ग्रामीण पार्श्वभूमीतून सुरू झालेला संघर्ष, वनस्पतीशास्त्रातील भरीव संशोधन, विद्यार्थ्यांना घडवणारे अध्यापन आणि सेवानिवृत्तीनंतरही न थांबलेले निसर्गसंवर्धनाचे कार्य—प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांचे आयुष्य म्हणजे निसर्गाशी एकरूप झालेली प्रेरणादायी कहाणी आहे. ‘निसर्ग दूत’ या पुस्तकातून त्यांच्या या विलक्षण प्रवासाचे ओघवते आणि जिवंत चित्रण साकारले आहे.
प्रा. जय सामंत
निवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख पर्यावरणशास्त्र विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अध्यक्ष, देवराई संस्था, कोल्हापूर
वनस्पती- निरीक्षण, अभ्यासक आणि निसर्ग संवर्धन यातील माझे मित्र, सहकारी, प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांच्या बालपणापासूनचा जीवनपट, त्यात सुरूवातीचा संघर्ष, त्यांचे शिक्षण, संशोधन, अध्यापन, प्राचार्यपद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गसंवर्धनासाठी जनजागृतीचे केलेले अथक प्रयत्न याचे शब्दांकन, त्यांना गुरू मानणाऱ्या पण वेगळ्या विद्याशाखेचा एक युवक, डॉ. मधुकर येवलुजे हे प्रेरित होऊन, त्यांनी प्रा. जय सामंत डॉ. बाचूळकरांचा जीवनपट सोप्या आणि अत्यंत ओघवत्या शब्दांत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न या पुस्तकात केला आहे. प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांचा जीवनपट पाहता, एका सामान्य सुसंस्कृत घरात, ग्रामीण पार्श्वभूमीवर विद्यार्थीदशेपासून, कष्ट करून धडाडीने, विचलित न होता, भावी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा कसा उमटवला आणि सेवानिवृत्त झाल्यावर आज ७० व्या वर्षी सुद्धा त्याच जोमाने ते वनस्पती अभ्यास चालू ठेवून, पर्यावरण रक्षणासाठी समाजप्रबोधन, शासन पातळीवरील संबंधित विभागांशी असलेला आशावादी संबंध आणि काही वेळा झगडा होऊनही, ज्यांचा पर्यावरण रक्षणाचा आशावाद दुर्दम्य आहे, अशा माझ्या मित्रासंबंधीचे हे पुस्तक आहे.
माझे डॉ. बाचूळकरांशी नाते गेल्या चार दशकांपासून असून ते वनस्पती अभ्यासक आणि मी प्राणिशास्त्र अभ्यासक असल्याने, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षण हा आम्हां उभयतांना जोडणारा एक अतूट दुवा आजपर्यंत कायम आहे. मी डॉ. बाचूळकरांना या दीर्घकाळात वेगवेगळ्या रूपात पाहिले आहे. कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथून वनस्पतीशास्त्रात एम. एस्सी. आणि कालांतराने शिवाजी विद्यापीठातून ‘टॅक्झोनॉमी’ या वनस्पतीशास्त्रातील ‘निरीक्षणातून- वनस्पती शोध’ संशोधनात त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पीएच. डी. मिळवली आहे. खास करून दक्षिण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांत प्रदीर्घ काळ भटकून, दुर्मिळ वनस्पतींबाबत त्यांनी केलेले संशोधन खास असून, पश्चिमघाट डोंगराळ प्रदेशातील अनेक स्थानिक, दुर्मिळ व नवीन वनस्पती तसेच औषधोपयोगी वनस्पती त्यांनी शोधून काढल्या आहेत.
नंतरच्या काळात त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांचाच पाठ गिरवून, आणखी नवीन दुर्मिळ वनस्पती शोधून त्यांना आपल्या गुरूचे नांव देऊनच फेडले आहे. एक दक्ष संशोधक आणि उत्तम शिक्षक हा त्यांचा नावलौकिक त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही जोपासला. ही कौतुकाची बाब आहे. सुरुवातीच्या शिक्षकी पेशात त्यांनी अनेक महाविद्यालयांत सेवा करताना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, बेळगांव, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदेश पालथा घातला आहे.
निवृत्तीपूर्व शिक्षण क्षेत्रातील काळात त्यांनी एक अत्यंत यशस्वी शिक्षक आणि नंतर प्राचार्य म्हणून अकरा वर्षे विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगांव, जि. कोल्हापूर येथे केलेले कार्य, प्राचार्यपदाचे आदर्श उदाहरण आहे. एक कार्यक्षम, कडक शिस्तीचे प्राचार्य, व्यवस्थापक, विद्यार्थीप्रेमी उत्तम शिक्षक, आदर्श संशोधक आणि संशोधन मार्गदर्शक अशा विविध पातळीवर त्यांनी आपल्या कार्याचा यशस्वी ठसा उमटवला आहे. शिक्षकीपेशात आणि नंतर औषधी वनस्पती अभ्यासक, दुर्मिळ वनस्पती संशोधक आणि पर्यावरण प्रेमी या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित विविध विषयांवर सातत्याने लेखन केले आहे. हे सर्व सांभाळत असताना त्यांचा स्थानिक लोकांशी संपर्क आणि पर्यावरणरक्षण न्याय्य मागणीसाठी शासनाविरुद्ध संघर्ष, अजूनही चालूच आहेत. हे सर्व, आजच्या शिक्षण व संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी दुर्मिळ उदाहरण आहे.
