June 25, 2025
Cover of the book “BJP Jinklich Kashi?” analyzing BJP’s 2024 Assembly victory by journalist Tulshidas Bhoite
Home » भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न

लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मोठा पराजय पदरी पडलेली महायुती विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा महाविजय कसा मिळवू शकली ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती लोकसभेसाठी राज्यातील ४८ पैकी ४२-४४ जागा जिंकण्याचा दावा करत होती. प्रत्यक्षात त्याच्या निम्म्या जागाही त्यांना जिंकता आल्या नाहीत. महायुतीच्या या ढिसाळ कामगिरीमुळे केंद्रातील भाजपची सगळी गणितेही बिघडून गेली होती. या पार्श्वभूमीवर, अवघ्या पाच महिन्यात आलेल्या विधानसभेसाठी अजिबात गाफील राहायचे नाही, हे ठरवून महायुती कामाला लागली हे तर दिसतच होते, पण म्हणून त्यांच्या पदरात असे, एवढे सुपर घवघवीत यशाचे दान पडेल असे कुणालाच वाटत नव्हते. अगदी या महायुतीच्या नेत्यांना देखील ! मग हा चमत्कार कसा घडला, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय वरिष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांनी, २०२४ – भाजप जिंकलीच कशी? या अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून…

राजीव खांडेकर,
मुख्य संपादक एबीपी न्यूज / एबीपी माझा

समकालीन घडामोडींचे विश्लेषण करण्याची पध्दत आपल्याकडे हळूहळू रुळू लागली आहे. राजकीय किंवा सामाजिक उलथापालथी होत असतानाच त्या विषयाच्या अनुषंगाने सामुग्रीची जमवाजमव करायची आणि नंतर तो समकालीन इतिहास पुस्तक रुपाने लोकांसमोर ठेवायचा, हा आपल्या पत्रकारितेत झालेला मोठा स्वागतार्ह बदल म्हटला पाहिजे. भोईटे यांनी हे पुस्तक सिध्द करताना तर त्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला आहे. घडत असणाऱ्या गोष्टींचे आकलन वाचकांना करून देतानाच त्यांनी विपुल प्रमाणात आकडेवारीही जमा करून त्या आधारे मुद्द्यांचे विश्लेषण केले आहे. अशा प्रयत्नांचे मोल चिरकाल टिकणारे असते.

या पुस्तकाचे वेगळेपण काय ?

सध्या माध्यमांवर टीका होते ती एकांगी भूमिकेसाठी. त्यातही माध्यमांकडून केलं जाणारं राजकीय विश्लेषण political analysis हे बऱ्याचदा विश्लेषण कमी आणि त्यांच्या इच्छेनुसार केलेलं मतप्रदर्शन wishful thinking जास्त असतं, असंही म्हटलं जातं. त्यामुळे पत्रकारांच्या मन आणि मेंदूत जे राजकीय विचार त्यानुसार ते मत मांडतात. त्यालाच त्यांचं राजकीय विश्लेषण म्हणावं, असा आग्रह असतो. पण या पुस्तकात राजकीय विचार बाजूला ठेऊन तथ्याधारित विश्लेषण केलेलं आहे. कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारांना पूज्य अथवा त्याज्य मानण्याऐवजी भोईटे यांनी वास्तवाशी इमान राखत लेखन केलेलं आहे.

महायुतीने लाडकी बहीण आणि अन्य लाभार्थी योजनांच्या माध्यमातून जसं मतदारांकडून मतांचा लाभ मिळवला, तसाच लाभ धार्मिक ध्रुविकरणातून पण मिळवला गेला. मुसलमानांकडून मविआला जिंकवण्यासाठी व्होट जिहाद केला जात आहे. त्यामुळेच लोकसभेला आपला पराजय झाला. आपला पराजय झाला, पण मविआचा विजय झाला नाही, तर मविआच्या मुस्लिम अनुनयामुळे हिंदूंची मतं जास्त असूनही हिंदुत्ववादी उमेदवार पडला हा मुद्दा भाजपानं प्रभावीपणे वापरला. लाडकी बहीण योजनेएवढाचा वाटा व्होट जिहादसारख्या मुद्द्यांचाही आहे, असे भोईटे यांचे निरीक्षण आहे.

एकीकडे मविआविरोधात आक्रमकतेनं नॅरेटिव्हची पेरणी करतानाच दुसरीकडे भाजपाने छोट्या छोट्या जाती, समूह यांना महायुतीशी जोडण्यात आले. त्यासाठी भुपेंद्र यादव यांच्यासारखे निवडणुकीचे चाणक्य तब्बल तीन महिने मुंबईत तळ ठोकून होते. राजकीयदृष्ट्या नगण्य वाटू शकतील अशा असंख्य जातीच्या शेकडो लोकांना ते रोज भेटत होते आणि थेंबे थेंबे तळ साचे, या म्हणीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते. या सगळ्याचा फायदा अर्थातच महायुतीला मोठ्या प्रमाणात झाला.

