अनंता सूर हे विदर्भातील सामाजिक जाणिवांचे महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. वास्तव, माणुसकी, व्हॅल्यूज यानंतर आता त्यांचा ‘कोंडमारा’ या कथा संग्रहातून प्रत्ययास येतो आहे. चालू काळात ग्रामीण भागातील माणसांच्या जीवनसंग्रामाचे सूक्ष्म निरीक्षण प्रत्ययकारीपणे येथे दिसते.
जागतिकीकरणाच्या रेट्यात ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी सामान्य माणूस करीत असलेला संघर्ष हा कथा संग्रहाचा प्रमुख विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न, ग्रामीण समाजरचनेतील ताणतणाव, बेरोजगारी, शिक्षणाची धडपड, शेतमजुरांचे प्रश्न या कथांमधून अतिशय सहज शब्दबद्ध झाले आहेत. या कथांमधील प्रसंगातून येणाऱ्या संवादातून वेदनेची भावना तीव्रपणे अभिव्यक्त होते.
ग्रामीण जीवनातील ताणतणाव, बेरोजगारीचा प्रश्न, दुष्काळी जनजीवन, कोरोनाने निर्माण केलेल्या समस्या, मानवी जीवनाची क्षणभंगुरता, शेतकऱ्यांच्या निसर्गाशी चाललेला वारंवार संघर्ष, शेतमजुरांच्या हक्काचा प्रश्न, सरकारी योजनांचा अभाव, भ्रष्टाचार यांचे वास्तव चित्रण या कथा संग्रहात दिसते. पोलिसांच्या दडपशाहीचा प्रश्न आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचा संघर्ष अशा सामाजिक समस्यांकडे अनंता सूर यांच्या कथा जागरूकपणे वाचकांचे लक्ष वेधतात.
डॉ. माधव जाधव, नांदेड
नागपूर – पथदर्शी साहित्य संघ विदर्भ प्रांत द्वारा उत्कृष्ट काव्यसंग्रह (गजल) आणि उत्कृष्ट कथासंग्रहासाठी पथदर्शी साहित्य पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. कालकथित बहिणाबाई हरिभाऊ मनवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयु. गजानन हरिभाऊ मनवरे यांचे वतीने उत्कृष्ट कथासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या पथदर्शी साहित्य पुरस्कार २०२५ साठी अनंता सूर यांच्या ‘कोंडमारा’ची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण २१ मार्च २०२६ रोजी वर्धा येथील सार्वजनिक बजाज वाचनालय येथे डॉ. अरविंद पाटील, डॉ. सिद्धार्थ भगत, मार्शल धम्मा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून रोख १०,०००/- सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी साहित्याच्या प्रांतातील हा महत्त्वाचा कथासंग्रह असून या कथासंग्रहाला यापुर्वी वैखरी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (खामगाव), शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (पिंपळगाव जलाल), विठाई स्मृती शिवांजली कथा सन्मान (चाळकवाडी), मसाप शाखेचा निर्मलाताई मठपती कथासंग्रह पुरस्कार (सोलापूर), दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार (चेंबूर), विदर्भ साहित्य संघाच्या वा. कृ. चोरघडे स्मृती कथा पुरस्कार (नागपूर) हे सहा पुरस्कार प्राप्त झालेले असून हा सातवा मानाचा पुरस्कार आहे.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्द्ल डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ.मोना चिमोटे, डॉ. गजानन मुंदे, डॉ. अण्णा वैद्य,’बिराड’कार अशोक पवार, कवी इंद्रजीत भालेराव, डॉ. सुधा मालधुरे, डॉ. संतोष देठे, डॉ. संजय लाटेलवार, डॉ. गजानन घोंगटे, डॉ. पद्माकर तामगाडगे, डॉ. भास्कर बंगाळे, डॉ. अनिल दडमल, डॉ. अशोक इंगळे, डॉ. रुपेश कऱ्हाडे, डॉ. भास्कर पाटील, डॉ. इसादास भडके, डॉ. विद्याधर बनसोड, डॉ. सुहासकुमार बोबडे, नाटककार चुडाराम बल्लारपुरे, डॉ. सतेज दणाणे, संतोष रामगिरवार, सुरेश पेंढरवार, नागोराव कोंम्पलवार, गणेश बुटे, लक्ष्मण काकरवर यांनी अभिनंदन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
