April 22, 2026
Illustration of artificial intelligence replacing and transforming human jobs in the modern workplace
Home » काय ‘एआय’ नोकऱ्या गिळंकृत करणार ?
संशोधन आणि तंत्रज्ञान

काय ‘एआय’ नोकऱ्या गिळंकृत करणार ?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे केवळ तांत्रिक क्रांती नव्हे, तर रोजगारविश्वातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरत आहे. पारंपारिक नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत असताना, ‘एआय’ हा संधींचा दरवाजा उघडतोय की अस्थिरतेची छाया वाढवतोय, हा प्रश्न आजच्या तरुणांसमोर उभा ठाकला आहे.

प्रा. डॉ. संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.
मोबाईल क्रमांक: 7276614260

नुकतीच ओरॅकल कॉर्पोरेशने, जी अमेरिकेतील एक प्रमुख बहुराष्ट्रीय संगणक तंत्रज्ञान कंपनी आहे, जगभरातील अंदाजे ३०,००० पदे कमी केलेत. त्यामुळे १२,००० भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. उद्योगातील अग्रगण्य कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एआय डेटा सेंटर्स आणि क्लाऊड कंप्युटिंगच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या भांडवली खर्चामुळे ही कर्मचारी कपात करण्यात आल्याचे सांगितले गेले. कंपनीचा खर्च मोठ्या प्रमाणात एआयकडे वळत असताना ,३० हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्याने ८ ते १० अब्ज डॉलर्सची (अंदाजे ७५,००० ते ९०,००० कोटी रुपये ) बचत होण्याची संभावना आहे. कंपन्या आता मनुष्यबळापेक्षा तंत्रज्ञानावर जास्त गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्थिरतेची भावना आहे.

मे २०२५ मध्ये, डारियो अमोडेई,जे एक अमेरिकन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) संशोधक आणि उद्योजक आहेत व अँथ्रोपिक या एआय कंपनीचे सीईओ आहेत, त्यांनी सुचित केले की एआयमुळे पुढील एक ते पाच वर्षांत बेरोजगारी १० ते २० टक्क्यांनी वाढू शकते आणि सर्व एंट्री-लेव्हल व्हाईट-कॉलर नोकऱ्यांपैकी निम्म्या नोकऱ्या नाहीशा होऊ शकतात. याचे प्रतिबिंब आपल्याला वर्ष २०२५ मध्ये दिसून आले. सन २०२५ मध्ये मायक्रोसॉफ्टने ९०००, इंटेलने २१,०००, ॲक्सेन्चरने ११,०००, ॲमेझॉनने १६,०००, टीसीएसने १२,०००,ओरॅकलने ३०,०००, असे एकूण २,४५,९६३ संगणक सेवकांना कामावरून कमी केले. सन २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत ८५,१५६ लोकांना नोकरी गमवावी लागली, म्हणजे दररोज जवळपास १००० लोकांना नोकरी गमवावी लागली. मग काय एआय बहुतांश नोकऱ्यांची जागा घेईल ?

कृत्रीम बुद्धिमत्तेनेचं (एआय) तंत्रज्ञान माहिती आणि तंत्रज्ञानामधूनच (आयटी) निर्माण झालं. पण त्यामुळे पारंपारिक आयटी नोकऱ्यांच्या स्वरूपात मोठी उलथापालथ झाली आहे. आयटीमधील अनेक कामे करण्यासाठी कुशल तंत्रज्ञ लागत होते. एखादे काम करण्यासाठी, अनेक माणसे नेमून, लाखो रुपये खर्च करावा लागत होता. पण आता ‘एआय’ ही कामे चुटकी सरशी करत आहे. जे काम करायला आधी १० लोक लागायचे, ते आता एआयच्या मदतीने २-३ लोक करू शकतात. यामुळे जुन्या पद्धतीच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. मुख्यत्वे, एन्ट्री-लेव्हल कोडिंग, टेस्टिंग आणि मॅन्युअल डेटा एंट्री यांसारख्या कामांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

सध्या अन्थ्रॉपिक कंपनीचे ‘क्लॉड’ हे मॉडेल लोकप्रिय झाले आहे. या मॉडेलचा वापर करून कंपनीने ‘क्लॉड कोड’ व ‘क्लॉड कोवर्क’ ही उत्पादने बाजारात आणली आहे. ‘क्लॉड कोड’ चा वापर करून सॉफ्टवेअर क्षेत्रातील काहीही माहित नसलेला माणूस सुद्धा अगदी अद्यावत सॉफ्टवेअर प्रकल्प काही मिनिटात तयार करू शकतो. यामुळे प्रोग्रामरची गरज भविष्यात लागेल का? हे आता सांगणे कठीण आहे. ‘क्लॉड कोवर्क’ मुळे कार्यालयांमधील बहुविध कामे स्वयंचलित करून टाकलीत.

