सध्या नरसाळा महोत्सवानिमित्त नरसाळा किल्ला चर्चेत आहे. पण शासनाकडून, प्रशासनाकडून आणि अभ्यासकांकडून त्याबद्दल चुकीची माहिती प्रस्तुत केली जात आहे. ह्याबद्दल अकोला जिल्ह्याची लेक म्हणून मला खंत वाटते आहे. मी इतिहासाची नसले तरी भाषेची अभ्यासक आहे. आणि प्राकृत भाषा संस्कृतच्या आधीची असून, प्राकृतवर संस्कार करून संस्कृत तयार करण्यात आली आहे हे माझे ठाम मत आहे.
डॉ. प्रतिमा इंगोले
विमलगड, मु. पो. दानापूर, ता. तेल्हारा, जि. अकोला, ४४४१०८
मो. ९८५०११७९६९
ह्या मतासाठी मी बहुतांशी प्राचीन ग्रंथ अभ्यासले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’. हा ग्रंथ महाराष्ट्राची निर्मिती होण्याच्या पूर्वीचा आहे. तेव्हा नागपूरला विश्वविद्यालय अस्तित्वात होते आणि या विश्वविद्यालयातर्फे महादेव हरी वाठोडकर व्याख्यानमाला आयोजित केली जात होती. ह्या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प १९५६ साली विदर्भातील श्रेष्ठ व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. वा. वि. मिराशी यांनी गुंफले होते. त्याचा पुढे नागपूर विश्वविद्यालयानी १९५७ मध्ये ग्रंथ प्रकाशित केला. तोच हा ग्रंथ ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’. नरनाळा किल्ल्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावरूनच मी नरनाळा किल्ला ‘वाकाटककालीन’ आहे हे त्रिवार सिद्ध करते आहे.
आतापर्यंत मी हे तीनदा सांगून झाले आहे. माझ्या ‘उजाड अभयारण्य’ ह्या पुस्तकात मी प्रथम ह्या संदर्भाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यानंतर दानापूरला ‘आठवे बोली साहित्य संमेलन’ संपन्न झाले. तेव्हा माझ्या प्रास्ताविकात आवर्जून व स्पष्ट उल्लेख केला आहे. आणि आता परवा ता. ९ व १० फेब्रुवारीला आकोटमध्ये ‘नरनाळा ग्रंथमहोत्सवात’ अध्यक्ष स्थानावरून मुद्दाम नरनाळा वाकाटककालीन आहे. अती प्राक्प्राचीन आहे आणि म्हणूनच ते अकोला जिल्ह्याचे महत्त्वाचे वैभव आहे, याचा उल्लेख केला आहे. तरी शासनाने वा प्रशासनाने वा अभ्यासकांनी वा ‘नवश्या’ लेख लिहिणाऱ्या लेखकांनी त्याची दखल घेतली नाही. यावरून आपली महत्त्वाची ‘धरोहर’ आपल्याला सांभाळता येत नाही आणि त्याबद्दल यथायोग्य माहिती संकलित करण्याचीही आपण काळजी घेत नाही, हे सिद्ध होते. आता मी ही माहिती मला खंत वाटते आहे म्हणून उद्धृत करते आहे. नाहीतर शासनाने आपलेच घोडे पुढे दामटले असते. नरनाळा किल्ल्यात ‘घोडे’ शब्दच फार महत्त्वाचा आहे. ते आपण पुढे पाहणार आहोतच.
वाकाटक राजे विदर्भाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे व भूषणावह होते. त्यांचा कार्यकाल साधारण इ. स. २१५ ते ४९० पर्यंत मानला जातो. वाकाटक राजे दानशूर आणि साहित्यप्रेमी होते. त्यांनी अनेक देवालये बांधली. अनेक ठिकाणी दानधर्म केला. विशेष म्हणजे त्यांच्या काळात वैदभी-रिती जन्माला आली. अनेक काव्याची निर्मिती झाली. महत्त्वाचे म्हणजे कालिदासाचे ‘शाकुंतल’ हे काव्य अजरामर झाले. कवी कालिदास हा वाकाटक राणी प्रभावती गुप्त हिचा प्रधान होता. वाकाटकांच्या दोन शाखा अस्तित्वात होत्या. एक नंदीवर्धन व दुसरी वत्सगुल्म. तर या नंदीवर्धनाची राणी प्रभावती गुप्त आपल्या पुत्रासह ह्या नरनाळ्याला आली होती.
