तूर पिक रोग नियंत्रण
⭕ मर
सुरुवातीला झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजतात, कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवर जमिनीपासून खोडांपर्यंत तपकिरी पट्टा दिसून येतो. पीक दोन महिन्याचे असताना पाने व फांद्या सुकू लागतात. थोड्याच दिवसांत संपूर्ण झाड वाळते. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात. खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी, काळा पडल्याचे आढळून येते. रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे व जमिनीतील बुरशीच्या बिजाणूपासून होतो.
🛡 नियंत्रण
👉🏾जमिनीची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी. रोगकारक बुरशी नष्ट होण्यासाठी जमीन चांगली तापू द्यावी.
👉🏾मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पाच-सहा वर्षांपर्यंत तुरीची लागवड करू नये.
👉🏾ट्रायकोडर्माची एकरी १ किलो भुकटी २०-२५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे द्यावी.
⭕ खोडकुजव्या
पाने सुकून वरच्या दिशेने वळतात, जलदगतीने वाळतात, झाडांची मर अतिशय वेगाने होते. प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास सर्व रोपे एकदम मरून जातात. जमिनीपासून १०-२० सें.मी. उंचीवरील खोडावर गर्द तपकिरी खोलगट लांब चट्टे दिसतात. सुरुवातीला उथळ आणि कालांतराने ते आत दबले जाऊन खोलवर जातात. फांद्यावर चट्टे दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात. झाड कमकुवत होऊन त्याठिकाणी लगेच तुटते. खोडाच्या चट्ट्यांचा उभा छेद घेतल्यास आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसून येते.
🛡 नियंत्रण
👉🏾मागील हंगामातील धसकटे वेचून त्यांची विल्हेवाट लावावी.
👉🏾शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
👉🏾उथळ, पाणथळ जमिनीमध्ये तुरीचे पीक घेऊ नये.
👉🏾पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
👉🏾कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापूस पिक
अतिवृष्टीनंतर कपाशीचे व्यवस्थापन
👉🏽जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असताना किंवा जमिनीत पाणी साचलेले असताना केलेल्या उपाययोजना तितक्या फलदायी ठरत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून जमीन कोरडी करण्यावर भर द्यावा.
👉🏽पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला समांतर चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढावे.
👉🏽वरंब्यावर कपाशीची लागवड केलेली असल्यास अतिरिक्त पाणी सरीमधून निघून जाण्यासाठी शेतात खोदलेले चर मोकळे करावे.
👉🏽सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी. शक्य असल्यास साचलेले पाणी बाहेर उपसावे.
👉🏽पिकातील अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा.
👉🏽वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
👉🏽पोषणासाठी कपाशी झाडावर १९:१९:१९ किंवा डी.ए.पी. १० ग्रॅम प्रति लिटर (१%) याप्रमाणात सात दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी.
👉🏽अन्नद्रव्यांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करावे.
👉🏽कपाशीची झाडे शेंडा खुडण्याच्या अवस्थेत असल्यास शेंडा खुडण्याचे काम आठवड्याने लांबवावे. पाणी साचल्यामुळे झाडाची वाढ मंद झालेली असते. अशा परिस्थितीत शेंडा खुडल्यामुळे अपेक्षित असलेली फळफांद्यांची वाढ व बोंडाच्या वजनातील वाढ मिळत नाही.
👉🏽या हंगामात अति पावसामुळे गंभीर परिस्थिती न र्माण झाली असली, तरी अन्य पिकांच्या तुलनेने कापूस लवचिक वनस्पती आहे. या काळात झाडांतील संप्रेरकांची पातळी बदललेली असते. त्यामुळे एन.ए.ए. किंवा अन्य कोणत्याही संप्रेरकाच्या फवारणीची घाई करू नये. संप्रेरकांचा खूप लवकर वापर केल्यास उत्पादनात घट येते. एकदा माती सुकली आणि सूर्यप्रकाश मिळाला की कपाशी पीक सामान्यपणे पुन्हा वाढू लागेल. पोषकतेच्या बहुतांश समस्या अनेकदा दूर होतात.
👉🏽या काळात आकस्मिक मर, पातेगळ, बोंडसड यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना कराव्या.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
