fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 25, 2026
Home » पुस्तकांचे गाव प्रमाणे इतिहास साक्षर गाव ही संकल्पना राबविण्याची गरज – प्रा. डॉ. राजा दीक्षित Dr Raja Dixit Historical Literacy Concept
काय चाललयं अवतीभवती

पुस्तकांचे गाव प्रमाणे इतिहास साक्षर गाव ही संकल्पना राबविण्याची गरज – प्रा. डॉ. राजा दीक्षित Dr Raja Dixit Historical Literacy Concept

Prof. Dr. Raja Dixit praised Dr. Lahu Gaikwad’s 800-page history book on Junnar, calling it a model for local history research and historical literacy.
  • जुन्नरचा २००० वर्षांचा समृद्ध इतिहास आता एकाच ग्रंथात
  • असे घडले जुन्नर’ ग्रंथाचे थाटात प्रकाशन
  • पुस्तकांचे गाव या संकल्पनेप्रमाणे इतिहास साक्षर गाव ही संकल्पना राबविण्याची गरज

जुन्नर: जुन्नर परिसराचा तब्बल अडीच हजार वर्षांचा गौरवशाली आणि समृद्ध इतिहास आता एकाच ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. इतिहास अभ्यासक डॉक्टर लहू गायकवाड लिखित आणि सनय प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘असे घडले जुन्नर’ या ८०० पानांच्या ऐतिहासिक महाग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हे पुस्तक वाचकांना नवी दिशा, नवी प्रेरणा आणि मौल्यवान ज्ञान देईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

‘शिष्याने माझा पराभव केला’ – प्रा. डॉ. राजा दीक्षित

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास लेखक आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित उपस्थित होते. लेखक डॉ. लहू गायकवाड यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “स्थानिक इतिहास कसा लिहावा आणि त्याचे संकलन कसे करावे, याचा एक उत्तम आदर्श या ग्रंथातून समोर आला आहे. मी स्वतः आयुष्यात मोठ्या प्रमाणात लिखाण केले आहे, मात्र इतका सखोल ८०० पानांचा ग्रंथ लिहून माझ्या शिष्याने आज माझा पराभव केला आहे. आणि एका गुरुसाठी अशा पराभवाचा आनंद हा कोणत्याही विजयापेक्षा खूप मोठा आणि अभिमानास्पद असतो.”

ते पुढे म्हणाले, “विद्यापीठातील निवडणुका, पदे आणि त्याभोवतीचे राजकारण यांच्या मोहात न पडता, केवळ अभ्यासपूर्ण आणि एकनिष्ठ काम करणे, हेच आपले कर्म आणि हाच आपला धर्म मानावा, असा सल्ला मी लहूला दिला होता. त्याने तो प्रामाणिकपणे पाळला. आज त्याच्या कार्याचे हेच फलित आपल्यासमोर आहे.”

जुन्नरचा समृद्ध इतिहास

प्रा. दीक्षित यांनी जुन्नरच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकताना सांगितले की, “जुन्नर हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. येथे इतिहास संशोधनासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची साधने उपलब्ध आहेत. पुरातत्त्वीय अवशेष, उत्खननातून सापडलेली हत्यारे, मानवी सांगाडे, प्राचीन शिलालेख, तसेच मोडी, फारशी, उर्दू आणि बाळबोध लिपीतील दस्तऐवज अशा विविध स्वरूपातील ऐतिहासिक साधनसामग्री जुन्नरमध्ये आढळते.”

“प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची समृद्ध परंपरा असलेल्या या प्रदेशाचा वस्तुनिष्ठ आणि संदर्भसमृद्ध आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे डॉ. लहू गायकवाड यांची ओळख जुन्नर-नारायणगाव परिसराच्या इतिहासाचे अभ्यासक आणि तज्ज्ञ म्हणून निश्चितपणे निर्माण झाली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

ऐतिहासिक साक्षरतेची गरज

इतिहासाविषयी बोलताना प्रा. दीक्षित म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीला इतिहासात रस असतो; मात्र प्रत्येकाकडे इतिहासाचे निकोप आणि चिकित्सक भान असतेच असे नाही. इतिहासाविषयीची जाणीव, मूलभूत ज्ञान आणि वस्तुनिष्ठ आकलन यालाच मी ‘ऐतिहासिक साक्षरता’ असे म्हणतो.”

“समाजात ऐतिहासिक साक्षरता निर्माण करणे हे इतिहासकारांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. ही साक्षरता वाढली तर अनेक सामाजिक प्रश्न आणि गैरसमज दूर होण्यास मदत होईल. आपल्या समाजातील अनेक तणाव आणि संघर्ष हे ऐतिहासिक निरक्षरतेतूनच निर्माण झाले आहेत. त्यामुळे इतिहासाचे योग्य आकलन समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे.”

इतिहास साक्षर तालुक्याची संकल्पना

या संदर्भात त्यांनी जुन्नरसाठी एक महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली. ते म्हणाले, “जसे ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक गाव ‘इतिहास साक्षर’ व्हायला हवे. जुन्नर हा इतिहास साक्षर तालुका बनावा, यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. इतिहासाचे भान असलेला समाजच आपल्या वारशाचे जतन करू शकतो आणि भविष्यासाठी योग्य दिशा ठरवू शकतो.”

सातवाहन काळापासूनचा सखोल इतिहास

विशेष म्हणजे या ८०० पानांच्या ग्रंथामध्ये जुन्नरचा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा ‘सातवाहन कालीन’ इतिहास अतिशय बारकावे आणि पुराव्यांसह मांडण्यात आला आहे. जुन्नरची भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण कशी झाली, याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. “शब्दांची संपत्ती हीच खरी संपत्ती असून पुस्तके विचारांना नवी उंच भरारी देतात आणि समाज घडवतात,” अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

दिवंगत वल्लभ बेणके यांना ग्रंथ समर्पित

पुस्तकाचे लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी आपल्या मनोगतात या ग्रंथाच्या निर्मितीचा प्रवास सांगितला. ते म्हणाले, “आम्हाला जपणारी आणि इतिहासाची जाण असणारी माणसे भेटली म्हणूनच हा ऐतिहासिक ग्रंथ साकारू शकला.” जुन्नर तालुक्याचा असा एक सर्वसमावेशक इतिहास ग्रंथ तयार व्हावा, ही दिवंगत वल्लभ बेणके यांची अंतरीची तीव्र तळमळ होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच हा ग्रंथ त्यांना अत्यंत आदराने समर्पित करण्यात आल्याचे डॉ. गायकवाड यांनी भावुक होऊन सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे यांनी भूषवले. माजी आमदार अतुल बेणके, गौरीताई बेणके, राजश्रीताई बेणके, प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, अरविंद मेहेर, रवींद्र पारगावकर, शशिकांत वाजगे, प्राचार्य आनंद कुलकर्णी आणि सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे यांच्यासह जुन्नर परिसरातील अनेक मान्यवर, इतिहासप्रेमी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचे साहित्य पुरस्कार – 2025 जाहीर

साने गुरुजी कथामालेचे बाल साहित्यकृती पुरस्कार जाहीर

वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!