fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 23, 2026
Home » मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा
संशोधन आणि तंत्रज्ञान

मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा

Jain Stache's Found in pendur Malvan Taluka

आता एकही जैन कुटुंब नसलेल्या या गावात अजूनही जैनांची आठवण ठेवून एक वर्षाआड उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे. त्याकाळात येथे कुणी वाद्य वाजवित नाही आणि मांसाहार केला जात नाही.

– संतोष शेणई

पेंडूर (ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील जंगलात जैन मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या मी पहिल्यांदा १९८६ला पाहिल्या. (त्यावेळी मी वेंगुर्ल्याला महाविद्यालयात शिकत असतानाच वार्ताहर म्हणून काम करीत होतो.) या जंगलात त्यावेळी मला एकोणीस मूर्ती आढळल्या होत्या. दिगंबर जैन परंपरेतील या मूर्ती साधारण अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील असाव्यात असा अंदाज आहे. मी पुन्हा २००४ला या जंगलात गेलो तर चौदा मूर्ती मला दिसल्या. डॉ. भालचंद्र आकलेकर (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवता संप्रदाय) यांना १९९६ मध्ये चौदाच मूर्ती आढळल्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. म्हणजे १९८६ ते १९९६ या मधल्या दहा वर्षात पाच मूर्ती गायब झाल्या होत्या. अलिकडेच गावकऱ्यांनी व जैन युवा मंडळाने या मूर्ती गोळा करून जंगलातीलच एका जुन्या मंदिराच्या चौथऱ्याचा भाग स्वच्छ करून त्यावर ठेवल्या आहेत. या पाच मूर्ती चोरीला गेल्या असतील किंवा पुन्हा त्या भूमिगतही झाल्या असू शकतील. या मूर्तींचा शोध घ्यायला हवा. मध्यंतरी राज्य पुरातत्त्व खात्याने सध्या दिसणाऱ्या चौदा मूर्ती रत्नागिरीला संग्रहालयात हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा प्राचीन ठेवा गावातून हलवण्यास स्थानिकानी विरोध केल्याने त्या तिथेच ठेवण्यात आल्या आहेत. त्या मूर्ती अजून उघड्यावरच आहेत. एकीकडे त्या निसर्गहत होत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

पेंडूरची ग्रामदेवता असलेल्या सातेरीदेवीच्या मंदिरामागे काही अंतरावर `जैनाचा डोंगर` आहे. आता जंगल बरेचसे विरळ झाले आहे, तरी जाणवण्याइतका रानवटा आहे. आता या गावात एकही जैन कुटुंब नाही, तरी `जैनाचा डोंगर` या स्थळनामाने गावाने येथील प्राचीन जैन संस्कृतीची आठवण जपली आहे. भल्या मोठ्या वारूळ रुपातील सातेरी आणि न्यायदान करणारा वेताळ ही या गावाची मुख्य दैवते. सातेरी मंदिराच्या मागच्या बाजूने जैनाच्या डोंगराकडे पायवाट जाते. काही अंतरावर गेल्यावर रानवटा सुरू होतो. थोडे आत गेल्यावर मंदिराचे भग्नावशेष दिसतात. एक मोठा चौथरा व अर्धवट खांब तेथे पूर्वी मंदिर होते, असे सांगतात. गर्भालयाचे व सभामंडपाचे अवशेष दिसतात. पण मूर्तींची संख्या पाहता हे मंदिर आता चौथरा दिसतो त्याहून खूप मोठे असावे. कदाचित त्या परिसरात मंदिर समूह असावा. येथे पूर्वी नक्षीदार खांब होते, असे गावकरी सांगतात. पण तसे निसर्गहत झालेले खांबही दृष्टीस पडत नाहीत. याचा अर्थ ते पळवले गेले आहेत.

