कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारासाठी यंदा पुण्याचे प्रख्यात कवी अरुणचंद्र गवळी आणि वसईचे युवा कवी फेलिक्स डिसोजा यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या (१५ नोव्हेंबर) करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी विभागाचे प्रमुख रणधीर शिंदे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. (डॉ.) माया पंडित तर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत अजय कांडर (कणकवली) व आदित्य काळसेकर (मुंबई) यांचा समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठातील गणित विभागातील रामानुजन सभागृहात शनिवारी ( १५ नोव्हेंबर ) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. साहित्यप्रेमी विद्यार्थी, प्राध्यापक व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रा. रणधीर शिंदे व प्रा. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.
फेलिक्स डिसोजा यांचा अल्प परिचय
फेलिक्स डिसोजा यांचे प्राणातले दिवे, नोंदीनांदी, आरशात ऐकू येणारं प्रेम हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. साहित्य अकादमी, दिल्ली दिबृगड युनिव्हर्सिटी आसाम येथे आयोजित Young writer Festival या कार्यक्रमात ते निमंत्रित कवी होते. तसचे साहित्य अकादमी आयोजित युवा काव्योत्सव, पश्चिमी साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडी आणि बेळगाव, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ आयोजित कविसंमेलनात ते निमंत्रित कवी राहीले आहेत. वसईतल्या साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणीय चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विविध सामाजिक विषयावर पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. वसईत ‘साहित्य संप्रेषण’ या साहित्यिक उपक्रमातून साहित्य चळवळीत त्यांचा सहभाग असतो. ‘व’ या साहित्यविषयक नियतकालिकाचे ते संपादकही आहेत.
कवी अरुणचंद्र गवळी यांचा अल्प परिचय
मराठीतील एक अत्यंत महत्त्वाचे कवी म्हणून अरुणचंद्र गवळी यांची ओळख आहे. प्रसिद्धीपासून तसेच साहित्याच्या बाजारी व्यवस्थेपासून दूर राहाणारा असा हा कवी आहे. गेली ३५ वर्षे अतिशय निष्ठेने साहित्य क्षेत्रात अरुणचंद्र हे कार्यरत आहे. मानवी मुल्याला अधिक स्थान देणे आणि भेदाच्या पलिकडे माणसाला पाहाणे या संदर्भात त्यांची कविता भाष्य करते. मराठी कवितेला अपरिचित असणारे जग, अनुभवविश्व हे त्यांच्या कवितेत आढळते. त्यांनी लिहिलेली एकूणच कविता ही स्त्री-पुरुष, तृतियपंथी या सगळ्या लैंगिक भेदाच्या पलिकडे जाऊन या तीनही मानवी अस्तित्वाला एका समान तराजूत जोकत असल्याने या कवितेचे भविष्य अधिक उज्ज्वल आहे.
या पुरस्काराने माझ्या जबाबदारीत वाढ झाली आहे. अजुन चांगली गंभीर कविता लिहीता यावी यासाठी या पुरस्काराने प्रेरणा मिळते आहे. विशेष म्हणजे माझ्या पहिल्या कवितेला काळसेकर यांनीच प्रसिद्धी दिली होती. ऋत्विज काळसेकर यांच्या कविता ह्या गंभीर स्वरुपाची आहे. त्यांच्या कविता आणि माझ्या कविता यांची प्रवृत्ती ही जुळणारी आहे. एकूणच साहित्याकडे गांभिर्याने पाहणाऱ्या कविंच्या नावे हा पुरस्कार दिला जात आहे ती अत्यंत महत्त्वपूर्व घटना आहे.
फेलिक्स डिसोजा
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
