April 26, 2026
Marathi infographic showing gold 63 percent returns and silver threefold growth with investment insights
Home » सोन्याने दिला ६३ टक्क्यांचा तर चांदीचा तीनपट परतावा
विशेष संपादकीय

सोन्याने दिला ६३ टक्क्यांचा तर चांदीचा तीनपट परतावा

“सोन्या चांदीच्या परताव्यावरील” विशेष आर्थिक लेख…

भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक धातू म्हणून नव्हे, तर समृद्धी आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. विशेषतः अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची आपली जुनी परंपरा आहे. गेल्या अक्षय तृतीयेपासून सोन्याने गुंतवणूक दारांना तब्बल ६३ टक्क्यांचा परतावा दिलेला आहे. त्याचा धांडोळा..

प्रा. नंदकुमार काकिर्डे

भारतीय संस्कृतीत समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेचा मुहूर्त यंदा सोने चांदी बाजारासाठी ऐतिहासिक, पण तितकाच संमिश्र ठरला. १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी झालेली ही अक्षयतृतीया वेगळ्याच विरोधाभासासाठी ओळखली जाईल. यंदा सोन्याच्या भावाने गगनाला गवसणी घातल्याने ग्राहकांनी कमी ‘ग्रॅम’ सोने खरेदी केले, मात्र त्यासाठी विक्रमी ‘रुपये’ मोजले. जानेवारी २०२६ च्या अखेरीस सोन्याने प्रति १० ग्रॅम १.७५ लाख रुपयांचा आणि जागतिक बाजारात ५,४१७ डॉलर्सचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती व अन्य विविध कारणांमुळे सोन्याच्या दरात डॉलरच्या तुलनेत ११ टक्के आणि रुपयाच्या तुलनेत १४ टक्क्यांची घसरण झाली. मात्र, या घसरणीमुळे सोन्याचे दीर्घकालीन महत्त्व कमी झालेले नाही. उलट, या अक्षयतृतीयेला ज्यांना पूर्वी चढ्या भावामुळे खरेदी करता आली नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक ‘प्रवेश बिंदू’ ठरला आहे.

सोन्यातील गुंतवणुकीचा विचार करताना आपण चार प्रमुख तांत्रिक आणि मूलभूत कारणांचा विचार करणे आवश्यक आहे:

सोन्याचे समभागांशी किंवा शेअर निर्देशांकांशी गुणोत्तर:

ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर, सध्या ‘गोल्ड-टू-एस अँड पी ५००’ हे गुणोत्तर ०.७ च्या आसपास आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोन्याने मोठी उसळी घेतली होती, तेव्हा हे गुणोत्तर ७.५ पर्यंत पोहोचले होते. याचा अर्थ असा की, सध्याच्या किमती जरी जास्त वाटत असल्या, तरी शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या तुलनेत सोने अजूनही स्वस्त आहे. सोन्यात अजूनही मोठी वाढ होण्याची क्षमता आहे.

सोन्याच्या भावातील घसरण ही केवळ ‘विश्रांती’ आहे, ‘विराम’ नाही

सोन्याच्या किमतीत सध्या झालेली १९ टक्क्यांपर्यंतची घसरण ही बाजारपेठेतील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. १९७० च्या दशकात सोन्याचे भाव १८४ डॉलर्सवरून १०४ डॉलर्सवर आले होते (म्हणजेच ४४ टक्के घसरण), पण त्यानंतरच सोन्याने १९८० मध्ये आपली सर्वोच्च पातळी गाठली होती. त्यामुळे २०२६ मधील ही घसरण म्हणजे सोन्यामधील गुंतवणुक ‘ट्रेंड’ संपल्याचे लक्षण नसून पुढच्या मोठ्या झेपसाठी घेतलेली ही केवळ एक विश्रांती आहे.

एमसीएक्स (MCX) गोल्ड आणि निफ्टीचे गुणोत्तर सध्या ६.२ च्या आसपास आहे. २००९ आणि २०१३ मध्ये जेव्हा हे गुणोत्तर वाढले होते, तेव्हा शेअर बाजार स्वस्त होता . मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. आज शेअर बाजार (निफ्टी) सुद्धा त्याच्या उच्च मूल्यांकनावर (P/E २२.६) आहे. अशा वेळी सोने हे शेअर्सच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर वाटते.