जैन तीर्थंकरांची मूर्ती अजूनही देखणी दिसते. तीर्थंकरांच्या बाजूला चवऱ्या ढाळणाऱ्या दासीची प्रतिमा आहे. समोरच जमिनीवर गजमुखाचे कोरीव काम असलेले आसन व मूर्तीमागची प्रभावळ भग्नावस्थेत आहे. यक्ष व शासनदेवी यांच्या मूर्ती आहेत. भगवान वर्धमान महावीर यांची पद्मासनातील मोठी मूर्ती व निसर्गहत झालेल्या पादुकाही आहेत. याखेरीज पार्श्वनाथांची मस्तकहीन मूर्ती, सर्वानुभूते वगैरेंच्या मूर्ती आहेत. एक सिंहशिल्प व हत्तींची दोन आकर्षक शिल्पेही आहेत. नीट ओळखू न येण्याइतकी सिंहशिल्पाची हानी झाली आहे. या शिल्पांपासून थोडे दूर एक व्याघ्रशिल्प आहे. ते शिल्प तांबूसपिवळ्या रंगाने रंगवलेले आहे. त्याची वाघचाळा अशी ओळख आहे. चाळा म्हणजे गावासाठी तारक असणारी विध्वंसक शक्ती. गावाबाहेरून येणाऱ्या वाईट गोष्टींचा विध्वंस करणारी शक्ती. रक्षक देवता म्हणून या जंगलझाडीतील व्याघ्रशिल्पाची योजना गावकऱ्यांनी केलेली दिसते. व्याघ्रारूढ रक्षक देवीची एक मूर्ती अर्धी-अधिक जमिनीत गाडली गेलेली आहे. आभूषणांनी नटलेली ही मूर्ती लक्ष वेधून घेते. मुकुट, कर्णफुले, गळयात हार असलेली ही मूर्ती ध्यानस्थ स्थितीतील आहे. ती गोमेधा देवीची मूर्ती असावी. जांभाळ (कुबेर) हा संरक्षक यक्ष आणि गजलक्ष्मी, तसेच कालिका (महिषासूरमर्दिनी) यांच्याही मूर्ती येथे आहेत. चामरधारिणी यक्षिणी आहे. गजलक्ष्मीच्या पायाशी वादक कोरलेले आहेत. पंचनागांचे छत्र असलेली महावीरांची, तीर्थंकर नेमिनाथांची, तसेच एक कुबेरासारखी दिसणारी यक्षाची आणि पद्मावती व कुष्मांडिनी या शासनदेवतांच्या मूर्ती मी येथे पहिल्या भेटीत पाहिल्या होत्या. मी पाहिल्या तेव्हा त्या चांगल्या स्थितीत होत्या. त्या पाचही मूर्ती आता दिसत नाहीत. कुष्मांडिनी (अंबिका) ही तीर्थंकर नेमिनाथांची यक्षिणी. नेमिनाथांच्या मूर्तीबरोबरच जी यक्षिणी हरवलेली आहे, तिचा उल्लेख येथे मी कुष्मांडिनी असा करतो, कारण अजून एक कुष्मांडिनी येथे आहे आणि ती अंबिका म्हणून ओळखली जाते.

कुष्मांडिनी सव्यललितासनात बसलेली होती. तिच्या डाव्या मांडीवर लहान मूल होते. मुलाला कवेत घेतलेल्या हातात आम्रलुम्बी (आंब्याची डहाळी) होती. उजवा हात वरदमुद्रेत होता. ‘प्रतिष्ठातीलाकम्‘ या ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे ही द्विभुजा मूर्ती होती. पादपीठावर सिंह हे वाहन कोरलेले होते. पाठशिळेवर दोन्ही बाजूस भक्तगण होते. अधोवस्त्र नेसलेल्या कुष्मांडिनीच्या कमरेला बारीक नक्षीकाम केलेली साखळी होती. हातात कंकणे, बाहुंवर बाजूबंद, गळ्यात हार, कानात कुंडले होती. ही यक्षिणी आता येथे नाही.

पद्मवाहना, चतुर्भुजा पद्मावतीच्या हातात अंकुश, पाश व पद्म ही आयुधे होती. उजवा खालचा हात वरदमुद्रेत होता. पादपीठावर कुक्कुटवाहन कोरलेले होते. पद्मावतीचे हे वर्णन ‘अपराजितपृच्छा‘ या ग्रंथात आले आहे. पद्मासनात बसलेल्या या पद्मावतीने डोक्यावर करंडमुकुट धारण केलेला होता. कानी कुंडले, गळ्यात विविध हार, कंकणे, बाजूबंद ल्यायलेली ही मूर्ती होती. येथील पार्श्वनाथांची मूर्ती मस्तकहीन आहे. तर त्यांची यक्षिणी असलेली पद्मावती येथून गायब आहे. (१९८६मधील टिपणाच्या आधारे आता मी या दोन्ही मूर्तींचे वर्णन केले आहे).

