाई शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. देशातील मोठे शक्तिशाली हे पद आहे. कामाचा व्याप प्रचंड आहे. पण पक्ष संघटन व राज्यातील युती सरकार व मित्र पक्ष यावर त्यांचे बारीक लक्ष असते. ठाकरेची शिवसेना व पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस खच्ची करण्यात अमितभाईंची रणनिती जबरदस्त होती. मोदी- शहांच्या महाशक्तिमुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. एकनाथ शिंदे हे दर महिन्याला दोन तीन वेळा तरी दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटतात व अमित शहासुध्दा त्यांना अर्धा पाऊण तास वेळ देतात. जरा मनाविरूध्द घडले की शिंदे दिल्लीला धावतात. आपल्या पाठिशी आजही मोदी – शहा आहेत हे शिंदे जाणतात म्हणूनच ते ताठ मानेने महाराष्ट्रात फिरतात व वेळ प्रसंगी देवाभाऊंना व रवींद्र चव्हाणांना आपल्या सहकाऱ्यांकडून आव्हान देत असतात. शिवसेनेचे ठाणे, डोंबिवली, कल्याणमधील काही पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपने आपल्या पक्षात घेतले तेव्हा शिंदेंनी अमितभाईंकडे तक्रार केली. पण त्यानंतरही भाजपने ही फोडाफोडी चालूच ठेवली. ठाणे- कल्याण – डोंबिवली हा एकनाथ शिंदे व त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे बालेकिल्ला आहे. त्याला छेद देण्याचे काम भाजपने सुरू केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचेच. अमितभाई व देवाभाऊ यांचा हिरवा कंदिल असल्याशिवाय ते शिंदेंच्या लोकांना भाजपात घेऊ शकतात का ? पद आणि पैसा अशी मोठी अमिषे दाखविल्याशिवाय पक्षांतरे होत नाहीत हे सर्वशृत आहे.
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमधे देवाभाऊंनंतर एकनाथ शिंदे यांनीच मोठा जोर लावला आहे. भाजप समर्थित उमेदवारांसाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांनी ताकद पणाला लावली आहे. खरं तर यापुर्वी नगर परिषद, नगर पंचायत अगदी जिल्हा परिषद निवडणुकांमधेही राज्याचे मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एवढ्या हिरीरीने मैदानात उतरलेले कधीच दिसले नाहीत. हर्षवर्धन सकपाळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, विश्वजित कदम, हे नेते राज्यात फिरताना कुठे दिसले नाहीत. ठाकरे ब्रँन्ड ने मुंबईतच राहणे पसंत केले. एकनाथ शिंदे मात्र स्वत:साठी व पक्षासाठी राज्यभर फिरत आहेत. शिंदे हे घरी बसून राहणारे नेते नाहीत. विदर्भात जिथे पक्षाचे काही नाही, तेथेही शिंदे प्रचाराला गेले मग काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते आपापल्या मतदारसंघात का बसून राहिले ?
राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे होते तेव्हा गृहखाते भाजपकडे होते. आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे पण गृहखातेही भाजपने म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. गेल्यावर्षी भाजपचे १३२ आमदार निवडून आल्यावर मुख्यमंत्रीपद भाजपने आपल्याकडे घेतले, पण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला शिंदे मनापासून राजी नव्हते. नंतरच्या काळात शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजना बंद झाल्या किंवा त्यांचा निधी कमी झाला. शिदे यांनी नेमलेल्या अनेक नेमणुकाही रद्द झाल्या. शिंदे यांच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आल्या. यापुढे भाजपने कुबड्या फेकून दिल्या पाहिजेत , स्वबळावर सत्ता काबीज केली पाहिजे असे अमित शहांनी मुंबईत सांगितल्यानंतर शिंदे व अजित पवार यांची गरज संपली आहे हाच संदेश भाजपने दिला. स्वबळावर आपण दोन तृतिशांश जागा जिंकू शकतो असा आत्मविश्वास भाजपला आला आहे.
सांगोल्याचे माजी आमदार काय ते डोंगर, काय ती झाडी गुवाहटी फेम शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली व त्याच रात्री त्यांच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकला. ( उबाठा सेनेचे अंबादास दानवे म्हणाले, तेव्हा डोंगर झाडी गोड वाटली , भाजपच्या विरोधात बोलल्यावर छापेमारी सुरू झाली ) हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर शंभर पोलिसांनी छापा टाकला. पक्षाचे दुसरे आमदार हेमंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष व एकनाथ शिंदेकडे तक्रार केली. पालघरमधे तर स्वत: एकनाथ शिंदे यांनी रावणाची लंका जाळायची भाषा केली, अहंकाराने लंका जाळली असे ते म्हणाले. त्यावर देवेंद्र यांनी आपण काही लंकेत राहात नाही, आपण रामाचे सैनिक आहोत, असे म्हटले.
नगर परिषदांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनीच युती धर्माला तिलांजली दिली. आम्हाला दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवाची आहे, असे रवींद्र चव्हाणांनी म्हटले तेव्हा भाजपच्या मनातील नेमकी खदखद बाहेर आली. शिंदेंनी मोदी- शहांशी बोलून युती केली आहे, युतीवर बोलण्याची चव्हाणांची लायकी काय ? अशी विचारणा शिवसेनेच्या गटातून केली गेली.
सन २०१४ मधे अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील विधानसभेत बोलताना म्हणाले होते, मी आजवर अनेक मोठी पदे भुषवली. मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. पण होऊ शकलो नाही. मी नंबर दोनच राहिलो. बाबांनो, नंबर एक हा नंबर एकच असतो, राजकारणात नंबर दोनला काही किमत नसते… हा संदर्भ देत रवींद्र चव्हाण म्हणाले, जो भी है, देवाभाऊ है…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
