डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा’ ह्या संग्रहात एकूण २६ नाट्यछटा आहेत. यात विषयांची विविधता आहे. शाळेतील वर्गप्रतिनिधीला (मॉनिटर ) वर्गाची शिस्त राखण्यासाठी सगळ्यांचा वाईटपणा घ्यावा लागतो. मॉनिटर आणि इतर विद्यार्थी त्यांच्यातील सुप्त संघर्ष हाच विषय पहिल्या नाट्यछटेत आला आहे. अशा विषयावरील नाट्यछटा बालकुमार वाचकांना नक्कीच आवडतात. हीच नस ओळखून लेखकांनी नाट्यछटांचे लेखन केले आहे.
परशराम आंबी,
कार्यवाह, मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर.
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे दोन पुरस्कार लाभलेलेले डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील हे संशोधनपूर्वक लेखन करणारे प्रतिभाशाली लेखक आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता, कादंबरी, एकांकिका आदी वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांनी दुर्लक्षित असलेल्या नाट्यछटा लेखनाकडे आपला मोर्चा वळविला आहे.
‘बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा’ हा आपला नवीन संग्रह घेऊन ते बालकुमार वाचकांच्या भेटीला आलेले आहेत. इतर वाङ्मयप्रकारांच्या तुलनेत नाट्यछटेचे लेखन कमी प्रमाणात झालेले आहे. नाट्यछटा हा शब्द उच्चारताच नामवंत लेखक शंकर काशीनाथ उर्फ दिवाकर (१८८९ – १९३१) यांचेच नाव आठवते. दिवाकर हेच नाट्यछटा या वाङ्मयप्रकाराचे जनक मानले जातात. त्यांनी १९११ मध्ये पहिली मराठी नाट्यछटा लिहिली, म्हणून १९११ हे मराठी नाट्यछटेचे जन्मवर्ष मानले जाते. जुन्या अभ्यासक्रमांमध्ये दिवाकरांच्या नाट्यछटा असायच्या. मागील पिढीच्या मनात नाट्यछटा म्हणजे दिवाकर, हे समीकरण दृढ झाले होते. तथापि मागील शंभर वर्षांत नाट्यछटा लेखन म्हणावे तितके झाले नाही.
डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा’ ह्या संग्रहात एकूण २६ नाट्यछटा आहेत. यात विषयांची विविधता आहे. शाळेतील वर्गप्रतिनिधीला (मॉनिटर ) वर्गाची शिस्त राखण्यासाठी सगळ्यांचा वाईटपणा घ्यावा लागतो. मॉनिटर आणि इतर विद्यार्थी त्यांच्यातील सुप्त संघर्ष हाच विषय पहिल्या नाट्यछटेत आला आहे. अशा विषयावरील नाट्यछटा बालकुमार वाचकांना नक्कीच आवडतात. हीच नस ओळखून लेखकांनी नाट्यछटांचे लेखन केले आहे.
‘अभ्यास एके अभ्यास’ ह्या नाट्यछटेत मुलांना अभ्यासापेक्षा खेळायला फार आवडते हाच विषय हाताळला आहे. ह्या नायकाने अभ्यासाच्या ओझ्याखाली आपले बालपण कोमेजून जात असल्याची तक्रार केली आहे. आजकालच्या मुलामुलींचे पोशाख, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि मोबाईलचा अतिरेकी वापर ह्या गोष्टींवर ‘मर्यादेने वागा’ ह्या नाट्यछटेत नेमकेपणाने बोट ठेवले आहे. ‘संस्कारच हरवलेत’ ह्या नाट्यछटेत गुरुजींनी विद्यार्थ्यांच्या बेशिस्तपणाचा पाढा वाचला आहे. वास्तवाचे दर्शन या नाट्यछटेतून घडते.
‘घ्या ना मला खेळायला’ ह्या नाट्यछटेतली नायिका स्त्रीपुरुष समतेचा आग्रह धरते आहे. मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत, हे ठासून सांगते आहे. यातून स्रीचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. ‘मला शांतता हवीय’ ह्या नाट्यछटेत डॉल्बीमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची समस्या मांडली आहे. ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्याची हिंमत दाखवणारी ही नाट्यछटा आहे.
