🌹 दबलेली गोष्ट
प्रत्येक शाळेत काही मुले नेहमी पुढे दिसतात, तर काही मुले शांतपणे मागेच राहतात. त्यांच्या मनातही अनेक गोष्टी, विचार आणि स्वप्ने दडलेली असतात; पण संधीच्या अभावामुळे ती कधी व्यक्त होत नाहीत. एका प्राथमिक शाळेतील परिपाठाच्या निमित्ताने मात्र अशाच एका लाजऱ्या विद्यार्थ्याच्या मनात पाच वर्षे दडलेली गोष्ट अखेर बाहेर आली—आणि शिक्षकांनाही विचार करायला भाग पाडून गेली.✍️ डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर
(लेखक, गायक, शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी)
९४२०३५३४५२
परिपाठ हा शालेय शिक्षणातील खरंतर नित्याचा उपक्रम. परिपाठानेच प्राथमिक, माध्यमिक शाळेतील प्रत्येक दिवसाची सुरुवात होते. विविध बाबींनी समृद्ध ठरणारा असा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरतो. विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यासाठी हा एक प्राथमिक मंचच म्हणता येईल.
गोष्ट अलीकडचीच. एका प्राथमिक शाळेत घडलेली. माळी मॅडम बदली होऊन नव्यानेच शाळेत रुजू झालेल्या होत्या. त्यांच्याकडे इयत्ता पाचवीचा वर्ग अध्यापनासाठी आलेला होता. सर्व मुलांची त्यांनी ओळख करून घेतली. प्रत्येक मूल वेगळे होते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील मुलांचा समावेश त्यांच्या वर्गात होता. चार दिवस त्यांनी शाळेचा परिपाठ पाहिला. आज परिपाठ सादरीकरणासाठी त्यांच्या पाचवीच्या वर्गाची जबाबदारी होती. त्यांनी परिपाठासाठी वेगळेच पाऊल उचलण्याचे मनोमन ठरवले. कुणाला न कळता त्यांनी परिपाठाची एक योजना आखली आणि त्याप्रमाणे परिपाठाचे नियोजन केले. मुलामुलींना जबाबदाऱ्या आणि भूमिका वाटून दिल्या.
इयत्ता पाचवीच्या वर्गातील मुलांनी परिपाठ सादर केला. परिपाठ यथातथाच सुरू होता. परिपाठातील मुलांचा आत्मविश्वास कमी दिसत होता. सादरीकरणही तुटक-तुटक झाले. मुलांच्यावर दडपण येतंय, हे स्पष्ट दिसत होतं. माळी मॅडम मुलांच्या सोबत थांबून त्यांना सपोर्ट करत होत्या. आवश्यक तिथे शब्द पुरवत होत्या. त्यांना प्रेरणा देत होत्या.
वर्गातील संकेत बोधकथा सांगायला उभा राहिला. संकेत गोसावी समाजातील गोपाळांचा मुलगा. सुरुवातीला त्याचे डोळे चौफेर भिरभिरले. पाय अस्थिर होऊ लागले. पण काही क्षणात तो स्थिर झाला. निश्चलपणाने आणि आत्मविश्वासाने तो कथा सांगू लागला…
मित्रहो, माझ्या कथेचे नाव आहे, ‘मूर्खांच्या नादी लागू नका’. कथा अशी आहे- एकदा हत्ती आणि गाढव या दोघांमध्ये गवताच्या रंगावरून वाद निर्माण झाला. हत्ती म्हणत होता की गवत हिरवे असते. गवताचा रंग हिरवा असतो. तर गाढवाचे काही भलतेच! तो ठासून ठासून सांगू लागला, गवत काही हिरवे नसते, ते असते निळे. हत्ती हरप्रकारे समजावून सांगू लागला. पण हत्तीचे मानेल ते गाढव कसले? गाढव आपला हेका काही सोडत नव्हते. गवताच्या निळ्या रंगावर ते ठामच राहिले. दोघांचा वाद विकोपाला गेला आणि तो शेवटी सिंहराजाच्या दरबारात आला.
