February 13, 2026
Poet Ajay Kandar and his poetry collection Avanol included in SNDT University BA syllabus
Home » कवी अजय कांडर यांच्या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समावेश
काय चाललयं अवतीभवती

कवी अजय कांडर यांच्या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समावेश

‘आवानओल ‘ काव्यसंग्रहातील ‘झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट’ कवितेचा गौरव

कणकवली – कवी अजय कांडर यांच्या ‘ ‘ या बहुचर्चित काव्यसंग्रहातील ‘झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट ‘ या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी विविध विद्यापीठांच्या अकरा अभ्यासक्रमांमध्ये आणि आणि एका शालेय अभ्यासक्रम कवी अजय कांडर यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

कवी अजय कांडर हे 90 नंतरच्या पिढीतील मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात. ‘आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच, अजूनही जिवंत आहे गांधी ‘ हे त्यांचे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध असून आवानओल हा काव्यसंग्रह 2005 मध्ये प्रसिद्ध झाल्यावर गेल्या वीस वर्षात वेगवेगळ्या कारणाने मराठी कवितेच्या केंद्रस्थानी चर्चिला जात आहे.

यापूर्वी या संग्रहातील अनेक कवितांचा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला. त्यातही या संग्रहातील ‘बाया पाण्याशीच बोलतात ‘ या एका कवितेचा तीन विद्यापीठे आणि एका शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आली आहे. त्याचबरोबर या काव्यसंग्रहातील कवितांचा हिंदी, इंग्रजी, मल्याळम, कानडी, उर्दू आदी भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र फाउंडेशनसह महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आता या संग्रहातील ‘ झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट’ या बहुचर्चित कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने आवानओल काव्यसंग्रह पुन्हा एकदा चर्चेला गेला आहे. कष्टकरी स्त्रीचं भावविष्य आणि तिच्या संघर्षाची तीव्र होत गेलेली धार हे सारे आवानओल मधील कवितेच्या मुळाशी आहे.’ झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट ‘ कविता रूपकात्मक असून वयात आलेल्या मुलीला झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट आई सांगत असते. त्यातून झाड जसं एखाद्या चुकीने वाळत जात तसं एखाद्या चुकीने स्त्रीच आयुष्य पूर्ण उध्वस्त होतं हे सुचित करताना बाईने तटस्थपणे जगण्याचा विचार करायला पाहिजे असा संदेश या कवितेतून दिला गेलेला आहे. त्यामुळेच या कवितेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्यामुळे तिचं महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट

झाडाबरोबरच वाढत जाणाऱ्या मुलीला
आई सांगते
झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट

आता तर
कुणाला आठवतही नाहीत
त्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा
मात्र माणसं
पानगळीची कारणं
चघळतायत पुन्हा, पुन्हा.

चुरगळली इटुकली, पिटुकली पाने
त्यांनीच तोडल्या आहेत त्याच्या फांद्या
आणि घालू पाहतायत घाव आता मुळावरच
वाटेत अडथळा नको म्हणून

मुलगी ऐकते
खुपसून डोळे जमिनीत कुतुहलापोटी
तेव्हा आई सांगतच राहते तिला
निमूट ऐकून घे
शब्द न् शब्द समजून.
आपणही होऊ नये वाटेवर कुणाचा अडथळा
आणि आपल्या अडथळ्यालाही ओलांडून जावं धीरानं
पुढच्या, पुढच्या मार्गाचा काढीत माग अधिक संयमानं

नाहीतर ऐसपैस चालतांना
कोवळ्या वयातच लागेल काटाकुटा झाडाझुडपातच
तुलाही न समजतासवरता
आणि काढावाही लागेल तो
बिनबोभाट कुणालाच थांगपत्ता लागू न देता.

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

वारी एक अनुभव ….

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

प्रगत शेतकरी

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading