विशेष आर्थिक लेख
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी म्हणजे 8 मार्च रोजी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी मैदानावर झाला. या स्पर्धेत सूर्य कुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अजिंक्यपद मिळवत विश्वविक्रम नोंदवला. मात्र त्याचवेळी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेने केवळ महिनाभराच्या काळात आर्थिक आघाडीवर अनेक असाधारण विश्वविक्रमांची नोंद केली. या आर्थिक उलाढालीचा घेतलेला वेध..
प्रा. नंदकुमार काकिर्डे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) वतीने दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. भारत व श्रीलंका या दोन राष्ट्रांनी यंदा या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद स्वीकारलेले होते. यंदाच्या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी पहिला सामना झाला व 8 मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना भारत व न्यूझीलंड यांच्यात झाला. भारताने अनेक उच्चांक प्रस्थापित करत अजिंक्यपद मिळवले व न्यूझीलंडचा मोठा पराभव केला.
एका बाजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करताना अनेक गोष्टी बारकाईने सांभाळाव्या लागतात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे पंच, उत्तम मैदाने, अशा विविध यंत्रणा नेमण्याची, त्यांनी कार्यक्षमपणे काम करण्याची गरज असते. त्यात कोणतीही हयगय चालत नाही. या विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण वीस देशांचे संघ सहभागी झाले होते. त्यात प्रत्येकी पाच संघांचे चार प्राथमिक गट करण्यात आले. त्यामध्ये बाद पद्धतीने पहिल्या फेरीचे सामने झाले. त्यात विविध संघांनी मिळवलेल्या गुणांनुसार व कामगिरी नुसार आठ संघांमध्ये बाद पद्धतीने उपांत्य पूर्व, उपांत्य व अंतिम सामना झाला. या स्पर्धेदरम्यान 55 सामने झाले. भारतात अहमदाबाद, कोलकत्ता, मुंबई, चेन्नई व दिल्ली या शहरांमध्ये 35 विविध सामने झाले. श्रीलंकेतही तीन शहरांमध्ये एकूण 20 सामने झाले. पाकिस्तानच्या संघाने भारतात येण्यास नकार दिल्याने त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत झाले.
बक्षिसांच्या रकमेत वाढ !
यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2024च्या तुलनेत एकूण बक्षिसाची रक्कम 20 टक्क्यांनी वाढवून 120 कोटी रुपयांवर नेण्यात आलेली होती. यामध्ये विजेत्या संघाला म्हणजे भारताला सर्वाधिक 27.48 कोटी रुपये रक्कम मिळाली. त्याच्या जोडीला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने म्हणजे बीसीसीआयने विश्चचषक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अजिंक्य पद मिळवल्याबद्दल तब्बल 131 कोटी रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा केली आहे.
ही रक्कम संघातील 15 खेळाडू, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांना विभागून देण्यात येणार आहे. अर्थातच यातील मोठा वाटा खेळाडूंना मिळत असतो. 2024 मध्ये भारतीय संघाला अजिंक्यपद मिळवल्याबद्दल 125 कोटी रुपये पारितोषिक देण्यात आले होते. त्यात यावेळी 6 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार प्रत्येक खेळाडूला किमान 6 ते 7 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. त्याशिवाय विविध कंपन्यांनी प्रायोजित केलेल्या रोख रकमा, मोटारी, अन्य आकर्षक किंमती वस्तू वेगळ्या मिळणार आहेत.
त्या खालोखाल न्यूझीलंड या उपविजेत्या संघाला 14.65 कोटी रुपये बक्षीसाची रक्कम हातात मिळाली. त्या खालोखाल उपांत्य सामन्यापर्यंत धडक मारलेल्या दक्षिण आफ्रिका व इंग्लंड या संघांना प्रत्येकी 7.24 कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली. एवढेच नाही तर दोन्ही गटातून निवडण्यात आलेल्या आठ संघांना प्रत्येकी 3.20 कोटी रुपये रक्कम मिळाली तर प्रत्येक गटातील सहभागी संघांना 2.31 कोटी रुपये रक्कम मिळाली.
