fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 21, 2026
Home » 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
काय चाललयं अवतीभवती

39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर

Padma Shri Dr. Jabbar Patel receiving Rajarshi Shahu Award 2025 from Kolhapur Memorial Trust with dignitaries on stage.

कोल्हापूरराजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. राजर्षी शाहू महाराजांच्या 151 व्या जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सन 2025 चा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रांत दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्याचे ट्रस्टने निश्चित केले आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उप पोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.

प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल : डॉ. जब्बार पटेल यांचा जन्म 23 जून 1942 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूल मध्ये झाले व इथेच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यांनी सन 1968 साली पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पदवी मिळवली व त्यानंतर 1970 साली मुंबईहून चाईल्ड हेल्थ पदविका (DCH) प्राप्त केली. सन 1971 मध्ये त्यांनी दौंड जि. पुणे येथे आपल्या स्त्रीरोगतज्ञ पत्नीबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.

डॉ. जब्बार पटेल यांचा कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. डॉ. जब्बार पटेल यांनी ‘थिएटर अॅकेडमी’ नावाची प्रायोगिक नाटकांसाठीची नाट्यसंस्था स्थापन केली व या संस्थेने मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्वाची कामगिरी बजावली. सन 1970 मध्ये त्यांनी विजय तेंडूलकर लिखित ‘अशी पाखरे येती’ या नाटकाचे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. सन 1972 मध्ये त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ हे ऐतिहासिक व राजकीय परिप्रेक्षातील क्रांतीकारी नाटक सादर केले, ज्याला जागतिक स्तरावर प्रचंड प्रसिध्दी आणि मान्यता मिळाली.

या नाटकाचे प्रयोग इंग्लड, अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी, हंगेरीसह युरोपातील अनेक देशांमध्ये यशस्वी झाले. 1975 मध्ये चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘सामना’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवड यादीमध्ये अंतर्भूत होता.

त्यानंतर सन 1978 मध्ये ‘तीन पैशाचा तमाशा’ हे पु. ल. देशपांडे यांचे नाटकही त्यांनी प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्याच सुमाराला 1978 मध्ये ‘जैत रे जैत’ हा मंगेशकर कुटुंबियांनी निर्मिती केलेला लोकसंगीतप्रधान चित्रपट दिग्दर्शित केला, 1979 साली दिग्दर्शित केलेला ‘सिंहासन’ हा राजकीय परिस्थितिवरील उपरोध असलेला चित्रपट खुप गाजला. पुढे त्यांनी स्वतः निर्माती व दिग्दर्शित केलेला ‘उंबरठा’ या चित्रपटाने त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली ज्यामध्ये स्मिता पाटील आणि गिरीष कर्नाड यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘एक होता विदुषक’ सन 1991 मधील संगीतमय विनोदी चित्रपट आणि 1994 मधील ‘मुक्ता’ या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.

त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यीक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींवर चित्रपट व माहीतीपट बनविले आहेत. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट इंग्रजीसह नऊ भारतीय भाषांमध्ये संपूर्ण भारत व परदेशात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वोत्तम इंग्रजी चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता आणि कला दिग्दर्शन यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावे 2012 साली निर्मित ‘यशवंतराव चव्हाण’ हा चित्रपट आणि पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स. मा. जोशी इत्यादी माहितीपटांचा समावेश आहे. त्यांचा पं. कुमार गंधर्व यांच्यावर आधारित माहितीपट, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. त्यांनी विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या जीवनावर देखील माहितीपट बनवला आहे.

डॉ. जब्बार पटेल यांचा संगीत नाटक अकादमी कडून सन 1978 साली सन्मान झाला. त्यांना भारत सरकारचा ‘प‌द्मश्री’ पुरस्कार सन 1982 मध्ये मिळाला, पुण्यभूषण पुरस्कार 2002 मध्ये, विष्णुदास भावे पुरस्कार 2014 मध्ये मिळाला. सध्या ते महात्मा जोतिबा फुले यांच्यावर चित्रपट बनवत आहेत.

डॉ. जब्बार पटेल यांनी संगीत नाटक अकादमी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली), फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे (FTII) या संस्थांच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे कार्यकारी संचालकपद भूषवले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये परिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

नाटक आणि सिनेमा क्षेत्रांत येण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे एम आय टी संस्थेच्या फिल्म आणि थिएटर स्कूलची स्थापना केली आहे. सध्या ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (PIFF) संचालक व अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंबई तसेच लातूर, नागपूर व चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचेही संचालक आहेत. त्यामुळे डॉ. जब्बार पटेल गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता व लेखक म्हणून ओळखले जातात.

Related posts

बायोटेक उपक्रमांसाठी 75 ‘अमृत’ अनुदानाची  घोषणा,

‘कथा कलश’ कथा संग्रहाला पुरस्कार

महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!