राहुरी – महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे “फुले कृषी तंत्रज्ञान घरो घरी, समृद्धी येईल गावो गावी” या ब्रीदवाक्याखाली “फुले कृषी महोत्सव २०२६ – थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषी प्रदर्शन” या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मंगळवारी ( ता. १८ ) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात, राहुरी येथे होणार आहे. या महोत्सवाची संकल्पना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची आहे.
या महोत्सवाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) व आत्मा – अहिल्यानगर यांच्यावतीने करण्यात आले आहे. यासोबतच उमेद अभियान (जि. प. अहिल्यानगर), महाबीज, नाबार्ड, पाणी फाउंडेशन तसेच अन्य सहकारी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात होणार असून, यानंतर विद्यापीठ परिसरात विविध पिकांची थेट प्रात्यक्षिके, शिवार फेरी आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत भाजीपाला सुधार प्रकल्प, ज्वारी सुधार प्रकल्प आणि कडधान्य सुधार प्रकल्प यांची विशेष मांडणी करण्यात आली आहे.
महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये :
सुमारे १०० एकर क्षेत्रावर विविध पिकांची थेट प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. यामध्ये ज्वारीचे १६ सुधारित वाण, कडधान्य, तेलबिया व तृणधान्य पिकांचे २७ वाण, तसेच भाजीपाला पिकांचे ३१ वाण प्रत्यक्ष पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय भरडधान्ये, फळपिके व चारापिकांची प्रात्यक्षिके आणि आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक हेही या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवाचा मुख्य उद्देश :
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, सुधारित वाण व नवे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि कृषी क्षेत्रातील नवकल्पनांचा प्रभावी प्रसार करणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधू-भगिनी, कृषी विस्तार कार्यकर्ते तसेच कृषी क्षेत्रातील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