प्रा. बाचूळकर स्वतः वनस्पतीतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी असल्याने, त्यांची मदत अनेक निसर्गप्रेमी सेवाभावी संघटना, स्थानिक पातळीवरील लोकसंघटनांना झाला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण संबंधित समित्यांवर त्यांनी विषयतज्ञ म्हणून काम केले आहे. हे सर्व त्यांनी शैक्षणिक कार्य उत्तमरीत्या सांभाळून केले आहे. हे अभिमानास्पद आहे. या “निसर्गदूत” पुस्तकात आपल्याला प्रा. बाचूळकर यांचा जीवनपट उघडताना, लेखकाने त्यांच्या महाविद्यालयातील खास आठवणींचा गोषवारा दिला आहे. वनस्पती अभ्यासक असताना त्यांनी केलेली आणि आताही चालू असलेली प्रचंड भ्रमंती, जी शिक्षकाचे काम कचितही न टाळता केले हे आजच्या महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षकांना आदर्श ठरणारे आहे.
प्रा. बाचूळकरांच्या लेखनाचा आवाका आणि त्यांचा वेग जबर असून, गौरवास्पद आहे. उदाहरणार्थ गेल्या ४० वर्षांत त्यांनी वनस्पतीशास्त्र संबंधित संशोधनावर आधारित अनेक लेख प्रकाशित केले आहेत. त्यांचे लेखन कल वनस्पतीशास्त्रात न राहता त्याची उपयुक्तता, उदाहरणार्थ आयुर्वेद, शेती, पर्यावरण आदी संबंधी विषयांवर असून त्यांची २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते निव्वळ शिक्षकच नसून, समाज शिक्षक, उत्तम वक्ते आणि निसर्गविज्ञान प्रसारकही आहेत.
मासिके व वृत्तपत्रातील लेखनप्रमाणेच आंतरराष्ट्रीय शास्त्रीय जर्नलमध्ये त्यांचे ७६ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. वनस्पतीशास्त्राबरोबरच आयुर्वेद, शेतीशास्त्र, पर्यावरण, संबंधित विषयांवर अजूनही त्यांचे लिखाण चालू आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचा वनस्पतीशास्त्रातील प्रदीर्घ अनुभव पाहता, ते शिक्षण संबंधित राज्य आणि देश पातळीवरील अनेक संस्थांशी संबंधित आहेत. त्यांच्या एकूण कामाची व्याप्ती पहाता, आत्तापर्यंत २०० हून अधिक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे यात त्यांनी भाग घेतला आहे, रिसर्च पेपर सादर केले आहेत आणि व्याख्याने दिली आहेत.
भारतीय वनस्पतीशास्त्रातील ‘एनजीओस्पर्म’ या शाखेच्या संस्था, ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था’ कोलकत्ता, इंडियन असोसिएशन ऑफ अॅन्जीओस्पर्म टॅक्झोनॉमी, कालिकत विद्यापीठ आणि ‘ऑर्किड सोसायटी, पंजाब विद्यापीठ अशा अनेक राष्ट्रीय संस्थांचे ते आजीव सभासद आहेत. जैवविविधता रक्षणासाठी लोकजागृती करणे, ह्या त्यांनी घेतलेल्या ध्यासामुळे त्यांनी वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांमधून खास करून मराठीत, आतापर्यंत दोन हजारांहून जास्त लेख लिहिले आहेत, हे कौतुकास्पदच आहे.
निसर्गसंवर्धन, पर्यावरण, जैवविविधता, औषधी वनस्पती व त्यांचे जतन या विषयावर त्यांनी, राज्यातील आणि शेजारील राज्यांतील शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था शासकीय आस्थापना येथे गेल्या ४० वर्षात अनेक व्याख्याने दिली असून, यांची संख्याही सहज जवळपास दोन हजारांच्या आसपास आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा फायदा अनेक पातळ्यांवर वेळोवेळी महाराष्ट्र शासन, वनविभाग, महानगरपालिका आणि शैक्षणिक संस्थांनी घेतला आहे. त्यांनी ‘जैवविविधतातज्ज्ञ’ म्हणून काही प्रमुख विज्ञान आधारित प्रकल्पांवर सहसंशोधक लेखक म्हणूनही काम केले आहे. त्यात ‘कुमार विज्ञान विश्वकोष’, ‘सह्याद्री पर्यावरण संवेदनाक्षम क्षेत्र’, ‘पश्चिम घाटातील जागतिक वारसा स्थळे’ इत्यादी प्रस्तावांचा अंतर्भाव आहे. यात सहसंशोधक लेखक म्हणून मलाही योगदान करण्याची संधी मिळाली आहे.
