नवी दिल्ली – भगवान बुद्धांचे दोन प्रमुख शिष्य अर्हन्त सारिपुत्र आणि अर्हन्त मौद्गल्यायान यांच्या पवित्र अस्थी मंगोलियातील उलानबातर इथल्या गंडन तेगचेनलिंग मठातून आज भारतात परतल्या आहेत. या मठात त्या 10 दिवस प्रदर्शानासाठी ठेवल्या होत्या. हे प्रदर्शन यशस्वी ठरले.
गंडन तेगचेनलिंग मठाने केलेल्या विनंतीवरून, केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय राष्ट्रीय संग्रहालय, मध्य प्रदेश राज्य सरकार, श्रीलंकेची महाबोधी सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांनी संयुक्तपणे 31 मे ते 09 जून 2026 या कालावधीत या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मंगोलियातील बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 31 मे 2026 रोजी हे प्रदर्शन सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले होते.
आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी 30 मे 2026 रोजी मंगोलियाचे शिक्षण मंत्री एन्ख-अमगालान आणि गंडन तेगचेनलिंग मठाचे परम पूज्य श्रद्धेय खांबा नोमुन खान गेशे ल्हारम्पा डी जावझानदोरजी यांच्याकडे या पवित्र अस्थी औपचारिकपणे सुपूर्द केल्या होत्या.
मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये दिलेल्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदर्शनाची घोषणा केली होती. भारत आणि मंगोलिया यांच्यात बौद्ध संस्कृतीशी जोडलेले दृढ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मंगोलियातील जनतेला पवित्र अस्थींचे दर्शन घेण्याची एक अभूतपूर्व संधी मिळाली. या 10 दिवसाच्या प्रदर्शनादरम्यान संपूर्ण मंगोलियातून सुमारे एक लाख भाविकांनी मठाला भेट दिली आणि पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. मंगोलियाची एकूण लोकसंख्या अंदाजे 34 लाख इतकी आहे.
आजतागायत या पवित्र अस्थी केवळ थायलंड आणि मंगोलिया इथेच पाठवण्यात आल्या आहेत. जून 2022 मध्ये मंगोलियामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ते प्रदर्शनही अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरले होते, त्या प्रदर्शानाचेही यानिमित्ताने स्मरण झाले.
या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय संग्रहालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने बौद्ध धर्मावर आधारित खाली नमूद केलेल्या काही विशेष प्रदर्शनांचे आयोजन केले होते. या प्रदर्शनांचेही मंगोलियाचे नागरिक बौद्ध भिक्खू आणि बुद्धिवंतांनी कौतुक केले :
सारिपुत्त आणि मोग्गल्लान – ज्ञान, भक्ती आणि अस्थींचा प्रवास – आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाद्वारे प्रदर्शनाचे आयोजन
भारताकडून मंगोलियाकडे : आशियाअंतर्गतच्या प्रदेशांमध्ये बुद्ध धम्माचा प्रसार – आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन
प्रकाशाचे स्त्रोत : मूर्तिकला, अस्थी आणि धम्माचा मार्ग (भारताच्या संग्रहालयांतील संग्रहातून शाक्यमुनी बुद्धांचा प्रवास) – भारतीय राष्ट्रीय संग्रहालयाद्वारे आयोजन
पवित्र अवशेषांच्या बाबतीत शिष्टाचार आणि सुरक्षेसंबंधी राष्ट्रप्रमुखाला देण्यात येणा-या दर्जाप्रमाणे सन्मान करण्यात येतो. 30 मे 2026 रोजी आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने ते मंगोलियामध्ये आणण्यात आले होते. आज लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने ते अवशेष भारतात परत आले. गंडन तेगचेनलिंग मठात औपचारिक स्वागत आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आले होते.
मंगोलिया सरकारने या प्रदर्शनासाठी संपूर्ण सहाय्य केले, तर गंडन तेगचेनलिंग मठाने पवित्र अवशेषांच्या पूजनीय दर्जाला अनुसरून कार्यक्रमाच्या धार्मिक बाबींची देखरेख केली. आज मठात झालेल्या समारोप समारंभात परमपूज्य खांबा नोमुन खान गेशे ल्हारम्पा डी. जावझंदोर्ज, महामहिम एन्ख-अमगलन, लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष पूज्य बनगला उपतिस्सा थेरो आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे महासचिव शार्टसे खेनसुर रिनपोचे जांगचुप चोडेन यांच्यासह अनेक वक्त्यांनी मंगोलियामध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यास मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
भारतात परतण्यापूर्वी परमपूज्य एन्ख-अमगलन आणि परमपूज्य खांबा नोमुन खान गेशे ल्हारम्पा डी. जावझंदोर्ज यांनी पवित्र अवशेष लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्द केले. प्रस्थानापूर्वी विमानतळावर मंगोलियातील भारताचे राजदूत अतुल मल्हारी गोटसुर्वे यांनी लडाखच्या नायब राज्यपालांना एक मंगोलियन रोपटे सादर केले. भारत आणि मंगोलिया यांच्यातील चिरस्थायी मैत्री आणि आध्यात्मिक बंधाचे प्रतीक म्हणून हे रोपटे लडाखमध्ये लावले जाईल.
प्रतिनिधी मंडळाने आणि गंडन तेगचेनलिंग मठाने प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहकार्य केल्याबद्दल मंगोलियातील भारतीय दूतावासाचे आभार मानले. या कार्यक्रमाने भारत आणि मंगोलिया यांच्यातील शतकानुशतके जुने आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ केले आहेत.