इतिहासातील महत्त्वाचे व विश्वसनीय पुरावे म्हणजे ‘शीलालेख’ व ‘ताम्रपट’. तर ह्या प्रभावती गुप्तचे व तिच्या पुत्राचे अनेक ताम्रपट उपलब्ध आहेत. त्यात पुणे येथील ताम्रपट व ऋद्धपूर येथील ताम्रपट आहेतच पण तिचा तिरोडी येथील ताम्रपट नरनाळा किल्ल्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. या ताम्रपटात, चक्क नरनाळा किल्ला व वारीचा उल्लेख आहे. भाषेचा शोध घेता घेता जेव्हा मला हा शोध लागला तेव्हा माझ्या अंगातून वीज चमकून गेली. मी तीनताड उडाले. माझे आयुष्य दहा वर्षांनी वाढले.
हा ताम्रपट मध्यप्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यातील करंगी गावाच्या आग्नेयेस आठ मैलांवर तिरोडी गावी मँगोनीज खाणीजवळ सापडला. या खाणीचे व्यवस्थापक श्री. टी. ए. वेलस्टेड यांनी तो मिराशींकडे प्रकाशनार्थ पाठविला. तो मिराशींनी प्रथम एपिग्राफिया इंडिया पु. २१ मध्ये १६७ पृ. क्र. मध्ये ठशांसह व इंग्रजी भाषांतरासह प्रसिद्ध केला. या पुस्तकात त्या ताम्रपटाचे तेच ठसे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हा ‘ताम्रपट’ अकोला जिल्ह्यातील ‘वारी’ ह्या स्थानावरून दिला आहे. पण एवढ्या मोठ्या ऐतिहासिक सुवर्णाक्षरांनी लिहाव्या लागणाऱ्या घटनेचा येथील प्रशासनास मागमूसही नाही. एवढेच नाही तर ह्याच परिसरात १९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची आणि भूमिगत झालेल्यांची नोंद प्रशासनाजवळ नाही. माझे आजोबा श्यामराव कुकाजी ढाकरे भूमिगत होते. त्यांनी कोकरूच्या जंगलातील भूमिगतांना जेवण पुरविले हे मी गत तीन वर्षांपासून शासनाला ओरडून सांगते पण शासन दखल घेत नाही. तत्पूव त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने माझ्या आईने शासन दरबारी खेटे घातले पण उपयोग झाला नाही. कारण शासनाच्या कोणत्याही कमिट्यांवर (समित्यांवर) लग्ग्याचे तट्टू असतात. ते मन मानेल तसे कारभार करतात. मी माझे कर्तव्य केले म्हणणारे मग अंधारात राहतात.
तर अकोला जिल्ह्यातील ‘वारी’ ह्या तीर्थक्षेत्री हा ताम्रपट वाकाटक नृपति दुसऱ्या प्रवरसेनानी दिला याचा स्पष्ट उल्लेख या ताम्रपटात आहे. तेव्हा ह्या ताम्रपटात स्पष्टपणे नरनाळा किल्ल्याचा उल्लेख आहे. आणि शासन म्हणतेय नरनाळा किल्ला आठव्या शतकात निर्माण केला गेला, याला काय म्हणावे? जिथे वाकाटकांची कारकिर्दच पाचव्या शतकापर्यंतची आहे. म्हणजेच शासन अपुऱ्या माहितीवर शिक्कामोर्तब करते आणि खऱ्या माहितीवर कानाडोळा करते. जंगल सत्याग्रहाबाबतही हेच घडले आहे. आम्ही सांगतो तेव्हा शासन हलते. आज माझ्याकडे ताम्रपटासाखा भक्कम पुरावा आहे म्हणून मी बोल लावते आहे. म्हणजेच शासनाची नरनाळा किल्ल्याबद्दलची माहिती फुसकी व निराधार आहे.
