fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 11, 2026
Home » बंगालची वाघीण एकाकी…ममता बॅनर्जींच्या राजकीय साम्राज्याला भगदाड Mamata Banerjee Political Controversy
सत्ता संघर्ष

बंगालची वाघीण एकाकी…ममता बॅनर्जींच्या राजकीय साम्राज्याला भगदाड Mamata Banerjee Political Controversy

After electoral defeat and rebellion within TMC, Mamata Banerjee faces political isolation as BJP's strategy reshapes opposition politics ahead of 2029.

स्टेटलाइन

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उफाळलेल्या बंडामुळे ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व अभूतपूर्व संकटात सापडले आहे. आमदार-खासदारांच्या फुटीमागे भाजपाची रणनीती असल्याचा आरोप होत असून, विरोधी पक्षांना कमकुवत करण्याच्या राष्ट्रीय राजकारणाचा हा नवा अध्याय मानला जात आहे.

– डॉ. सुकृत खांडेकर

भाजपा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आठ जून २०२६ रोजी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब मधे झाली. या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांचा भाजपाप्रणित एनडीएला पाठिंबा असे वृत्त टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांवरून झळकू लागले. इंडियाच्या बैठकीला तो एकप्रकारचा अपशकूनच होता. इंडिया आघाडीच्या बैठकीपेक्षा तृणमूल काँग्रेसला संसदेत भगदाड या वृत्ताला सकाळी सकाळीच ठळक प्रसिध्दी मिळू लागली. पश्चिम बंगालमधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा भाजपाने दारूण पराभव केला. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचाही त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपाने पंधरा हजार मतांनी पराभव करून दाखवला. त्यांचा पराभव करणाऱ्या व त्यांचेच एकेकाळी निकटवर्तीय असलेल्या सुवेंधु अधिकारी यांना भाजपाने मुख्यमंत्री करून ममता यांच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. एवढेच नव्हे तर तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या ८० पैकी ५८ आमदारांनी निकालानंतर महिन्याच्या आत बंडाचा झेंडा फडकवला. पक्षातील सर्वाधिक आमदार आमच्याबरोबर आहेत असे सांगून, आम्हीच तृणमूल काँग्रेस, असा दावा बंडखोरांनी केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालमधेही विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा दावा मान्य केला व विरोधी पक्षनेतेपदही बंडखोरांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला बहाल केले.

तृणमूल काँग्रेसमधे ही केवळ फूट नव्हती तर महाराष्ट्राप्रमाणेच भाजपाच्या मार्गदर्शनाखाली व संरक्षणाखाली ममता बॅनर्जी यांना राजकारणातून हद्दपार करण्याची रणनिती होती. तृणमूल काँग्रेसची तोडफोड प. बंगाल विधानसभेपुरतीच मर्यादीत नव्हती तर लोकसभा व राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या बहुसंख्य खासदारांनीही भाजपाच्या छत्राखाली असलेल्या एनडीएला आठ जूनला पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीत मतदारांनी ममता यांना नाकारले किंवा अद्दल घडवली हे समजू शकते. पण त्यांनी स्थापन केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आमदार – खासदारांनी त्यांच्या नेतृत्वाला आवाहन देणे हे केंद्रातील भाजपाच्या मदतीशिवाय व संरक्षणाशिवाय शक्य होते का ? कोलकत्त्याच्या रस्त्यावर आंदोलने करणारी, पोलिसांच्या अनेकदा लाठ्या खाऊन रक्तबंबाळ झालेली, पश्चिम बंगालमधे सलग तीस वर्षाची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची उलथवून टाकणारी, काँग्रेस पक्षात बंडाचा झेंडा फडकवून तृणमूल काँग्रेस हा राजकीय पक्ष स्थापन करणारी आणि पंधरा वर्षे सलग तृणमूल काँग्रेसचे सरकार मुख्यमंत्री म्हणून चालविणारी ममता ही बंगालची वाघीण म्हणून देशभर ओळखली जात असे.

पंचवीस ते तीस वर्षे ज्यांनी ममता यांना साथ दिली तेच त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देत आहेत. ममता या वयाने ७४ वर्षाच्या आहेत. बंगालमधे डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपाला हादरे देणारी, केंद्राच्या बलाढ्य ताकदीपुढे कधिही मान न तुकविणारी आणि मुख्यमंत्री असतानाही कोलकत्यातील काली घाटमधे लहानशा जुन्या घरात राहणारी, बंगालमधे पाच दशके लढाऊ नेतृत्व गाजवणारी बंगालची वाघीण भाजपाच्या रणनितीपुढे आज एकाकी पडली आहे. सर्वात कहर म्हणजे, बंडखोरी हा तृणमूल काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा काय संबंध असा प्रश्न भाजपाचे नेते विचारत आहेत…
आठ जून ला सकाळी दिल्लीतील ९ मोतीलाल नेहरू मार्ग, या बंगल्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची बैठक झाली. केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांचे हे सरकारी निवासस्थान आहे.

