February 13, 2026
Home » सर्वसामान्य माणसाच्या शोषणावर बोलणारी कविता
मुक्त संवाद

सर्वसामान्य माणसाच्या शोषणावर बोलणारी कविता

वास्तवाचा तंतोतंत अनुवाद केला की कवितेला स्वत:चा स्वर लाभतो; साहजिकच कवीही आपली म्हणून खरीखुरी स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशी दणकट अभिव्यक्ती प्रकट करणारी कविता कवी प्रदीप बडदे यांनी आपल्या ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ मधून समोर ठेवली आहे.

प्रा.ऐश्वर्य पाटेकर
(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी)

एकीकडे सत्ताधारी टोळ्यांचा बडेजाव
तर एकीकडे सत्तेबाहेर चाललेली धुसफूस
आम्हाला सत्ताहीन व्हायचं असतं
डोळ्यांच्या त्रिकोणात गाठायचा असतो 
आख्यायिकांचा त्रिभुज प्रदेश.,
वस्त्या, वाड्या नेस्तनाबूत होताना 
आठवतं गावगाड्याचं लिळाचरित्र ..
किती क्रूरपणे लिहितोय आम्ही हे
आत्मचरित्र!

वरील कवितेच्या ओळी वाचताक्षणी लक्षात आल्यावाचून राहणार नाही की कविता रंजनासाठी नसतेच; कविता खोल समाजवास्तव समजून घेऊन त्याचा सार्थ अन्वयार्थ व्यवस्थेच्या समक्ष मुखरित करत असते. ती व्यवस्थेला तसूभर डरत नाही. वास्तवाचा तंतोतंत अनुवाद केला की कवितेला स्वत:चा स्वर लाभतो; साहजिकच कवीही आपली म्हणून खरीखुरी स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशी दणकट अभिव्यक्ती प्रकट करणारी कविता कवी प्रदीप बडदे यांनी आपल्या ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ मधून समोर ठेवली आहे.

ही कविता सर्वसामान्य पिडल्या-नाडल्या गेलेल्या माणसाच्या काळजाचा हुंकार आहे. ही कविता तिच्या सहज साध्या रूपासह वाचकाच्या मनात ठसायला भाग पाडणारी आहे. आशेचा कुठलाही किरण नसताना आशावादी अंकुर मनात घेऊन जगणाऱ्या माणसाची ही कविता आहे. जागतिकीकरणाने आणि भांडवालशाही व्यवस्थेनं सर्वसामान्य माणसांचं जे शोषण केलं आहे, त्याचं दमन केलं आहे. त्यास नेटक्या शब्दात साकार करणारी ही कविता आहे.

सर्वसामान्य माणसाच्या शोषणावर बोलणारी ही कविता सर्वसामान्यांचं सार्वत्रिक ‘आत्मचरित्र’ आहे. मानवी जीवनव्यवस्थेतील संपलेल्या मूल्यऱ्हासाचं महाभारतच समोर उभं करते. ‘माणूसकीची अंत्ययात्रा’ मांडणारी जरी ही कविता असली तरी अतिशय तळमळीने माणुसकीसाठीच झटणारी आहे. हेच या कवितेचं यश म्हणावं लागेल. ही कविता निश्चितच मराठी काव्यप्रवाहात मोलाची भर घालणारी आहे ..!

काव्यसंग्रह – माणुसकीची अंत्ययात्रा
कवी – प्रदीप दत्ताराम बडदे
प्रकाशक – ललित पब्लिकेशन
पृष्ठे – १०२/ किंमत २००
पुस्तकासाठी संपर्क – ९५९४०२५९९५


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

बापूंच्या विचारांचा विसर

दीपमाळ

संसाराचा गाडा…

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading