- जयश्री कुलकर्णी अंबासकर व वैशाली भागवत यांना ‘मेघदूत’ पुरस्कार जाहीर
- 14 जुलै रोजी होणार वितरण
बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने दरवर्षी कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी जयश्री कुलकर्णी अंबासकर व वैशाली भागवत यांची निवड झाल्याची माहिती कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली.
गेली एकतीस वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने मंडळाच्या वतीने दरवर्षी नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार या वर्षी जयश्री कुलकर्णी अंबासकर (नागपूर) यांच्या ‘चिंब सुखाचे तळे’ या संग्रहाची तर वैशाली भागवत (बडोदा) यांच्या ‘ भावमंजिरी ‘ या संग्रहाची मेघदूत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हे मेघदूत पुरस्कार साहित्यिक पं. ना. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कवी मुकुंदराज कुलकर्णी यांच्यावतीने व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.
रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून याचवेळी सामाजिक कार्याबद्दल ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी या संस्थेस सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. काव्यलेखन स्पर्धेचे पुरस्कार हे कै.मारूती त्रिंबक घावटे यांच्या स्मरणार्थ आबासाहेब घावटे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.
रविवार दि 14 जुलै रोजी मातृमंदिर, ढगे मळा, बार्शी येथे सायं 6 वाजता न. पा. शिक्षण प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कथालेखक हरिश्चंद्र पाटील व लेखक अंकुश गाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.
यावेळी दत्ता गोसावी, प्रा अशोक वाघमारे, सुमन चंद्रशेखर, डॉ कृष्णा मस्तुद, जयसिंग राजपूत, चन्नबसवेश्वर ढवण, आबासाहेब घावटे, डॉ रविराज फुरडे, शिवानंद चंद्रशेखर, गंगाधर अहिरे, अर्चना देशपांडे – पोळ आदी उपस्थित होते.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