एंथ्रोपिक कंपनीचे नवीन एआय टूल इतके शक्तिशाली आहे की ते सॉफ्टवेअर कंपन्या करत असलेली बहुतांश कामं करू शकते. संपूर्ण बिझनेस वर्कफ्लो (कार्यप्रवाह म्हणजे कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रियाकलापांची मालिका) हाताळण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. एंथ्रोपिकची साधने (टूल्स) कोणती कामं करू शकतात ? कार्यस्थळ स्वयंचलन साधनामुळे (वर्कप्लेस ऑटोमेशन टूल्स) सॉफ्टवेअर वापरताना कर्मचाऱ्यांना मदत करण्याऐवजी एआय स्वतः संपूर्ण व्यवसाय प्रक्रिया पूर्ण करू शकते. यामध्ये कायदेशीर कागदपत्रांची तपासणी, अनुपालन तपासणी, विक्री नियोजन, विपणन (मार्केटिंग) मोहिमेचे विश्लेषण,आर्थिक ताळमेळ, डेटाचे दृश्य सादरीकरण (व्हिज्युअलायझेशन), स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजचा (एसक्यूएल) वापर करून डेटाबेसधून माहिती मिळवणे आणि त्याचे विश्लेषण करून अहवाल तयार करणे आणि उपक्रम स्तरावरील दस्तऐवजांचा शोध यांसारख्या कामांचा समावेश आहे. आता आयटी कंपन्यांत, ज्या कामांसाठी पूर्वी वेगवेगळ्या सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शनची गरज भासायची,ती सर्व कामे आता एकाच एआय-आधारित वातावरणात पूर्ण केली जाऊ शकतील. त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांनी संख्या कमी होऊ शकते.

मग काय आता तरुणांना नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असतील? याचे उत्तर नाही असे आहे. एआयमुळे पारंपारिक आयटी नोकऱ्यांच्या स्वरूपात मोठी उलथापालथ होत आहे. ‘एआय’ आगमनाने नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल. कर्मचारी आता स्वतः काम करण्याऐवजी एआयने केलेल्या कामाचे निरीक्षण आणि पडताळणी करण्याची भूमिका बजावतील. नियमित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा प्रणाली आराखडाकार (सिस्टम डिझाइनर्स), कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षक (‘एआय ट्रेनर्स) आणि धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या तज्ज्ञांची मागणी वाढेल.

एआयमुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचल्यास, कंपनी त्यांना अधिक कल्पक आणि धोरणात्मक कामांमध्ये गुंतवू शकते. त्यामुळे उत्पादकता वाढेल. बऱ्याच ठिकाणी, एआयमुळे कामाची व्याप्ती वाढून, कामे कमी होण्याऐवजी ती वाढू शकतात, ज्यामुळे कर्मचारी पूर्वीपेक्षा जास्त व्यस्त राहू शकतात व अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते. आता नव्या कौशल्यांची गरज भासणार आहे.आता फक्त कोडिंग (संगणकाला विशिष्ट कार्य करण्यासाठी संगणक भाषांच्या (प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज) माध्यमातून सूचना किंवा आज्ञा लिहिणे) येऊन चालत नाही, तर एआय प्रॉम्प्ट अभियांत्रिकी,मशीन लर्निंग, आणि डेटा सायन्स यांसारख्या प्रगत कौशल्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वेगवान एकत्रीकरणात यशस्वीपणे मार्गक्रमण करण्यासाठी, तरुणांनी ‘मानव + यंत्र’ अशी संकरित मानसिकता अंगीकारली पाहिजे. यामध्ये तांत्रिक प्राविण्य आणि सहानुभूती व चिकित्सक विचार यांसारख्या अनमोल मानवी सामर्थ्यांमध्ये संतुलन साधणे समाविष्ट आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या पारंपरिक पदव्यांपेक्षा ‘कौशल्याला प्राधान्य’ देणाऱ्या भरतीला अधिकाधिक पसंती देत आहेत, ज्यामुळे विशिष्ट क्षमता अत्यावश्यक बनल्या आहेत. तांत्रिक एआय साक्षरता,व्यावहारिक एआय साधने आणि अद्वितीय मानवी कौशल्ये जसे भावनिक बुद्धिमत्ता, सहानुभूती,गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची क्षमता आणि नैतिक निर्णयक्षमता यांसारखे गुण,जे एआय नक्कल करू शकत नाही, तरुणांनी विकसित करणे आवश्यक आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

सामाजिक वास्तवाचे सशक्त चित्रण: काळोखाचे कैदी

बोल अंतरीचे : मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी कविता

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!