परताव्याचा इतिहास :

२००७ पासूनचा डेटा पाहिला तर सोन्याने सरासरी १५.९ टक्के परतावा दिला आहे, तर निफ्टीचा परतावा ११.८ टक्के राहिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, कठीण काळात (उदा. २००९, २०१२, २०२०) सोन्याने भांडवलाचे रक्षण अधिक प्रभावीपणे केले आहे. गेल्या २० वर्षांत सोने सुमारे १६ पटीने वाढले आहे, तर निफ्टी केवळ ६ पटीने वाढला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार रे डॅलिओ यांच्या मते, कोणत्याही सुदृढ गुंतवणूकदाराने त्याच्या गुंतवणुकीच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये किमान १० ते १५ टक्के गुंतवणूक सोन्यात करणे आवश्यक आहे. सोने ही एकमेव अशी मालमत्ता आहे जी दुसऱ्या कोणाचे ‘देणे’ नसते, ती स्वतःच एक मूल्यवान संपत्ती आहे.

सोन्याची भाववाढ

जानेवारी २०२५ मध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमला ८१,०२८ रुपये होता. तोच भाव २९ जानेवारी २०२६ रोजी १,६७,०९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. म्हणजे फक्त एका वर्षात १०६.२२ टक्के वाढ झाली. ३० जानेवारी २०२६ रोजी तर सोन्याने १,७५,२३१ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला, जी ११६ टक्के वाढ होती. अक्षयतृतीया १९ एप्रिल २०२६ रोजी होती. या दिवशी २४ कॅरेट सोने १,५५,७८० रुपये प्रति १० ग्रॅम होते. हे गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेच्या तुलनेत सुमारे ६३ टक्के जास्त होते. सोप्या भाषेत सांगायचे तर, २०२५ च्या अक्षय्य तृतीयेला ९६ हजार रुपयांना १० ग्रॅम सोने मिळत होते, तेवढ्या पैशात २०२६ ला फक्त ६ ते ६.५ ग्रॅम सोने मिळते.

सोन्याचे भाव वाढण्यामागे मुख्य कारणे म्हणजे अमेरिकन डॉलर कमजोर होणे, व्याजदर कपातीची अपेक्षा, रशिया-युक्रेन व मध्य-पूर्वेतील तणाव, अमेरिकेचे टॅरिफ धोरण आणि जगभरातील केंद्रीय बँकांकडून मोठी खरेदी. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची नाणी, लगडी आणि ETF कडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे

चांदीची भाववाढ

चांदीने तर सोन्यालाही मागे टाकले. २०२५ या पूर्ण वर्षात चांदी १४४ टक्के वाढली. २०२६ च्या सुरुवातीलाच चांदीने धुमाकूळ घातला. जानेवारी २०२६ च्या पहिल्या २० दिवसांतच चांदी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली, म्हणजे सुमारे ८५,००० रुपये प्रति किलोने महाग झाली. संपूर्ण जानेवारी २०२६ मध्ये चांदी ७४ टक्के वाढून ४ लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेली.

जानेवारी २०२६ मध्ये MCX वर चांदीने २,५४,००० रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. नंतर एप्रिल २०२६ मध्ये भाव थोडा खाली येऊन २,६६,१५० रुपये प्रति किलोच्या आसपास स्थिरावला, पण तरीही त्याने ३,१९,९४९ रुपये प्रति किलोचा टप्पा याच वर्षी गाठला होता. चांदी इतकी वाढण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. एक, औद्योगिक मागणीचा स्फोट झाला. सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, कृत्रिम बुद्धिमत्ता व इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांदी मोठ्या प्रमाणावर लागते. दोन, सलग सहावे वर्ष जागतिक बाजारात चांदीचा पुरवठा कमी आहे. २०२५ मध्ये सुमारे ६.७ कोटी औंस चांदीची तूट होती. त्यामुळे गुंतवणूक आणि उद्योग या दोन्हींकडून मागणी आल्याने भाव भडकले. थोडक्यात सांगायचे तर २०२५ च्या जानेवारीपासून एप्रिल २०२६ पर्यंत सोने दुप्पट झाले आहे आणि चांदी तिप्पट झाली आहे. १० ग्रॅम सोन्यासाठी आता ८१ हजार ऐवजी १.५५ लाख मोजावे लागतात, तर १ किलो चांदीसाठी ८८ हजार ऐवजी २.६६ लाख मोजावे लागतात.

