तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार बालसाहित्यिका वर्षा चौगुले यांना जाहीर
सांगली – पेठ येथील तिळगंगा साहित्यरंग परिवार यांच्याकडून या वर्षीपासून बालसाहित्यासाठी ‘तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार’ देण्यात येणार असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सत्कार आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार कोणत्याही विशिष्ट साहित्यकृतीला देण्यात येणार नसून बालसाहित्यिकांची एकूण साहित्यिक कारकीर्द विचारात घेऊन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.
तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार २०२४ हा पहिला पुरस्कार ज्येष्ठ बालसहित्यिका वर्षा चौगुले ( सांगली ) यांना जाहीर करण्यात आला आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिका वर्षा चौगुले यांची ‘मैत्री’, ‘बार्बी डॉल’, ‘कुछ समझें बच्चमजी ?’ , ‘अशी फुलते कविता’, ‘सहल’, ‘रंगात रंगू या रे’, ‘चिव चिव चिमणी’ आणि ‘गंमत शब्दांची’ ही बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली असून ‘भरलेले आभाळ’, ‘पेलवेना भार हा’, ‘धुरकटलेल्या वाटा’, ‘चाफ्याची ओंजळ’, ‘स्मार्ट बॉक्स’ ही पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत.
तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार १ डिसेंम्बर २०२४ रोजी नायकलवाडी, पेठ जि. सांगली येथे होणाऱ्या एकदिवसीय सातव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. असे तिळगंगा साहित्यरंग परिवाराचे संस्थापक आनंदहरी, पंडित लोहार, संस्थापक अध्यक्ष मेहबूब जमादार आणि कार्यवाह महादेव हवालदार यांनी सांगितले.
