आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत असलेल्या ऊबदार वातावरणात बदल होवून, शुक्रवार (ता. ३) पासुन पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार (ता. ९ जानेवारी ) पर्यन्त किमान तापमानात काहीशी घट होवून संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू मध्यम थंडी जाणवेल, असे वाटते.
त्यापुढील म्हणजे १० ते १६ जानेवारी दरम्यानच्या दुसऱ्या आठवड्यातही खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा तसेच रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर हे ९ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात थंडीचा प्रभाव तसाच टिकून राहून पहाटेचे किमान तापमान हे सरासरीच्या खाली जाणवेल असे वाटते. त्यातही उत्तर विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते.
परंतु खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा तसेच रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर या ९ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतकेच म्हणजे १२ ते १४ डिग्री से. ग्रेड इतके जाणवण्याची शक्यता आहे, असे वाटते.
पुढील १५ दिवस म्हणजे गुरुवार दि. १६ जानेवारीपर्यन्त महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. त्यानंतर मात्र थंडी वा पावसाची स्थिती ही मात्र एमजेओच्या तीव्रतेवरच अवलंबून असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