गुंतवणुकीच्या पॅटर्नमध्ये ‘डिजिटल’ आणि ‘स्मार्ट’ बदल होत असल्याचे लक्षात येत आहे. यंदा दागिन्यांच्या मागणीत २४ टक्क्यांची घसरण झाली असली, तरी सोन्याची नाणी, लगडी आणि ‘गोल्ड ETF’ मधील गुंतवणुकीत १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. भाववाढीमुळे सामान्य ग्राहकाने जड दागिन्यांऐवजी ‘हलके दागिने’ किंवा ‘डिजिटल गोल्ड’ला पसंती दिली आहे. विशेषतः शहरी तरुण वर्ग सेबी-नियमित एक्सचेंज ट्रेडेड फंड – ETF कडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राहकांचा कल आता केवळ सणाला खरेदी करण्याऐवजी, वर्षभरात जेव्हा भाव कमी होतील तेव्हा खरेदी करण्याकडे झुकू लागला आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या सोने व चांदी ईटीएफ मध्ये १,११८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीत आणि अर्थव्यवस्थेत सोन्या-चांदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ दागिने म्हणून नव्हे, तर सुरक्षित गुंतवणुकीचा एक भक्कम पर्याय म्हणून सोने चांदी बाजाराकडे पाहिले जाते. अनिश्चित आर्थिक काळात सोने आणि चांदी हे गुंतवणुकीचे ‘सुरक्षित बेट’ मानले जातात. गेल्या वर्षभरामध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी 24 टक्क्यांनी घसरलेली आहे. सोन्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या भाव वाढीमुळे बाजारामध्ये सोन्याच्या दागिन्यांना कमी मागणी असल्याचे लक्षात आले आहे. या उलट सोन्यामधील गुंतवणूक गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार सोन्याची नाणी किंवा लगडी किंवा ईटीएफ या द्वारे सोन्याच्या गुंतवणुकीकडे जास्त वळलेला आढळत आहे. याचे साधे कारण म्हणजे गरज पडली तर या सोन्याच्या नाणी किंवा लगडी तसेच ईटीएफ याची विक्री लगेच विनासायास, विना घट करता येते. या उलट बाजारात अत्यंत हलके किंवा दैनंदिन वापराचे दागिने तसेच चांदी व हिऱ्याचे दागिने यांना जास्त पसंती आढळत आहे. यामध्ये गेल्या काही वर्षात एक ग्राम सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर कल दिसत आहे. पूर्वीच्या काळी लग्नसराई मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जड दाग दागिने खरेदी केले जात असत परंतु त्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अमुलाग्र बदल झाला असून हलक्या वजनाच्या दागिन्यांना जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे.

सोन्याच्या भावाबाबत जो ग्राहक संवेदनशील असतो तो आता कोणत्याही सणावाराला किंवा गुरुपुष्यामृत सारख्या दिवशी सोन्याची खरेदी करत नाही. या उलट सोन्याच्या भावाबाबत तो संवेदनशील असल्याने जेव्हा सोन्याचा भाव खाली जातो किंवा उतरतो तेव्हा सोन्याची खरेदी केली जाते. एकंदरीत सोन्याच्या खरेदीची पद्धत बदलली जात असल्याचे आढळत आहे.

गेल्या अक्षय्य तृतीयेपासून सोने ६३.४६ टक्क्यांनी वाढले. २०२० नंतरची सोन्याची ही सर्वोत्तम कामगिरी झालेली आहे. त्यामुळे लोक दागिन्यांऐवजी गुंतवणूक स्वरूपात सोने घेत आहेत. सोन्या चांदीच्या व्यवसायात अलीकडे अनेक सराफ संस्था गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या आकर्षक सवलती आणि योजना जाहीर करत आहेत. यामध्ये सोन्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात असून काही सराफ संस्था सोन्याचा दर निश्चित ठेवून खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात किंवा अनेकदा सोन्याबरोबर त्याच वजनाची चांदीची नाणी मोफत देतात. अशा प्रकारच्या योजनांमुळे सोन्याचे भाव वाढलेले असले तरी त्याची बाजारातील मागणी टिकून राहिलेली दिसते.

