!-- afp header code starts here -->
April 21, 2026
rajendra-ghorpade-article-on-best-devotee
Home » श्रेष्ठ भक्त कोणास म्हणावे ?
विश्वाचे आर्त

श्रेष्ठ भक्त कोणास म्हणावे ?

सद्गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्याही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायच्या, याबाबत मागदर्शनही करीत असतात; पण सद्गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्ती दृढ व्हावी, हा असतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 9011087406

यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानी ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा

ओवीचा अर्थ – याप्रमाणें जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो.

संतांकडे अनेक जण जात असतात. प्रत्येकाचा भक्तीचा, श्रद्धेचा मार्ग वेगळा असतो. कोण स्वतःच्या घरगुती अडचणी सोडविण्यासाठी संतांकडे जात असतो, तर कोण विविध कामे मिळावीत, या आशेने जात असतो. सद्गुरूंच्या दर्शनाने आपले कष्ट दूर होतात, समस्या सुटतात, असा त्यांचा समज असतो. सद्गुरूंचे उपदेश ते घेत असतात. यामुळे त्यांची प्रगती होते. साहजिकच भक्ती दृढ होते. विश्वास वाढतो.

सद्गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्याही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायच्या, याबाबत मागदर्शनही करीत असतात; पण सद्गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्ती दृढ व्हावी, हा असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी भौतिक प्रगतीही आवश्यक आहे. संसार आणि परमार्थ एकाच वेळी करत असताना भक्ताची भौतिक प्रगती असेल, तरच त्याचे मन अध्यात्मात रमेल, हे सद्गुरूंना माहीत असते; पण अनेक भक्तांचा तसेच व्यक्तींचा याबाबत गैरसमज असतो.

अनेक व्यक्ती या भौतिक सुखासाठीच सद्गुरूंचा वापर करून घेतात. अशा वेळी त्यांच्यातील अहंकार जागृत झाला तर मात्र भक्ती संपते. यासाठी सद्गुरू भक्ताला भौतिक प्रगतीसाठी मदत का करतात, हे जाणून घेणे गरजेचे आहे. सद्गुरूंचा श्रेष्ठ भक्त कसे होता येते, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सद्गुरू श्रेष्ठ भक्त कोणास समजतात, हे समजून घ्यायलाच हवे.

सद्गुरूंच्या ठिकाणी मन ठेवून, नित्य युक्त होऊन, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे भक्त सद्गुरूंची उपासना करतात ते सर्वांत उत्कृष्ट योगी आहेत, असे सद्गुरू समजतात. जे भक्त सद्गुरूंना आपला आत्मभाव देतात, त्यांनाच सद्गुरू श्रेष्ठ भक्त मानतात. यासाठी सद्गुरूंच्याकडे आत्मज्ञानी होण्यासाठी जावे. भौतिक प्रगतीसाठी सद्गुरूंचा वापर करणे योग्य नाही. आध्यात्मिक प्रगतीसाठीच सद्गुरू आहेत.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे संत साहित्य पुरस्कार जाहीर

हजरत पीर याकुतबाबा यांचा उरूस साजरा

गावाच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज – गावकुसाची कहाणी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!