नांदेड – येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक डॉ. माधव जाधव यांनी दिली.
समकाळातील लेखकांच्या लेखनाचा उचित सन्मान व्हावा व त्यांच्या लेखणीतून सकस साहित्यनिर्मिती व्हावी या हेतूने आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्काराची सुरुवात मागील वर्षी करण्यात आली. यावर्षी पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून एकूण १०९ साहित्यिकांच्या १३० साहित्यकृती (कविता, कथा, कादंबरी, बालसाहित्य) प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ११३ साहित्यकृती (१८ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, ४९ कवितासंग्रह, ३२ बालसाहित्य) परीक्षणास पात्र होत्या.
पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या साहित्यकृतीतील आशय, आविष्कार, भाषाशैली, मुल्यात्मकता, निर्मिती मूल्य, मुखपृष्ठ आणि कलाकृतीचा एकात्म परिणाम या मूल्यमापन निकषांच्या आधारे सन्माननीय परीक्षकांनी मूल्यमापन केले. पुरस्कारासाठी एकच साहित्यकृती निवडायची असल्याने हे मूल्यमापन दोन टप्प्यात करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात बालसाहित्य या वाङ्मयप्रकारातील कलाकृतींचे परीक्षण महाराष्ट्रातील प्रख्यात कवी, समीक्षक व पुणेस्थित डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी, कादंबरी वाङ्मयप्रकारातील कलाकृतींचे परीक्षण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या मराठी विभागातील प्राध्यापक व लेखक, साहित्याचे चिकित्सक अभ्यासक डॉ. माधव पुटवाड, कवितासंग्रहातील कलाकृतींचे परीक्षण हे महाराष्ट्रातील महत्वाचे समीक्षक व कवी डॉ. कमलाकर चव्हाण मराठी विभागप्रमुख श्री योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत, जि. हिंगोली यांनी आणि कथा वाङ्मयप्रकारातील कलाकृतींचे परीक्षण जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय बरबडा, जि. नांदेड येथील व्यंकटेश सोळंके यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात कथा विभागातून हंसराज जाधव यांचा मोहरम हा कथासंग्रह प्रथम आला आहे. कादंबरी विभागातून गंगाधर गायकवाड यांची धूळधाण ही कादंबरी प्रथम आली आहे. कविता या वाङ्मय प्रकारातून किरण भावसार यांची घामाचे संदर्भ हा कवितासंग्रह प्रथम आला आहे. बालसाहित्य या प्रकारातून मोहन काळे यांचा एकदा आपणच व्हावे मोर हा बालकवितासंग्रह प्रथम आला आहे. परिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात या सर्वप्रथम आलेल्या चारही कलाकृतींचे सर्व परीक्षकांनी पुन्हा परीक्षण करून पुरस्कारासाठी एका कलाकृतीची निवड केली आहे.
परीक्षणाच्या अंतिम टप्प्यात सर्व परीक्षकांच्या परीक्षणातून हंसराज जाधव यांचा मोहरम हा कथासंग्रह ‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५’ साठी निवड केली आहे. पुरस्काराचे स्वरूप रु. ५०००/- रोख, सन्मानपत्र आणि सन्माचिन्ह असे आहे.
कादंबरी विभागातून गंगाधर गायकवाड यांची धूळधाण ही कादंबरी, कविता विभागातून किरण भावसार यांचा घामाचे संदर्भ हा कवितासंग्रह आणि बालसाहित्य विभागातून मोहन काळे यांचा एकदा आपणच व्हावे मोर हा बालकवितासंग्रह प्रथम आल्यामुळे त्यांचा पुरस्कार प्रदान सोहळ्यात रु. २०००/- रोख, सन्मानपत्र व सन्माचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक माधव जाधव यांनी दिली.
