April 27, 2026
कवी अजय कांडर यांच्या बाया पाण्याशीच बोलतात या बहुचर्चित कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा २८ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे विशेष चर्चासत्रात होणार आहे.
Home » कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा

२८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन
डॉ. रणधीर शिंदे, डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग

कोल्हापूर – मराठीतील नामवंत कवी अजय कांडर यांच्या मराठी साहित्यात बहुचर्चित ठरलेल्या “बाया पाण्याशीच बोलतात” या कवितेचा रौप्यमहोत्सवी चर्चासत्र सोहळा रविवार २८ सप्टेंबर रोजी सायं.४ वा. इचलकरंजी येथील नाईट कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठान आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्यावतीने हे चर्चासत्र होत आहे. समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून कवी, कादंबरीकार, समीक्षक प्रा.डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील आणि प्रा संजीवनी पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे आणि नाईट कॉलेजचे प्राचार्य विरूपाक्ष खानाज यांनी दिली.

अजय कांडर यांचा ‘आवानोल ‘ हा लक्षवेधी काव्यसंग्रह २००५ मध्ये प्रसिद्ध झाला. यातील पहिलीच ‘बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता २००१ मध्ये मौज दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली आणि या कवितेला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मौज मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या कवितेसाठी ज्या अनेक मान्यवरांनी प्रतिसाद दिला त्यात कवी ग्रेस यांनी या कवितेसाठी अजय कांडर यांचे फोन करून अमाप कौतुक केले होते. तर ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सोमनाथ कोमारपंत यांनी या कवितेवर स्वतंत्र समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध केला होता. ज्येष्ठ अनुवादक कवी समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ‘ प्रगतशील वसुधा ‘ या हिंदी नियतकालिकाच्या १९६०नंतरचे मराठी साहित्य या अनुवाद विशेषांक मध्ये या कवितेचा समावेश केला होता. तर या कवितेचा हिंदी अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांनी केला होता.

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी आयुष्यात प्रत्येक कवीला एकदा तरी या उंचीची कविता लिहिता यायला हवी असे जाहीर उद्गार काढले होते. त्याचबरोबर ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा चार विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आणि नववीच्या शालेय अभ्यासक्रमात असा एकूण पाच अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला. समीक्षक प्रा संजीवनी पाटील यांनी या कवितेवर दीर्घ लेख लिहिला असून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस संपादित मुराळी नियतकालिकांमध्ये सदर लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक मान्यवरांनी या समीक्षा लेखनाचे कौतुकही केले होते.

गेली २५ वर्ष कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही कविता चर्चिली जात असून बाई आणि पाणी याचं नातं सनातन आहे. त्याचा प्रभावीपणे उद्गार या कवितेतून करण्यात आल्याचे मत अनेक मान्यवर समीक्षकांनी व्यक्त केले आहे. या कवितेच्या प्रभावातून मराठीत अनेक नव्या कवीनी कविता लिहिल्या असून मराठी साहित्यात ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता अभिजात कविता म्हणून ओळखली जाते.

२००१मध्ये मौज दिवाळी अंकात सदर कविता प्रसिद्ध झाली या घटनेला यावर्षी २५ वर्ष होत आहेत. ही कविता नववीच्या अभ्यासक्रमाला असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिकवली असून या कवितेचे आमच्या मनातील ममत्व जाहीरपणे व्यक्त व्हावे या भावनेने आमच्या संस्कृती प्रतिष्ठान आणि नाईट कॉलेजच्यावतीने बाया पाण्याशीच बोलतात या कवितेवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी साहित्य रसिकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे.

कवी महावीर कांबळे, चर्चासत्राचे मुख्य आयोजक

अधिक माहितीसाठी संपर्क – अनुराधा काळे – ९०७५५ ४८३५३

#अजय कांडर यांच्या ' बाया पाण्याशी बोलतात'  कवितेचा दखनी अनुवाद
औरतां पानीसेच बातां करतंय
- -
एक घडा भरता नई, दुसरा खालीच,
फिरबी लाईनाच लाईना बडते जातंय
औरतां झिरे के पास बातां करते खड्या
सुखते जानेवाले धार जैश्या अटकते अटकते
पहाड में का झिरा बचानेकूं देखताय जान ,
व्हां सबकीच जान प्यासी
उंचा घाट चड उतरको औरतां के पिंडऱ्या में गोले होर आख्यां गीले
सुकको जाना अंकुर वैसी सुकको गई जान ,
सह्य सह्यके धूप के झलां
बुंद बुंदसेच वो पानी करनेकूं देकतंय गोला
झिरेपोच नजर रकते रकते कित्ता बडते जाता धुपकाला,
पानीसेच बातां करतंय औरतां दिन रात
झिरा बेजबान व्हते वकत
- -
# मूल कविता- अजय कांडर
# दखनी अनुवाद- डी.के.शेख
9552843365

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

महिलांचे हक्काचे व्यासपीठ वडगणेतील चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय

घरात कसे फुलवायचे कमळ अन् वाॅटरलिली…

निसर्गासाठी झपाटलेला आयुष्यप्रवास : प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांची प्रेरणादायी गाथा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!