प्रस्तुत दानपत्राचा काळ हा द्वितीय प्रवरसेनाच्या तेविसाव्या शासनवष माघ कृष्ण द्वादशी असा दिला आहे. या प्रवरसेनाचे बरेचसे ताम्रपट राजधानीवरून दिले होते. पण हा ताम्रपट ‘नरत्रंङ्गवारि’ स्थानावरून दिला आहे. हे त्या काळातील पवित्र तीर्थस्थान होते. माघ महिना फार पवित्र असून त्या महिन्यात एखाद्या तीर्थक्षेत्री स्थान केल्यास विशेष पुण्य मिळते असे पुराणात म्हटले आहे. पूर्णिमान्त माघाच्या कृष्ण पक्षातील एकादशीला ‘षट्तिला एकादशी’ म्हणतात. या दिवशीच्या उपोषणाचे माहात्म्य पद्मपुराणात वर्णिले आहे. तेव्हा द्वितीय प्रवरसेन आपल्या मातेसह प्रभावती गुप्तसह षट्तिला एकादशीला स्थान करण्यास ‘नरतङ्गवारि’ स्थानाला आलेला आहे. एकादशीला उपोषण करून दुसऱ्या दिवशी पारण्याला राजाने हा ताम्रपट दिला. हे दान त्याने इतर ऐश्वर्यासह मातेच्या पुण्योपार्जनाकरिता दिले आहे. ह्यामध्ये पित्याचा उल्लेख नाही, मातेचा आहे. याचा अर्थ राणी ‘नरनाळा किल्ला’ व ‘वारी’ दोन्ही ठिकाणी आली होती. ह्यापूर्वी चार वर्षांआधी तिने ऋंध्दपूर ताम्रपट दिला होता. याचाच अर्थ प्रभावती गुप्ता राणी तेव्हा जिवंत होती. आणि अकोला जिल्ह्यातील ‘वारी’ तीर्थक्षेत्री आली होती.
द्वितीय प्रवरसेनाचा कार्यकाल इ. स. ४२० ते ४५० असा आहे. तेव्हा तो या कार्यकालात ‘नरतंगगिरीवारीला’ आला असावा. आपल्या तेविसाव्या शासन वर्ष म्हणजेच साधारण इ. स. च्या पाचव्या शतकात ‘वारी’ आणि ‘नरनाळा’ किल्ला दोन्ही अस्तित्वात होते. म्हणजेच तत्पूर्वी ह्या किल्ल्याची निर्मिती विदर्भातील राज्यकर्त्यांकडून झाली होती. अर्थातच इतिहास तज्ज्ञ हा किल्ला कोणी बांधला हे सांगू शकतील. पण आताच्या लेखांतून जे सांगतात मोगलांनी बांधला ते धादांत चुकीचे आहे. तसेच ‘नरनाळा’ ह्या किल्ल्याच्या नावाविषयी चुकीच्या आख्यायिका अस्तित्वात आहेत. राजपूत राजा नरनाळसिंग याच्या नावावरून ‘नरनाळा’ नाव आले नसून ते ‘नवतंगगिरी’ पासून आले आहे. जे वाकाटकांच्या ताम्रपटात आहे.