याशिवाय पुढील दोन महिने चालणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल मध्ये भारतीय संघातील खेळाडूंना बोली लावून विकत घेतले आहे. त्यानुसार प्रत्येक खेळाडूला कोट्यावधी रुपयांमध्ये मोठ्या रकमा मिळणार आहेत. ते त्यांचे स्वतंत्र उत्पन्न राहील. यामध्ये कॅमेरान ग्रीन या खेळाडूला सर्वाधिक 25.20 कोटी रुपये मिळाले होते. डिसेंबर 2025 मध्ये अबुधाबी मध्ये आयपीएलचा लिलाव झाला होता. तेथे एकूण 77 खेळाडूंना लिलावामध्ये बोली लावण्यात आली होती त्यात 29 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. यावेळी एकूण 215.45 कोटी रुपयांची बोली अंतिम झाली होती. आयपीएल संस्था आयसीसी पेक्षाही जास्त श्रीमंत असून त्यांची आर्थिक उलाढाल विश्वचषक स्पर्धेपेक्षाही सर्व निकषांवर जास्त मोठी आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी स्टार स्पोर्ट्स व जिओ हॉटस्टार या कंपन्यांचे जागतिक प्रसारणासाठी प्रमुख प्रायोजकत्व होते. याशिवाय स्काय स्पोर्ट्स, विलो, प्राईम, क्रिक लाइफ, ईएसपीएन, टी एस एम, डायलॉग, आयसीसी टीव्ही, मायको या अन्य प्रायोजक कंपन्यांचा समावेश आहे. या सामन्याचे प्रसारण करणाऱ्या कंपन्यांना दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी तब्बल 50 लाख रुपये मिळत होते. दोन वर्षांपूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत 42 टक्के जास्त रक्कम जाहिरातीसाठी देण्यात आली. विशेषतः भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये दहा सेकंदासाठी तब्बल 30 ते 40 लाख रुपये रक्कम आकारण्यात आली होती.
बाकी अन्य सामन्यांसाठी 15 ते 16 लाख रुपये रक्कम दहा सेकंदासाठी आकारले जात होते. या सामन्यांचे प्रायोजकत्व मिळण्यासाठी कंपन्यांना 90 कोटी रुपये मोजावे लागले. त्याचप्रमाणे डिजिटल प्रायोजकत्वासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम वाढवण्यात येऊन त्यासाठी 140 कोटी रुपये मोजावे लागले. टीव्ही, मोबाईल आणि कनेक्टेड टीव्ही यासाठी प्रायोजकत्व करण्यासाठी 230 कोटी रुपये रक्कम द्यावी लागली होती. यावेळी डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मोठ्या पडद्यांना म्हणजे सीटीव्ही (कनेक्टेड टीव्ही) साठी 600 रुपये सी पी एम म्हणजे (कॉस्ट पर थाउजंड इम्प्रेशन्स) इतका दर होता.2024 मध्ये हा दर 480 रुपये होता. हाच दर हँड हेल्ड/वेब माध्यमासाठी 250 रुपये सीपीएम तर स्पॉट जाहिरातींसाठी 800 रुपये सीपीएम होता.
या सर्व विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण जाहिरातीपोटी जवळजवळ 2 हजार ते 2.5 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यात आला. तसेच हे सामने दूर चित्रवाणीच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 82.1 कोटींच्या घरात अंतिम सामन्याच्या वेळी होती.
एकंदरीत विश्वचषक स्पर्धेचा एकूण महसूल आणि व्यावसायिक वैशिष्ट्ये पाहिली तर १ अब्ज डॉलर्सचा ओलांडणारी आयसीसी ही पहिली क्रिकेट संस्था झाली आहे. म्हणजेच एकूण महसूल 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेला आहे. जिओ स्टारसोबत ३ अब्ज डॉलर्सचा मीडिया हक्कांचा करार प्रसारित केल्याने स्पर्धेच्या उत्पन्नाचा अंदाजे ९० टक्के भाग त्यातून त्यांना मिळाला. भारत – इंग्लंड उपांत्य फेरी दरम्यान जिओ हॉटस्टारने एकाच वेळी स्ट्रीमिंगसह अनेक विक्रम मोडले.
या सामन्यांना प्रत्यक्षात उपस्थित राहून तो बघण्यासाठी भारतातील प्रवेश स्तरावरील किमान तिकीट 100 रुपये तर श्रीलंकेमध्ये एक हजार रुपये इतका होता.
अहमदाबाद येथील अंतिम सामन्यासाठी तिकिटांचा एकूण महसूल अंदाजे १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्यावेळी साधारणपणे 3 हजार रुपयांपासून 50 ते 75 हजार रुपये पर्यंत विविध प्रकारच्या तिकिटांचे दर राहिले होते. अहमदाबाद मधील आयटीसी नर्मदा ताज, स्कायलँड सारख्या लक्झरी हॉटेल्स मध्ये शंभर टक्के खोल्या भरलेल्या होत्या. सामन्याच्या दिवशी रात्रीसाठी खोल्यांचे सरासरी 60 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे भाडे होते. अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यासाठी 86 हजार 824 प्रेक्षक उपस्थित होते अशी अधिकृत नोंद आहे.