‘घाई आहे मला’ ह्या नाट्यछटेची नायिका ही एक नोकरदार स्त्री आहे. गृहिणी म्हणून, आई म्हणून आणि पत्नी म्हणून नोकरदार स्त्रीची होणारी ओढाताण लेखकाने छान टिपली आहे. घरातली मोठी माणसे चक्क टीव्ही पाहत बसतात आणि मुलांना सांगतात, अभ्यास करा. मोठी माणसे वेगवेगळे पोशाख करतात आणि लहान मुलांना दररोज एकच गणवेश वापरावा लागतो. मोठी माणसे कामाच्या निमित्ताने बाहेर भटकत असतात आणि मुलांना मात्र नियमात नि बंधनांत जखडून ठेवतात. ‘सगळी बंधनं आम्हालाच का?’ ह्या नाट्यछटेतल्या नायकाने ह्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.
कालची जुनी पिढी आणि आजची नवी पिढी यांच्यातील सुप्त संघर्ष एका नाट्यछटेत दाखवला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वेंधळेपणामुळे घराला आलेला अस्ताव्यस्तपणा, फॅशनच्या नावाखाली चाललेले किळसवाणे प्रकार, ऑनलाईन शाळा आणि अभ्यास, वारंवार होणाऱ्या परीक्षा, लग्नाच्या बाजारात होत असलेली मुलामुलींची कुचंबणा या विषयांवर काही नाट्यछटांतून प्रकाश टाकला आहे. समाजातील रिकामटेकडे लोक ही एक डोकेदुखी असते. लहान मुलांचा उपवास हा इतरांच्या दृष्टीने थट्टेचा विषय असतो. ह्या दोन्ही विषयांवरील नाट्यछटांत लेखकाने मस्त विनोदनिर्मिती साधली आहे.
काही नाट्यछटांतून वृक्षारोपण, पर्यावरणसंरक्षण आणि भूतदया यासंबंधी उद्बोधक संदेश दिला आहे. दृष्य – अदृष्य पात्रांचे स्वभावविशेष दाखवत मानवी स्वभावांतील विसंगती टिपल्या आहेत. मानवी भावभावनांचे छान प्रकटीकरण केले आहे. अनेक सामाजिक दोषांवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे. ह्या नाट्यछटांमध्ये वर्तमानकाळातील समाजाचे आणि घटना – घडामोडींचे यथातथ्य प्रतिबिंब उमटले आहे.
लेखकाने ह्या नाट्यछटांच्या माध्यमातून बालकुमारांसोबत तथाकथित मोठ्यांनाही आत्मचिंतन करण्याची संधी दिली आहे. केवळ दोन- दोन पृष्ठांच्या आटोपशीर नाट्यछटांतून विविध जीवनरंग दाखविले आहेत. डॉ. श्रीकांत पाटील यांची लेखनशैली अतिशय संवादी असल्यामुळे सर्वच नाट्यछटा परिणामकारक झाल्या आहेत. नाट्यछटांची शीर्षके मोठी बोलकी आहेत. प्रमाणभाषेची पर्वा न करता लेखकाने वारणा खोऱ्यातील बोलीभाषेचा मोकळेपणाने वापर केल्यामुळे ह्या लेखनात एक प्रकारचा जिवंतपणा आला आहे. त्यातील एखादी नाट्यछटा पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केल्यास दिवाकरांच्या नाट्यछटेची परंपरा पुढे चालू राहील.
डॉ. पाटील यांनी संतवचने आणि कवितेच्या ओळींचा श्रुतयोजन म्हणून चपखल वापर केला आहे. पात्रांच्या तोंडी, ‘चोर सोडून संन्याशाला फाशी, लोकां सांगे ब्रह्मज्ञान। आपण कोरडे पाषाण, उधळलं घोडं गेलं दरीत, अति तिथं माती, गोगलगाय अन् पोटात पाय, हसतील त्याचे दात दिसतील, खेळखंडोबा अन् नाच बिरोबा, एकादशी अन् दुप्पट खाशी अशा म्हणींचा आणि लोकोक्तींचा वापर केल्यामुळे जनजीवनातील रसरशीतपणा ह्या लेखनात उतरला आहे. ह्या नाट्यछटा वाचनीय तर आहेतच, शिवाय प्रयोगक्षम आहेत. बालरंगभूमीला आणि शालेय रंगभूमीला ह्या नाट्यछटा उपयुक्त ठरतील, असा विश्वास वाटतो.
पुस्तकाचे नाव – बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा
लेखक – डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पृष्ठे – ६४ किंमत – १५० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.