‘नर’ शब्दाचा कोशगत अर्थ – मनुष्य, सर्व जातीचे पुरुष, घोडा, अर्जुन, एक प्रकारचा खिळा असे आहेत. तर ‘तंग’ शब्दाचा कोशगत अर्थ – खोगीर आवळण्याची वादी, घट्ट, गच्च असे आहेत. तर गिरी शब्दाचा अर्थ पर्वत, डोंगर, गोसाव्यातला एक पंथ असे आहेत. तर वारिराशी शब्दाचा कोशगत अर्थ समुद्र असा आहे. तर वारी शब्दाचा कोशगत अर्थ पाळी, खेप, यात्रा, गती, देवाच्या नावावर मागितलेली भिक्षा, जागा असे आहेत. यावरून असे अनुमान काढता येते की ज्या गिरीवर अथवा डोंगरावर चढताना तंग म्हणजे खोगीराची वादी गच्च बांधावी लागते. नर म्हणजेच घोड्याला अथवा मनुष्याला गच्च बांधून बसावे लागते असा गिरी म्हणजेच ‘नरतंगगिरी’ पुढे ‘तंग’ शब्द अवघड वाटल्यावरून त्याचा समानार्थी शब्द ‘नाळा’ आला. ‘नाडा’ शब्दाचे वऱ्हाडी रूप ‘नाळा’! एवढे मात्र नक्की की पूर्वीचा ‘नरतंगगिरी’ आताचा हा ‘नरनाळा किल्ला’ आहे. तसेच ‘वारि’ शब्दाचे वारि म्हणजे समुद्र तर ‘वारीला’ पूर्वी पाणीच पाणी होते. आत्ताही वाणधरणामुळे पाणीच पाणी आहे. किंवा ‘वारी’ दीर्घ ‘री’ काढला तर स्थान या अथ ते क्षेत्र होते. पुण्यक्षेत्र म्हणूया.
पण सर्वांत महत्त्वाचे विदर्भातील आद्य इतिहास तज्ज्ञ यांनी आपल्या ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’ या ग्रंथात ‘नरनाळा किल्ला’ म्हणजे नरतंगगिरी याचा निर्वाळा दिला आहे. ते स्पष्टपणे म्हणतात, ‘नरतंगगिरीवारि’ हे जोडनाव आहे. त्याचा अर्थ नरतंगा जवळचे वारि असा असावा. हे ‘वारि’ अकोला जिल्ह्याच्या आकोट तहसिलातील बाण नदीवरील सध्या उजाड असलेले वारि गाव असावे, याला ‘भैरवगड’ असेही म्हणतात. व हे अद्यापि पुण्यक्षेत्र म्हणून गणले जाते. नरतङ्ग हे वारि गावापासून पश्चिमेस अठरा मैलांवरचे ‘नरनाळा’ असावे. तेथे एक जुना किल्ला आहे, असे ते लिहितात. वाण नदीचे पूवचे नाव बाणगंगाच होते नंतर ‘वाणनदी’ झाले.
माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक श्यामराव कुकाजी ढाकरे यांचा जन्म १९०४ सालचा. ते आपल्या बालपणीची गोष्ट सांगताना सांगत होते की, त्यांना लहानपणी कुत्रे चावले होते. म्हणजे साधारणतः १९१४ पर्यंत म्हणूया. तेव्हा त्यांना ‘नरनाळा’ किल्ल्यावर नेले होते. तेव्हा वारीपासून नरनाळ्यापर्यंत रस्ता होता. आणि किल्ल्यावर खंडोबाचे मंदिर होते. तेथूनच ‘धारगडलाही’ जाता येत होते. अर्थातच आत्ता खंडोबाचे मंदिर आहे अथवा नाही किंवा ते प्रतिबंधित भागात आहे, हे सांगता येत नाही. उलट आता ‘सक्कर’ तलावाच्या पाण्यातच कुत्रा चावल्याचा दोष नाहिसा होतो असे समजतात. ते काहीही असो, ‘नरनाळा किल्ला’ पाचव्या शतकात अस्तित्वात होता. नंतर तो कोण्या कोण्या राजांच्या ताब्यात गेला असावा. पण त्याच्यावर अष्टकमळ आहेत त्यावरून त्याची निर्मिती ही मोगलांच्या पूर्वीची असावी.
थोडक्यात ‘नरनाळा किल्ल्याचा’ संपूर्ण इतिहास नव्याने शोधण्याची आवश्यकता आहे. ते जर अकोला जिल्ह्याचे वैभव असेल तर त्याचा ठाम इतिहास ठाऊक असणे गरजेचे आहे. ‘नरनाळा किल्ला’ हा पूर्वीचा ‘नरतंगगिरी’ आहे हे तर वा. वि. मिराशी यांनी सांगितलेच आहे. त्याच्या पृष्टीसाठी हा लेख लिहिला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