सध्या प्रा. बाचूळकर ‘निसर्ग अंकुर’ या जैवविविधता संवर्धन आणि आयुर्वेद प्रसार या विषयी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत. हे सर्व कार्य करत असताना साहजिकच प्रसारमाध्यमांत उदा. आकाशवाणी, एफएम रेडिओ, टीव्ही चॅनल वर मुलाखती, चर्चा, वाचन यातही ते नेहमीच कार्यरत असतात. साहजिकच राज्यातील समविचारी आणि निसर्गप्रेमी मान्यवर व्यक्तीचा त्यांना नेहमीच सहवास लाभला आहे. प्रा. बाचूळकर यांना मिळालेले २६ विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे त्यांच्या दीर्घ व्यासंगाची पावती देतात..
माझे, प्रा. बाचूळकर यांच्यांशी असलेले संबंध हे आम्ही समविचारी आणि एकाच क्षेत्रात उदाहरणार्थ जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण रक्षण यात असल्याने गेल्या ४० वर्षापेक्षाही जास्त काळ आम्ही एकत्रित आहोत. या निमित्ताने अनेक प्रकल्प अभ्यासात, मोहिमेत, आंदोलनात, एकत्र काम करण्याची संधी मिळाली. प्रा. माधव गाडगीळ यांनी आयोजित केलेल्या संपूर्ण पश्चिम घाटातील सहा राज्यांतील निवडक संशोधकांना घेऊन केलेल्या केरळ व कर्नाटक राज्यांतील घनदाट जंगलातील कॅम्पमध्ये माझ्या टीममध्ये डॉ. बाचूळकर होते. तसेच पश्चिम घाट वाचवा मोहिम, राधानगरी अभयारण्य परिसरातील खाणकाम, विश्व प्रकृती निधी, कोल्हापूरचे काम, वारणा खोऱ्याचा पर्यावरणीय अभ्यास, नव महाबळेश्वर प्रकल्प इ. अनेक प्रकल्पांवर आणि वैचारिक चळवळींमध्ये आम्ही एकत्र काम केले असून, अजूनही आम्ही सह्याद्रीतील पर्यावरण रक्षण आणि जैवविविधता जतन आणि संवर्धन यात कार्यरत आहोत.
डॉ. बाचूळकर आणि मी असे आम्ही दोघेही सेवानिवृत्तीनंतर पर्यावरण रक्षण अशा मूलभूत आणि भविष्यात मानवी अस्तित्वासाठी अत्यावश्यक निसर्ग रक्षण ह्या विषयात कार्यमग्र आहोत. आमचा हा मैत्रीचा एकसंध प्रवास दक्षिण महाराष्ट्रातील सह्याद्रीतील महत्त्वाच्या परिसंस्था आणि त्यातील जैवविविधता यांचे लोक सहभागाद्वारे रक्षण, संवर्धन आणि जतन करणे या पातळीवर घनिष्ठ राहिलेला आहे. अनेक अभ्यासात स्थानिक लोकांशी संबंध, विचारांची देवाण- घेवाण घट्ट झाली आहे. सह्याद्रीतील निसर्ग वाचवण्यासाठी डॉ. बाचूळकर हे झपाटून काम करतात. वयाच्या सत्तरीतही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही.
आज सर्वत्र बोकाळलेला बेगडी किंवा भ्रामक विकास, चिरंतन विकासाच्या नावाखाली होणारी अशाश्वत वाढ आणि त्यासाठी होणारा निसर्गाचा अनिबंध विनाश याची जाणीव ठेवून स्थानिक जनतेचे अनिश्चित भवितव्य यांचा विचार करता, नागरिकांनी आणि शासनाने कोणत्याही परिस्थितीत स्थानिक निसर्गाचे आणि त्यातील जैवविविधतेचे रक्षण करणे हे आर्थिक फायद्यासाठीच नाही, तर मानवी अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे, याची जाण यावी यासाठी डॉ. बाचूळकर अथक प्रयत्न करत आहेत. अशा या खऱ्या निसर्ग दूताला माझा सलाम आणि शुभेच्छा. त्यांना हे कार्य करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.
या निसर्ग अभ्यासकाचे जीवनकार्य “निसर्ग दूत’ या पुस्तकात मुद्देसुदपणे मांडून, भावी पिढीला आणि निसर्ग प्रेमी जाणकार वाचकांना अमूल्य अशी भेंट देणाऱ्या डॉ. मधुकर येवलुजे या लेखक मित्राचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन !
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