निवडणुकीच्या काळात लाभार्थी योजनांमधून मतदारांवर लाभाचा पाऊस पाडला गेला. तसंही जर लक्षपूर्वक पाहिलं तर गेल्या काही निवडणुकांपासून लाभार्थी योजनांचं एक वेगळं राजकारण मतदारांना आकर्षून घेताना दिसतं. या निवडणुकीत तर अशा योजनांना ऊत आला होता. केवळ लाडकी बहीण नाही तर इतरही अनेक लाभार्थी योजना एकाचवेळी अंमलात आणल्या गेल्या. तसंच आधीच्या काहींचे लाभ वाढवले गेले. त्याचाही परिणाम मतदारांची मतं मविआकडे वळण्यात झाला असेल. हे सारं त्या योजनांची माहिती देत मांडलं आहे.

विधानसभा निवडणूक ही लाडकी बहीण केंद्रीत होती, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मात्र त्या योजनेमुळे महिला मतदान कसं वाढलं, कसं ते महायुतीकडे वळलं, एवढंच न देता राज्यातील मतदारांची आर्थिक वर्गवारी दाखवत ते आमिष कसं मतांतर घडवणारं हे दिसत होतं, तेही मांडलेलं आहे.

भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची या निवडणुकीतील भूमिका कशी महत्वाची ठरली याचा शोध घेतानाच योगी आदित्यनाथाच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा महाराष्ट्रातील निवडणुकीवर कसा परिणाम झाला, या घोषणेमुळे महायुतीचे अनेक उमेदवारही निवडणूक काळात धास्तावले होते, पण प्रत्यक्षामध्ये या घोषणेमुळे त्यांचे तारू कसे किनाऱ्याला लागले हे भोईटे यांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि रा. स्व. संघाचे संबंध तितकेसे मधूर नव्हते आणि ते तसे होण्याला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघाविषयी केलेल्या काही वक्तव्याला जबाबदार मानले गेले होते. पण लोकसभेवेळची तटस्थता बाजूला सारत संघ स्वयंसेवक विधानसभेच्या प्रचारात उतरला होता. नरेटिव्ह पेरण्यापासून नरेटिव्ह खोडण्यापर्यंत अनेक पातळ्यांवर संघाची यंत्रणा नेटाने काम करत होती. संघाने मतदार नोंदणी, मतदानासाठी मतदार बाहेर काढण्यापासून अनेक कामांमध्ये जोर लावला. ही निवडणूक भाजपपेक्षाही संघाची निवडणूक म्हणून ओळखली गेली तर नवल वाटायला नको, असे भोईटे यांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीतील महाविजयामुळे मविआच्या नेत्यांमध्ये अतिआत्मविश्वासाचा शिरकाव झाला होता. विधानसभा लढवण्यापेक्षा राज्यात सत्ता स्थापण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. धडपणाने जागावाटप होत नसताना काही फाजील नेते खातेवाटपाच्या तयारीला लागले होते. मुख्यमंत्री होण्यासाठी अनेकजण गुढग्याला बाशिंग बांधून बसले होते. या मंडळींसमोर हरियाणाचा अनुभव ताजा होता. अतिआतमविश्वासाने हाती येणारी हरियाणाची सत्ता काँग्रेसला गमवावी लागली होती. पण मविआ नेते त्यातून धडा शिकले नाहीत. त्यामुळे कसा फटका बसला. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याला म्हणून महत्व देणारी मविआ विधानसभेला त्या भूमिकेपासून ढळली. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे शिंदे आणि फडणवीस यांच्यापेक्षाही लोकप्रियतेत पुढे होते, मविआ सरकारचे काम हे मराठी मतदारांना सर्वेक्षणातून महायुतीपेक्षा सरस असल्याचे दिसत होते. पण काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडू लागली होती. त्यातून त्यांनी महाविकास आघाडीच्या ऐक्याला कसा सुरूंग लावला, याची सुरस मांडणी भोईटे यांनी केली आहे..

विधानसभेचे निकाल लागून आता सहा महिने झाले तरी महाविकास आघाडीचे नेते पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीयेत. आपण काय करायला हवे होते आणि आपण काय केले, ज्यामुळे सत्तेच्या सोपानापासून आपण दूर राहिलो, हे त्यांना मनापासून जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी भोईटे यांचे पुस्तक वाचले पाहिजे. सगळे प्रतिकूल असताना आपल्या नेत्यांनी अभूतपूर्व ऐक्याचे प्रदर्शन करत, कल्पकतेने डाव कसा पालटवला हे जाणून घेण्यासाठी आणि त्याहीपेक्षा निवडणुका तोंडावर आल्या असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ज्या घोडचुका केल्या त्या कशा टाळायला हव्यात हे जाणून घेण्यासाठी महायुतीच्या समर्थकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. सत्तेच्या या झुंजीत प्रत्यक्ष सहभागी न होता, कडेला उभे राहून अभ्यासपूर्ण रीतीने त्याची चिकित्सा करणाऱ्या किंवा फक्त गंमत म्हणून निवडणुकीकडे पाहणाऱ्या सर्वसामान्यांनीही हे पुस्तक वाचले पाहिजे, कारण यातूनच त्यांना कळणार आहे, २०२४ च्या महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती नेमकी जिंकली कशी !

पुस्तकाचे नाव – २०२४ ः भाजपा जिंकलीच कशी ?
लेखक – तुळशीदास भोईटे
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन
किंमत – २५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9004949656


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading