कणकवली – सम्यक संबोधी सिंधुदूर्ग संस्थेच्यावतीने यावर्षीपासून उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी सम्यक संबोधी काव्य पुरस्कार दिला जाणार आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे स्वरूप असलेल्या या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२१ ते ३१ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाची एक प्रत ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम आणि कार्यवाह सूर्यकांत साळुंखे यांनी केले आहे.
परिवर्तनाचा विचार केंद्रस्थानी ठेवून सम्यक संबोधी सिंधुदुर्ग या साहित्य संस्थेची स्थापना करण्यात आली. तळकोकणात अनेक संस्था आज कार्यरत आहे. त्यांना पूरक काम करण्याच्या उद्देशाने कार्यरत झालेल्या या संस्थेच्या वतीने उत्तम साहित्य लेखन करूनही दुर्लक्षित राहिलेल्या लेखकांना मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तम आणि वेगळी कविता लिहूनही अशी चांगली कविता लोकांपर्यंत येऊ शकली नाही अशा कवितेला यावर्षीपासून सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार निवडीत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा त्यात हस्तक्षेप राहणार नाही. असेही श्री कदम आणि श्री साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.
काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचा पत्ता
किशोर देवू कदम, अध्यक्ष, सम्यक संबोधी साहित्य संस्था, फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कंझ्युमर सोसायटी, न्यू पोस्ट ऑफिसच्या वरती, कणकवली कॉलेज रोड, कणकवली, जि. सिंधुदुर्ग पिन. 416602. संवाद – 9422963655
