दिवाकर कृष्ण आचार्य, अनंता सूर यांच्यासह पाच साहित्यिकांचा होणार सन्मान; पुणे येथे होणार वितरण सोहळा
गुहागर/चिपळूण: साहित्य, संवेदना आणि सर्जनशीलतेचा गौरव करणाऱ्या गुहागर ( जि. रत्नागिरी ) येथील ‘पसायदान प्रतिष्ठान’च्या वतीने सन २०२५ चे मानाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रतिष्ठानचे हे ११ वे वर्ष असून, यंदा उत्कृष्ट कादंबरी, कथासंग्रह आणि कवितासंग्रह अशा विविध श्रेणींमध्ये पाच प्रतिभावंत साहित्यिकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पसायदान प्रतिष्ठानचे संयोजक व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी दिली आहे.
यंदाचे पुरस्कार प्राप्त साहित्यिक:
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये स्मृतीशेष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. भारत सासणे उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार अनंता सूर यांच्या ‘खांदे मळणी’ या संग्रहास देण्यात येणार आहे. तसेच, पसायदान राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कारासाठी तीन कवींची निवड करण्यात आली आहे. यात चंद्रकांत बाबर (‘यास्मिन आणि इतर दीर्घ कविता’), सोनिया पाटील (‘थिजलेल्या माणुसकीचा गहिवर’) आणि रचना (‘पुष्पॠचा’) यांचा समावेश आहे.
पुणे येथे रंगणार वितरण सोहळा:
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ३,००० रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. या पुरस्कारांचे वितरण लवकरच पुणे (पिंपरी) येथे एका दिमाखदार सोहळ्यात पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ समीक्षक व कवी दा. गो. काळे, आणि शब्दधन साहित्य मंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
अक्षरयात्रेतील शब्दांचा सन्मान आणि साहित्याचा हा दैदिप्यमान उत्सव यशस्वी करण्यासाठी पसायदान प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रयत्नशील असून, या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
