April 27, 2026
A scenic winding railway track through mountains with a peaceful traveler reflecting on life’s journey and curves
Home » जरा विसावूया वळणावळणावर…जीवनाच्या खऱ्या सौंदर्याचा शोध
मुक्त संवाद

जरा विसावूया वळणावळणावर…जीवनाच्या खऱ्या सौंदर्याचा शोध

वेग, स्पर्धा आणि सरळ मार्गांच्या धावपळीत आपण अनेकदा जीवनातील वळणांकडे दुर्लक्ष करतो. पण हीच वळणं आपल्याला थांबायला शिकवतात, विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवतात. प्रत्येक वळण एक नवा अनुभव, नवा धडा आणि नवं सौंदर्य घेऊन येतं—फक्त आपण त्याकडे पाहण्याची दृष्टी ठेवायला हवी. म्हणूनच, जीवनाच्या या अखंड प्रवासात थोडा वेळ काढून… “जरा विसावूया वळणावळणावर.”

यशवंत जोशी, बेंगलोर.

प्रत्येकाच्या आयुष्यात वळणाला फार महत्त्व असतं. मग ते रस्त्याचं, अगर जीवनाच्या प्रवासातलं. जीवनभर प्रवास आणि सारखी वळणं. पण “प्रत्येक वळण जीवन कसं जगायचं, याचा एक एक पैलू शिकवून जातं. जसं जीवनातलं वळण म्हणजे विचारांची दिशा बदलणं, चुकीच्या विचारांना मुरड घालणं.

वळणावळणाचा रस्ता असला की प्रवासाला जास्त वेळ लागतो. वळणं नसतील तर गाडी वेगात जाते. वेळ वाचतो. वळणावर गाडीचा वेग कमी करावा लागतो. म्हणून वेळ वाचवण्यासाठी डोंगर फोडून त्यातून बोगदा तयार करतात. मग काय सरळ रस्त्यावरून गाडी सुसाट ! त्यामुळं क्वचित प्रसंगी, प्रवासात वेळ वाचवण्याच्या नादात धोका पत्करावा लागतो. म्हणूनच वळणावळणाच्या रस्त्यानं जायला वेळ जरी जास्त लागत असला तरी, त्या प्रवासात जो आनंद मिळतो, जे अनुभव येतात त्यानं जीवन समृद्ध होतं.

लहानपणापासून प्रत्येकानं ऐकलेलं असतं, “मुलांना चांगलं वळण लागलं पाहिजे”. त्यासाठी मुलांना धपाटे खावे लागतात. रागावून घ्यावं लागतं. असं बरंच काही. याचाच अर्थ वळणावळणाचा मार्ग सोपं नसतो. अवघड असतो. पण त्याला पर्याय नसतो. तेवढं वळण पार केलं की जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं त्याला तोड नसते.

आपण रेल्वेने प्रवास करताना कोणत्याही डब्यात बसलेले असो, मग तो पहिल्या श्रेणीचा अगर दुसऱ्या किंवा तिसऱ्या खिडकीतून बघताना सृष्टी सौंदर्य दिसतं. पण ज्यावेळी गाडी वळण घेत असते, त्यावेळचं दृश्य मनमोहक असतं. आणि आपण पाठीमागं-पुढं पाहिल्यावर आपला डबा कुठं आहे म्हणजेच, “जीवनात आपलं स्थान कुठं आहे याची जाणीव होते”. हे फक्त वळणा वळणावरच.

आपल्या जीवनाचा प्रवास सुद्धा रेल्वेच्या प्रवासासारखाच. प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रश्न वेगळे. म्हणजे सगळे वेगवेगळ्या डब्यात. काहीजण वातानुकूलित डब्यात, पहिल्या श्रेणीत. म्हणजे ज्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी असते तर, काहीजण तिसऱ्या श्रेणीत म्हणजे कष्टाचं जीवन जगणारे. पण प्रत्येकानं गाडीत बसताना तिकीट काढलेलं असतं. आणि कोणत्या स्टेशनवर उतरायचं ते आधीच ठरलेलं असतं. पण जीवनाच्या प्रवासात ते स्टेशन आधी माहीत नसतं.

जीवनाच्या प्रवासात कितीतरी अनोळखी प्रवासी भेटतात. पण त्यांचा सहवास काही काळापुरताच. आपले स्टेशन आले की ते उतरून जातात. असे असले तरी, ते कायम आपल्या मनात घर करून राहिलेले असतात. पण हेच सहप्रवासी, बसायच्या जागेसाठी कधी भांडतात, कधी हमरीतुमरी, तर कधी विचारांची देवाणघेवाण. तर बरोबर असलेल्या जेवणाच्या डब्यातला भाजी-भाकरीची देवाणघेवाण करतात. आणि जीव लावून जातात. म्हणजेच या प्रवासात तुलना असते. मी कोणत्या डब्यात, तो कोणत्या? त्याला कोणती जागा मिळाली, मला कोणती?

