आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन तयार असतो ! पण स्वतःच्या मनात काय चाललंय, याची माहिती मात्र त्याला नसते. हीच खरी अडचण आहे.
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि घाले ।
जे शांतीसि आले । पालव नवे ।। १९० ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा
ओवीचा अर्थ – ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णता जेवून तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतिरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत.
ज्ञानेश्वरीची ओवी वाचताना अनेकांना दोन गोष्टी लगेच सुचतात, एक म्हणजे “हे आपल्याला समजणार नाही” आणि दुसरी म्हणजे “हे खूप मोठं काहीतरी आहे.” पण खरं सांगायचं तर संत ज्ञानेश्वरांनी एवढं सोपं करून सांगितलंय की, आपणच ते अवघड करून घेतो. आता हीच ओवी घ्या “ज्ञानगंगे नाहाले…” ऐकायला किती छान ! पण लगेच आपल्या डोळ्यासमोर काशी, घाट, गंगेचं पाणी आणि स्नान करणारे भक्त असे सिनेमॅटिक दृश्य उभं राहतं. आणि आपण मनात म्हणतो, “हे आपल्याकडचं काम नाही !”
पण संतांचा हेतू थोडासा वेगळाच आहे. ते म्हणतात, “अहो, गंगेत नाहायचं म्हणजे फक्त शरीर धुवायचं नाही, थोडं मनही धुवा की !” आता आपल्या रोजच्या आयुष्याचा विचार केला, तर आपण शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी किती काळजी घेतो. सकाळी उठलो की ब्रश, मग अंघोळ, मग परफ्यूम… अगदी व्यवस्थित ! पण मनासाठी आपण काही ‘डेली हायजीन रूटीन’ ठेवलंय का ? मनाला ब्रश करायचा, त्याला साबण लावायचा, असं काही आहे का ? नाही ना !
मनाचं काय असतं, ते अगदी जुन्या कपाटासारखं असतं. बाहेरून पॉलिश केलेलं, पण आत उघडलं की जुन्या वस्तूंचा पसारा ! कुठे राग, कुठे मत्सर, कुठे जुने दुखरे प्रसंग सगळं साठवून ठेवलेलं. आणि आपण मात्र बाहेरून हसतमुख ! अशा वेळी संत म्हणतात, “अहो, त्या कपाटाला जरा साफ करा. ज्ञानाच्या पाण्याने धुवा.”
आता “ज्ञानगंगा” म्हणजे काय? तर ती काही नकाशात सापडणारी नदी नाही. ती म्हणजे आपलं समज, आपला विवेक, आपली जाणीव. आजकाल आपल्याकडे माहितीचा एवढा पूर आलाय की, गंगा काय आणि नाला काय, सगळं एकच वाटायला लागलंय. मोबाईल उघडला की ज्ञानाचा नव्हे तर नोटिफिकेशनचा पूर येतो. पण त्यातून खरं ज्ञान किती आणि गोंधळ किती, हे ओळखण्याची ताकद म्हणजेच ज्ञानगंगा. आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन तयार असतो ! पण स्वतःच्या मनात काय चाललंय, याची माहिती मात्र त्याला नसते. हीच खरी अडचण आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, “पूर्णता जेऊनि घाले.” आता आपल्याकडे जेवण हा फार महत्त्वाचा विषय आहे. मराठी माणूस आणि जेवण ही जोडी अगदी राम-सीतेसारखी ! पण आपण जेवताना एक गोष्ट लक्षात येते, पोट भरलं की आपण थांबतो. पण मनाचं काय ? मनाचं पोट कधी भरतंच नाही. अजून थोडं, अजून थोडं, अशी त्याची सतत मागणी !
आपण एखादं नवीन मोबाईल घेतो, दोन दिवस खूप आनंद होतो. तिसऱ्या दिवशी त्यात काहीतरी कमी वाटायला लागतं. मग नवीन मोटार, नवीन घर, नवीन काहीतरी… ही धावपळ कधीच संपत नाही. कारण आपण शरीराला जेवण देतो, पण मनाला नाही. मनाला जेवण म्हणजे समाधान, कृतज्ञता आणि शांतता.
“आपला माणूस हा ‘बफे’मध्ये गेल्यावर जसा वागतो, तसाच आयुष्यात वागतो. सगळं घ्यायचं, पण काय खायचं ते ठरवायचं नाही !” आणि मग शेवटी पोट बिघडतं! आयुष्याचंही तसंच होतं. आपण सगळं मिळवण्याच्या नादात स्वतःलाच हरवतो.
आता “शांतीसि आले, पालव नवे” ही ओवीची शेवटची ओळ. किती सुंदर प्रतिमा आहे ! शांतीला वेल समजलंय आणि आपण त्या वेलीची कोवळी पानं आहोत. पण ही वेल वाढण्यासाठी काय लागतं ? तर योग्य माती, पाणी आणि काळजी. मनाच्या बाबतीतही तसंच आहे. जर मनात सतत ताण, स्पर्धा, आणि तुलना असेल, तर शांतीची वेल कशी वाढणार ?
आपल्या आयुष्यात एक गंमत असते, आपण शांती शोधायला खूप लांब जातो. कधी एखाद्या हिल स्टेशनला, कधी एखाद्या आश्रमात. पण शांती ही काही “लोणावळा पॅकेज” नाही की विकत मिळेल ! ती आपल्या आतच असते. फक्त आपण तिच्याकडे लक्ष देत नाही.
आता गंगेत स्नान करण्याचा विषय. आपल्याकडे अनेक जण श्रद्धेने गंगेत स्नान करतात. त्यात काहीच चुकीचं नाही. पण संत म्हणतात, “अहो, गंगेत नाहा, पण मनातला कचरा तिथेच टाकून या !” नाहीतर काय होतं, आपण गंगेत नाहतो आणि परत येताना तोच राग, तोच अहंकार, तोच मत्सर सोबत घेऊन येतो. म्हणजे काय, तर शरीर स्वच्छ आणि मन तसंच !
“आपण अंघोळ करून बाहेर आलो, पण मनाने अजूनही कालच्याच चिखलात लोळत आहोत !” ही अवस्था बदलायला हवी. ज्ञानगंगेत स्नान करायचं म्हणजे काय? तर थोडं थांबणं, स्वतःकडे पाहणं, आणि स्वतःला समजून घेणं. रोज पाच मिनिटं जरी आपण शांत बसलो, आपल्या विचारांकडे पाहिलं, तरी खूप फरक पडतो. पुस्तक वाचणं, चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं, आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं ही सगळी ज्ञानगंगेचीच रूपं आहेत.
आपण सगळेच काही ना काही शोधत आहोत. सुख, समाधान, शांती. पण हा शोध बाहेर न करता आत केला, तर उत्तर लवकर मिळेल. संतांचा संदेश अगदी साधा आहे. “मन शुद्ध करा, बाकी सगळं आपोआप ठीक होईल.”
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा

वाणी म्हणजे साक्षात ज्ञानाची गंगा