आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
१- वातावरणीय सध्य: स्थिती –
सध्या पीक काढणीचा काळ असुन पावसासंबंधी भडक बातम्या पसरवून शेतकऱ्यांना घाबरवले जात आहे. प्रत्यक्षात पुढील १० ते १२ दिवस म्हणजे शुक्रवार २४ एप्रिल पर्यन्त घाबरून जाण्यासारखी अशी स्थिती नाही. असे वाटते. नंतरच्या कालावधीचा खुलासा केला जाईल.
२-ढगाळ वातावरण व किरकोळ पाऊस –
ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर, चंद्रपूर अश्या १४ जिल्ह्यात सोमवार ते बुधवार ( दि. २० ते २२ एप्रिल ) अश्या ३ दिवसा दरम्यान ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ म्हणजे २ ते ३ मिमी. इतक्या पावसाची शक्यता जाणवते.
३- उन्हाची ताप व उष्णतेच्या लाटा –
अजूनही पुढील ५ दिवस म्हणजे शुक्रवार( दि. १७ एप्रिल चैत्री आमावस्या) पर्यंत महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या व काही ठिकाणी एखाद्या डिग्रीने वाढीव पातळीत असण्याची शक्यता आहे.
शनिवार ( दि. १८ एप्रिल वैशाख मासारंभा ) पासुन एप्रिल अखेर पर्यंत मात्र महाराष्ट्रातील दुपारच्या कमाल तापमानात वाढ होवून, मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्हे व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीला लागून असलेल्या पश्चिम भाग व घाटमाथ्यावरील क्षेत्रात सरासरीपेक्षा तापमानात अधिक वाढ जाणवेल. शिवाय मराठवाडा व विदर्भात काही जिल्ह्यांच्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचीही शक्यता जाणवते.
४- मान्सून २०२६ चा –
जून ते सप्टेंबर ४ महिन्यात महाराष्ट्रात पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे.
एल निनो हा ऑगस्ट व सप्टेंबर ह्या २ महिन्यात अवतरण्याची शक्यता आहे.
परंतु ह्याच २ महिन्यात आयओडी हा धन असण्याच्या शक्यतेमुळे मान्सूनवर अधिकच अति- विपरित परिणाम न जाणवण्याची शक्यताहीं आहे.