एका केंद्रीयमंत्र्यांच्या घरीच तृणमूल काँग्रसचे पंधरा खासदार जमतात व त्यानंतर पक्षाच्या वीस खासदारांचा पाठिंबा एनडीएला असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देतात. या सर्व तोडफोड नाट्यामागे कोण आहे , हे आता वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपाने शिवसेना फोडली तेव्हा देवेंद्र फडणवीस अंधाऱ्या रात्री वेश बदलून गॉगल लावून एकनाथ शिंदे यांना भेटायला जात असत. मुंबई, सुरत, गुवाहटी, गोवा असा प्रवासाचा मार्ग हा काय एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखला होता काय ? पण त्याची बाहेर वाच्यता झाली नव्हती. पण तृणमूल काँग्रेस तोडफोडीच्या बैठका आता दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी होत असतील तर बंडखोरांना कोणाचा आशीर्वाद आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तृणमूल काँग्रेस हा संसदेतील मोठा विरोधी पक्ष आहे. केंद्रीय मंत्र्याच्या घरी तेरा खासदार गेले की वीस या संख्येला फारसे महत्व नाही. विधानसभेनंतर संसदेतही ममता यांच्या नेतृत्वाला त्यांच्याच पक्षाच्या आमदार- खासदारांनी आव्हान दिले यामुळे ममता यांची चिंता वाढली आहे.

ममता यांचा पराभव झाल्यानंतर व त्यांच्या पक्षाने सत्ता गमावल्यानंतर त्यांचे घर फिरले व पाठोपाठ वासे फिरू लागले. ममता या हाडाच्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्या होत्या. पण राज्यात सत्ता मि‌ळाल्यापासून त्या बदलल्या असे टीकाकार सांगत आहे. त्या स्वत: अहंकारी बनल्या. त्यांच्या पक्षाचा व त्यांचा झालेला पराभव म्हणजे अहंकार, भ्रष्टाचारदहशतवाद यांचा नायनाट करण्यासाठी मतदारांनी दिलेला कौल आहे असे भाजपा सांगत आहे. राजकारणात ममता यांचे टार्गेट मोदी होते, त्या नेहमीच मोदी-शहांना जाहीर आव्हान देत असत. आता मोदी- शहांनी त्यांना राजकीय टार्गेट केले आहे. हा काळाने ममता यांच्यावर उगावलेला सूड आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जे बंडखोर आज ममता यांच्या विरोधात गेले आहेत व भाजपाच्या वळचणीला गेले आहेत, ते धुतल्या तांद‌ळासारखे आहे का ? अनेक बंडखोर हे धनाढ्य आहे.

अनेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. ममता यांच्या पुण्याईवर निवडून यायचे व नंतर सत्तेच्या संरक्षणाखाली हात धुवून घ्यायचे असे अनेक आहेत. त्यांना आता भाजपाच वाचवू शकते. चौकशीच्या नोटीसांपासून सुटका हवी असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना कळून चुकले आहे. गेली पंधरा वर्षे याच बंडखोरांनी सत्तेचे लाभ घेतले. कमाई केली, दहशत – दादागिरीतून खूप काही साध्य केले, आता हेच लोक ममता यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप करीत आहेत. ममता यांच्या हुकूमशाही व एकाधिकारशाहीवर हल्लाबोल करीत आहेत. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांची राजवट देशातील जनतेने उलथवून टाकली होती, जनता पार्टी अंतर्गत कलहाने बदनाम झाली तेव्हा त्या पक्षालाही जनतेने सत्तेवरून हटवले, बंगालमधील डाव्या पक्षांची मक्तेदारी असो किंवा दिल्लीतील केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे सरकार, मतदारांनीच सत्तेवरून हटवले.

भाजपाचे एकेकाळचे विरोधक नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांनाही सत्तेसाठी भूमिका बदल्याव्या लागल्या, तामिळनाडूत द्रविड पक्षांच्या संघर्षात विजय यांच्या पक्षाने बाजी मारली, उत्तर प्रदेश – बिहारमधे मुलायम किंवा लालू यांची मक्तेदारी जनतेने संपवली, अशी अनेक उदाहरणे देता येतील. ममता यांनाही बंगालमधे मतदारांनी नाकारले पण पराभवानंतर त्यांचे नेतृत्व झुगारून देण्याची पक्षाच्या आमदार- खासदारांमधे शर्यत सुरू झाली हे मात्र भयावह आहे. यापुर्वी शरद पवार, उध्दव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या पक्षात झालेल्या तोडफोडीचा फटका बसला. आता या मालिकेत ममता बॅनर्जी सापडल्या आहेत. एकेकाळी इंडिया आघाडीत असलेले नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते होण्याचे स्वप्न बघत होते. या सर्वाची अवस्था भाजपाने कमजोर नि दयनीय करून टाकली आहे. २०२९ मधे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षाला कमजोर करण्याची रणनिती भाजपाची आहे. प्रादेशिक पक्ष खच्ची करण्यात येत आहेत. एनडीतील मित्र पक्षांना आपल्यावर अवलंबून राहावे लागेल अशी व्यवस्था आहे. ममता राजकारणात आज एकाकी पडल्या आहेत, हा भाजपाने विरोधी पक्षांना दिलेला इशारा आहे.

Related posts

पवारांचे गेम प्लॅन ( वरकडी)

सर्व आरोपी निर्दोष, मग बॉम्बस्फोट घडवले कोणी ?

संसदीय कामकाजावर आघात

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!