असाच प्रवास लहानपणापासून सुरु असतो. तुलना केली जाते. खरंतर, प्रत्येकाचं रंग-रूप-बुद्धी- क्षमता सगळं भिन्न. पण प्रत्येक वळणावर स्पर्धा सुरू होते. वितुष्ट येतं, दुरावा निर्माण होतो. वादविवाद- भांडण यात, वादाच्या विषयाला चांगलं वळण पण देता येतं. आणि नाही जमलं तर, माघार घेऊन परत फिरावं लागतं.
मग स्पर्धा करायचीच नाही का? अवश्य करायची. पण स्वतःशीच. मगच जीवनातल्या प्रत्येक वळणावर आनंद मिळतो, त्यानंतरचा आपल्या साथीदाराबरोबरचा, आपल्या जोडीदाराबरोबरचा प्रवास हा कितीही वळणावळणाचा असला तरी, जीवनाची नाव पैलतीराला लागते, जरी अडचणींच्या मोठ्या लाटा आल्या तरीही.

लहानपणी मुलाचं नाव शाळेत दाखल केलं. घरचा अभ्यास सुरू झाला. आणि घरी आई पण बाळाचा अभ्यास घ्यायला सुरू करते. तिला पण बाळानं मोठेपणी, मोठं पद मिळवावं असं वाटत असतं. म्हणून आई मुळाक्षरापासून शिकवायला सुरू करते. पण बाळाला अबकड लिहिताना, क अक्षर नीट लिहिता येत नाही. क चा वळसा नीट काढता येत नाही. आई पुन्हा पुन्हा शिकवते. आणि ते बाळ कष्टानं ‘क’ चा वळसा म्हणजेच वळण शिकतं. त्या कष्टाच्या वळणातूनच, ते बाळ मोठेपणी जगाला वळसा घालून येतं. आणि स्वतःच्या कर्तृत्वानं यशोमंदिरावर कळस चढवतं. अशी या वळणाची महती आहे.

प्रत्येक प्राण्याची जीवन जगण्याची कला वेगवेगळी असते. अद्भुत असते. ती पाहताना इतरांनाही आनंद होतो. पक्षांचा थवा आकाशात संचार करताना, पाहतच राहावं असं वाटतं. ते दिशा बदलताना, त्यांचं वळणं म्हणजे नक्षी कामच ते न बिघडवता, संपूर्ण नक्षीच वळत जाते.

साप जमिनीवरून सरपट जातानाचं, ते दृश्य फार मोहक दिसतं. त्याला ते अंगवळणी पडलेलं असतं. त्याच्या आयुष्यात क्षणाक्षणाला वळण. त्याला ते त्रासदायक असेलही. बघणाऱ्यांना आनंददायी. पण ते बघण्याचं धारिष्ट आपल्या मध्ये नसतं. त्याला पाहून आपण आपली वाट वाकडी करतो.

पुरुषांचं असो अगर स्त्रीयांचं, केसांचं वळण हे चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतं. ‘कुरळे केस असणारा भाग्यवान असतो’. युवतीच्या कपाळावर, गालावर रुळणाऱ्या मनमोहक बटांचं वळण बघून, कवीला काव्य लिहायची स्फूर्ती येते.

वेडी वाकडी वळणं, दाट गर्द झाडी, जीवनाचा प्रवास सुद्धा असाच वळणावळणाचा. जीवनात अडचणींचे डोंगर-दऱ्या-घाट समोर. त्याला वळसा घालून पुढं जावं लागतं, त्याचवेळी त्या प्रवासात आजूबाजूचं सौंदर्य सुद्धा असंच मनमोहक. पण आपल्याला पुढं जायचं असतं, त्या गडबडीत त्या सौंदर्याचा उपभोग घेणं जमत नाही.

जीवनाच्या गाडीचा चालक परमेश्वर आहे. आपण मात्र, मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी चालकत्व स्वतःकडं घेत असल्याचं दाखवतो. पण “खरा चालक तोच आहे” हे लक्षात ठेवलं तर, जीवनाचा प्रवास म्हणजे एक आनंददायी सहल होणारच.

असा एखादाच माणूस असतो, ज्यानं आयुष्यात जीवनाच्या प्रवासात अडचणींचे डोंगर पार केलेत. आणि त्याचवेळी प्रत्येक वळणावरचं सौंदर्य उपभोगलेलं असतं. म्हणजेच सुखदुःखं पचवलेली असतात. आणि त्यामुळं तो तृप्त असतो. तो म्हणतो, “मी आता अशा वळणावर येऊन पोहोचलो आहे की, मला काहीही नको. मी तृप्त आहे.” आपल्याला पण अशी अवस्था येण्यासाठी, चला तर मग, आपण सगळे प्रवासाचा आनंद उपभोगण्यासाठी, जीवनाच्या गाडीचं चालकत्व परमेश्वरावर सोपवूया आणि “जरा विसावूया वळणावळणावर”.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

स्त्री ची सुंदरता साडीमध्येच…लयभारी माधुरी !

वर्हाडी बोल

महिलांना स्वावलंबी बनवण्याचा वसा घेतलेल्या आरती सोनग्रा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!