या क्रिडांगणाची क्षमता 1 लाख 32 हजार आसनांची आहे. त्यासाठी बुक माय शो या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर क्रिकेट प्रेमींनी केलेला आढळला. भारत व श्रीलंका या दोन्ही यजमान राष्ट्रांच्या एकूण अर्थव्यवस्थेला या स्पर्धांमुळे मोठ्या प्रमाणावर बळकटी लाभली व हे सामने अर्थव्यवस्थेसाठी प्रेरक ठरले. या स्पर्धेच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था, हॉटेल व्यवसाय, व प्रवासी वाहतूक या सर्व क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या 48 हजार पेक्षा जास्त व्यक्तींना अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ रोजगार उपलब्ध झाला. त्याचप्रमाणे या महिन्याभराच्या कालावधीत पर्यटन, हॉटेल व्यवसाय, शीतपेय व अन्य खाद्यपदार्थ व टोप्या, टी-शर्ट यासारख्या उत्पादनांची विक्री प्रचंड झालेली होती.
या काळात देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्राला प्रचंड प्रतिसाद लाभलेला होता. ज्या शहरांमध्ये सामने होत होते तेथील विमानांच्या फेऱ्यांमध्ये 45 ते 55 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. एवढेच नाही तर त्या शहरातील हॉटेल बुकिंग मध्ये या कालावधीत 300 टक्क्यांची वाढ झाल्याची अधिकृत नोंद आहे. भारत व श्रीलंका या दोन्ही देशांना थेट करांमधून सरकारी महसूल ६० ते ९० दशलक्ष डॉलर्स इतका मिळाला आहे. एका दृष्टीने भारताने विश्वचषक जिंकला परंतु या स्पर्धांच्या दरम्यान सर्वात मोठा विजय अर्थव्यवस्थेचा झाला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
भारतातील 35 सामन्यांना सर्वसाधारणपणे एकूण 20 ते 22 लाख प्रेक्षक प्रत्यक्षात उपस्थित होते. सर्व सामन्यांच्या तिकीट विक्री मधून 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झालेली होती. विविध छोट्या मोठ्या हॉटेल्स मधून सर्वसामान्यांच्या शहरांमध्ये आठ ते दहा लाख खोल्यांचे बुकिंग झालेले होते. सर्व विमान कंपन्यांनी या काळात सरासरी 3 ते 4 लाख अतिरिक्त विमानांची तिकिटे विकलेली होती. एका अंदाजानुसार उपस्थित प्रेक्षकांपैकी 15 टक्के जणांनी निळी जर्सी विकत घेतली असे धरले तरी देशभरात तीस लाखाच्या घरात जर्सी विकल्या गेलेल्या होत्या. टोप्या, झेंडे, चेहऱ्यावर लावण्याचे रंग आणि स्मृतिचिन्हे या साऱ्यांची सर्वसाधारण विक्री 400 कोटी रुपयांच्या घरात गेली होती.
अहमदाबाद येथील अंतिम सामन्यासाठी तिकिटांचा एकूण महसूल अंदाजे १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्यावेळी साधारणपणे तीन हजार रुपयांपासून 50 ते 75 हजार रुपये पर्यंत विविध दर्जाच्या तिकिटांचे दर राहिले होते. अहमदाबाद मधीलआयटीसी नर्मदा ताज, स्कायलँड सारख्या लक्झरी हॉटेल्स मध्ये शंभर टक्के खोल्या भरलेल्या होत्या. सामन्याच्या दिवशी रात्रीसाठी खोल्यांचे सरासरी 60 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे भाडे होते. या स्पर्धेतील एक सामना केवळ चार तास म्हणजे 240 मिनिटे चालतो. परंतु या स्पर्धांमुळे निर्माण झालेली आर्थिक लाट सहा ते आठ महिने टिकते.
खेळाबरोबरच मनोरंजन आणि आर्थिक व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत असते वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यातून पर्यटन, व्यापार, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या क्रिकेट संघाचे ब्रॅण्डिंग अत्यंत उत्तमरीत्या होते हे मान्य केले पाहिजे. संध्याकाळच्या वेळी उंच असलेल्या दिव्यांच्या प्रकाशाच्या झोतात 10 हजार कोटी रुपयांच्या बाजारपेठेतील उलाढाल आपल्यासमोर होत राहते. हे सारे आर्थिक गणित खूप मनोरंजक आहे यात शंका नाही.
( प्रस्तुत लेखक पुणेस्थित अर्थविषयक पत्रकार असून माजी बँक तसेच शेअर बाजार संचालक आहेत ).
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
