March 19, 2024
spirtual-article-by-rajendra-ghorpade
Home » अती तेथे माती…
विश्वाचे आर्त

अती तेथे माती…

मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे, याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधना करायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विंष ।। २२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, जगण्याला कारण जें अन्न, तें खात असतांना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले असतां, तें अन्न विषासारखे मारक होते.

कोणतीही गोष्ट अती केली की त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. जेवण सुद्धा प्रमाणातच जेवायला हवे. अन्यथा अपचन होते. अती अभ्यासामुळे परीक्षेत नापास झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पिकांना रासायनिक खत अधिक दिल्यास पिके जळून जातात. पाणी अधिक दिल्यास पिकांची वाढ खुंटते. यासाठी कोणतीही गोष्ट प्रमाणातच असायला हवी.

प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण हे आहेतच. निसर्गाची ती देणगीच आहे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा व्हायला नको. निसर्गाचे नियम हे तोडता येत नाहीत. निसर्गापुढे मनुष्य काहीही करू शकत नाही. शोध कितीही लागले, प्रगती कितीही केली तरी निसर्गाच्या शक्तीशी वैर करून चालत नाही. त्या शक्तीचा योग्य उपयोग करून घ्यायला शिकले पाहिजे. पाऊस पडतो, पण या पडणाऱ्या पावसाचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. कधी पाऊस अधिक पडतो, तर कधी पडतच नाही, पण पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब हा मातीत जिरवायला हवा. तो साठवता यायला हवा. भूगर्भातील पाण्याचा साठाच पृथ्वीला थंडावा देत राहातो. अन्यथा भुकंपासारख्या आपत्ती अद्भवतात.

नैसर्गिक पावसावरच आपले जीवन अवलंबून आहे. तो ठेवा जपायला हवा. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याची कारणे शोधायला हवीत. तेथील वृक्षसंपदा जपायला हवी. जगाचे तापमान वाढत आहे. ते का वाढत आहे, या मागची कारणे शोधायला हवीत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण वाढत आहे. ते रोखायला हवे. निसर्गाच्या नियमांचा आपल्या जीवनात लाभ उठवता यायला हवा. निसर्गाच्या प्रकोपालाही मानवी चुका तितक्याच कारणीभूत आहेत, हे विसरता कामा नये.

मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे, याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधना करायला हवी.

Related posts

छंदातून आनंदाची बाग फुलवणार्‍या कविता

संत साहित्य पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठवा

आत्मज्ञान प्राप्तीचा भक्ती हाच सोपा मार्ग

Leave a Comment