जैनांच्या मूर्ती असलेल्या या भागाला ‘डंकिनी-शांकिनी‘ नावाने ओळखले जाते. येथील एका यक्षिणीला डंकिनी व यक्षाला शांकिनी म्हटले जाते. यक्षीण या शब्दावरून डाकीण व त्यावरून डंकिन असे झाले असावे. शांकिनीचे पोट गणपतीसारखे मोठे आहे. मस्तकी मुकुट व छातीवर रुळणारे अलंकार आहेत. येथील डंकिनी अष्टाच्या मुळांनी वेढलेली आहे. कदाचित त्यामुळेच ती अजूनही तिथे सुरक्षित असावी. ही डंकिनी म्हणजे डाव्या मांडीवर लहान मूल घेतलेली अंबिका म्हणजे आम्रादेवी होय. सव्यललितासनात बसलेली अशी ही द्विभुजा मूर्ती आहे. गळ्यातील हार व बाजूबंदही दिसतो आहे. कमरेला अधोवस्त्र आहे. पाठशिळा नीट दिसत नाही, मात्र डोक्यावरच्या भागात आम्रफळे व डहाळी कोरलेली दिसते आहे. उजवी बाजू झाडात शिरलेली असल्याने उजव्या हातात फळ आहे की तो वरदहस्त आहे हे कळत नाही. `निर्वाणकलिका` व `प्रतिष्ठासारसंग्रह` या ग्रंथातील वर्णनानुसार ही अंबिका आहे. या यक्षिणीचे वाहन असलेल्या सिंहाचे शिल्प येथे दिसत नाही. या शिल्पापासून दूर असलेल्या व्याघ्रारूढ देवीच्या शिल्पाजवळ एक सिंहशिल्प सापडले आहे, ते या अंबिकेचे वाहन असू शकते.

जैनांची ही यक्षिणी आता सर्वच गावकऱ्यांसाठी श्रद्धास्थान बनली आहे. रानवट्यातील या देवीला अपत्यसुखासाठी नवस बोलण्याची प्रथा आहे. छोटी पाळणी, बांगडया आदी नवस म्हणून देण्याची प्रथा आहे. लग्न व्हावे अशी इच्छा धरून अविवाहित येथे मुंडावळ्या नवस करतात. तर विवाह झाल्यानंतर बांगड्या अर्पण केल्या जातात. नव्याने आयुष्य सुरू करणारे नवउभयता आशीर्वादासाठी या मूर्तीसमोर दाखल होतात. साथीच्या रोगाला या वन-मातृकांचा कोप कारणीभूत असतो, असे येथे मानले जाते. पूर्वी गावात साथ पसरली की या मातृकांची हळद-कुंकू, काजळ, फुले व काकणे वाहून पूजा केली जात असे आणि त्यांना शांत केले जात असे, अशी माहिती ए. एम. टी. जॅक्सन यांनी `फोकलोअर इन कोकण` (१९१५) या पुस्तकात नोंदवून ठेवली आहे. (ब्रिटिशांविरुद्धच्या रागातून अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सन यांची नाशिक येथे हत्या केली). एरवी डंकिनी म्हणून उल्लेखली जाणारी ही यक्षिणी अशावेळी अंबिका माता असते.

आता एकही जैन कुटुंब नसलेल्या या गावात अजूनही जैनांची आठवण ठेवून एक वर्षाआड उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे. त्याकाळात येथे कुणी वाद्य वाजवित नाही आणि मांसाहार केला जात नाही. पूर्वी कार्तिकी अमावास्येला घरपरसातल्या आंब्याच्या झाडाखाली तांब्याचा पैसा ठेवायची प्रथा होती, असे तातू परब यांनी सांगितले. दिवाळीत आम्रवृक्षाखाली ताम्रनाणे ठेवण्याची प्रथा मालवणी मुलखात इतरत्र नाही. ती केवळ इथेच होती. कार्तिकी अमावास्या हा महावीरांचा निर्वाणदिन, त्यांचे स्मरण करण्यासाठी तर ही प्रथा पेंडूरमध्ये नसेल? (माझे गाव आडेली, ता. वेंगुर्ला. तेथील गोपीनाथांच्या तळ्याजवळ कार्तिकी अमावास्येला सायंकाळी दिवा लावून यायला माझी आजी सांगायची. `जैनांची दिवाळी` असे ती म्हणायची.) आता ताम्रनाणेही राहिले नाही आणि प्रथाही उरली नाही.

गावात डांबरी रस्त्यालगत एका जैन धर्मगुरूची समाधी आहे. स्वामींची समाधी म्हणून तिची ओळख दिली जाते. पूर्वी येथे जैन वस्ती होती याच्या अनेक खुणा येथे आहेत.

( विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर यांच्या `संशोधन क्षितिज` वार्षिकांक यामध्ये हा लेख सविस्तर प्रकाशित झाला आहे.)

Related posts

Saloni Art : असे रेखाटा खरेखुरे नयन

ओळखा पाहू ? हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे ?

उजेडाच्या वाटेवर प्रदर्शनाला मुदतवाढ

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!