यावर्षीच्या अक्षय तृतीयेला देशभरातून साधारणपणे दहा टन सोन्याची खरेदी झाली व त्याचे मूल्य भाव वाढीमुळे वीस हजार कोटी रुपयांच्या घरात होते. गेल्या वर्षी ही विक्री 15 टनांच्या घरात झालेली होती व त्याचे मूल्य पंधरा हजार कोटी रुपयांच्या घरात होती . अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (CAIT) आणि IBJA च्या अहवालानुसार, यंदा अक्षय तृतीयेला सोन्याच्या खरेदीच्या प्रमाणात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३० टक्क्यांची मोठी घट झाली आहे. या संस्थेचे प्रमुख श्री प्रवीण खंडेलवाल यांनी सोन्या-चांदीतील गुंतवणुकी बाबत बोलताना सांगितले की सोन्याचे वर्चस्व अजूनही पहिल्या इतकेच कायम आहे मात्र भाव वाढीमुळे च्या खरेदीचे स्वरूप आमुलाग्र बदललेले आहे. त्याचप्रमाणे देश पातळीवरील खरेदीचा विचार करता दक्षिण भारतामध्ये सोन्याची खरेदी सातत्याने टिकून आहे. मात्र देशांच्या अन्य भागात नेहमीच्या मागणीपेक्षा कमी मागणी सोन्या चांदीमध्ये आढळत आहे. खरेदीचे प्रमाण सकृत दर्शनी घटले असले, तरी सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे एकूण आर्थिक उलाढालीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

ग्राहकांनी यंदा भारी दागिन्यांऐवजी हलके दागिने, २ ते ५ ग्रॅमची छोटी नाणी आणि डिजिटल गोल्डला अधिक पसंती दिली. तसेच, ४० ते ५० टक्के व्यवहार हे जुने सोने मोडून नवीन सोने घेण्याचे झालेले होते. सोने खरेदी विक्री मधील काही तोटे लक्षात घेतले तर सध्या सोन्याचे दर त्यांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर (१.५८ लाखांच्या आसपास) आहेत. अशा वेळी मोठी गुंतवणूक केल्यास, जागतिक तणाव निवळल्यास किंवा डॉलर वधारल्यास किमतीत मोठी घसरण होऊ शकते. त्याचप्रमाणे सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यापासून व्याज किंवा लाभांश कधीही मिळत नाही.

बँकेमधील मुदत ठेवी, स्थावर मिळकत किंवा शेअर्सप्रमाणे कोणतेही नियमित व्याज अथवा लाभांश सोने व चांदीच्या गुंतवणुकीवर मिळत नाही. एवढेच नाही तर सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर मजुरी व ३ टक्के जीएसटी लागतो. दागिने मोडताना हा खर्च पूर्णपणे बुडतो आणि केवळ सोन्याच्या वजनाचे पैसे मिळतात. सोन्याच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब म्हणजे त्याची सुरक्षितता आहे. भौतिक सोने घरात ठेवणे चोरांच्या भीतीमुळे नेहमीच धोक्याचे असते. त्याच्या सुरक्षिततेसाठी बँक लॉकरचा अतिरिक्त खर्च करावा लागतो.

थोडक्यात सांगायचे तर, अक्षयतृतीया २०२६ ही सोन्याच्या ऐतिहासिक किमतींसाठी आणि खरेदीचे प्रमाण घटूनही वाढलेल्या विक्रमी उलाढालीसाठी नक्कीच लक्षात राहील. सोने खरेदी करणे हे पारंपारिक आणि आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे असले, तरी सध्याच्या उच्चांकी दरांमुळे ग्राहकांनी क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याऐवजी नियोजनबद्ध खरेदी करणे अधिक हितावह आहे.

( प्रस्तुत लेखक पुणेस्थित अर्थविषयक पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत )

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

नोकरी करणाऱ्या महिलांचे स्वातंत्र्य…

ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवणारे राष्ट्रीय विद्युत धोरण

भाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!