राजाला हत्ती सांगत होता की गवत हिरवे असते; तर गाढव म्हणत होते गवत हिरवे नव्हे, निळे असते. राजाने शांतपणे विचार केला आणि निर्णय दिला, गाढवाचे म्हणणे खरे आहे. त्याने आता जावे. गाढव मोठ्या तोऱ्यात तिथून निघून गेले. हत्ती म्हणाला, महाराज, आपणासही ठाऊक आहे, गवत हिरवे असते. मग निकाल गाढवाच्या बाजूने का बरे दिला ?
राजा हसून म्हणाला, मित्रा, मूर्खाच्या नादी लागून वाद घालण्यात वेळ घालवू नये. त्याला असेच सोडून द्यावे. जेव्हा त्याला खरे समजेल तेव्हा तो शहाणा होईल.
हत्तीला ही गोष्ट पटली आणि तो सज्जनांच्या संगतीत वेळ घालवू लागला…
संकेत सांगत असलेली बोधकथा शिक्षकांसह मुले-मुली शांतपणे मन लावून ऐकत होती. संकेतच्या सांगण्यामध्ये एक प्रकारची तळमळ होती. त्याच्या आतमधील साचलेपण जणू काही बाहेर पडत आहे, असेच वाटत होते. गोष्ट संपली. परिपाठ संपला. मुलांनी परिपाठाचे समीक्षण केले. परिपाठातील अन्य बाबींमध्ये त्रुटी असल्या तरी सर्वांनी संकेतच्या गोष्टीचे कौतुक केले. शिक्षकांनीही संकेतचेच अधिक कौतुक केले.
शेवटी माळी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “विद्यार्थी मित्रहो आणि शिक्षक बंधू-भगिनींनो, आज माझ्या पाचवीच्या वर्गातील मुलांनी परिपाठ सादर केला. तो अडखळत झाला, हे मी जरूर मान्य करते. परंतु मी आज ठरवले होते की, आजच्या परिपाठातील मुले ही वेगळी असतील. मी माहिती घेतली होती की नेहमी परिपाठात कोण सहभागी असते आणि कोण नाही. जी कधीच सहभागी झाली नाहीत, अशीच मुले आजच्या परिपाठात होती. त्यामुळे भले त्यांचे सादरीकरण कच्चे झाले असले, तरी त्यांनी आज मंचावरून सहभाग घेतला हीच गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. आणि हो, संकेतबद्दल सांगायलाच हवे.
संकेतचे आपण सगळ्यांनी कौतुक केले. परंतु जी गोष्ट त्याने सांगितली ना, ती त्याने इयत्ता पहिलीत असताना त्याच्या मॅडमकडून ऐकलेली आहे. ही गोष्ट आपणास परिपाठात सांगायला मिळावी, यासाठी संकेत अक्षरशः वाट पाहत होता. त्याच्या लाजऱ्याबुजऱ्या स्वभावाने त्याला कधी परिपाठात सहभागी होता आले नाही, किंबहुना त्याला संधी मिळाली नाही. गेली पाच वर्षे त्याच्या आतील दबलेली गोष्ट त्याने आज मनापासून व्यक्त केली. याचा आनंद संकेतइतकाच मलाही होतोय. आपल्या शाळेत अशा दबलेल्या अनेक गोष्टी असणार आहेत. त्यांना मोकळे होण्यासाठी तर आपला हा परिपाठाचा मंच आहे ना ?”
माळी मॅडम बोलत होत्या. सारे शिक्षक अंतर्मुख होऊन आपापल्या वर्गातील अशी मुले शोधत होते.
ही गोष्ट एका शाळेचीच नाही. आपलं घर, आपली शाळा, आपला परिसर, समाजातील अनेक माणसांमध्ये अशा दबलेल्या गोष्टी असतातच. त्यांना मुक्तपणे अभिव्यक्त होण्यासाठी आपणच काहीतरी करायला हवे, होय ना !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

सुनेत्रावहिनींसमोर आव्हानांचे डोंगर …