March 27, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Excessive mobile phone use causing digital addiction and health problems among youth
Home » भ्रमणध्वनीचा अतिवापर : वाढता धोका !
मुक्त संवाद

भ्रमणध्वनीचा अतिवापर : वाढता धोका !

स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व काही घरबसल्या मिळू लागले. वयोवृद्ध, अपंग व आजारी व्यक्तींना ऑनलाईन सेवांचा मोठा फायदा झाला. नोकरीच्या मुलाखती, कार्यालयीन कामे, घरून काम (वर्क फ्रॉम होम) यामुळे विशेषतः महिलांना दिलासा मिळाला. त्यामुळे मोबाईल हा वरदानच वाटू लागला. मात्र कोणत्याही तंत्रज्ञानाला दोन बाजू असतात – फायदे आणि तोटे.

सौ. सरीता पाटील (पंडित)
वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे

भ्रमणध्वनीचा (मोबाईल) इतिहास पाहिला, तर १९९५ मध्ये पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी नोकियाच्या हँडसेटवरून केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना केलेला पहिला सार्वजनिक कॉल हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. त्यानंतर अतिशय अल्प काळात भ्रमणध्वनी क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली.

सुरुवातीला बटनाचे मोबाईल अस्तित्वात होते. १९९५ मध्ये बीपीएल मोबाईल आणि मॅक्सटच (वोडाफोन) यांनी प्रथमच व्यापारी नेटवर्क बाजारात आणले. त्या काळात मोबाईल ही केवळ उद्योगपती व श्रीमंत वर्गापुरतीच मर्यादित असलेली, महागडी पण अत्यंत आवश्यक वस्तू होती. नव्वदच्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबांना घरी लँडलाईन मिळवण्यासाठीही महिनोन्‌महिने प्रतीक्षा करावी लागत असे. घरी फोन बसणे म्हणजे घरातील प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असायचा. रिंग वाजली की ‘हॅलो’ म्हणतानाही उत्साह ओसंडून वाहायचा. त्या काळात महानगरांमध्ये एमटीएनएल तर ग्रामीण भागात बीएसएनएल या दोनच सरकारी कंपन्या दूरसंचार सेवा पुरवत होत्या.

२००४ मध्ये नोकिया कंपनीने ‘नोकिया ७७१०’ हा भारतातील पहिला खरा टचस्क्रीन स्मार्टफोन सादर केला. त्यानंतर ब्लॅकबेरी, अँड्रॉइड, अॅपल, सॅमसंग तसेच अनेक चिनी ब्रँड्स बाजारात आले आणि स्मार्टफोन क्षेत्रात चुरशीची स्पर्धा सुरू झाली. सुरुवातीला मोबाईलच्या किमती जास्त असल्याने तो केवळ कमावत्या व्यक्तीकडेच असायचा. मात्र २००३ मध्ये रिलायन्सने केवळ ५०१ रुपयांपासून उपलब्ध असलेले ‘रिलायन्स इंडिया मोबाईल’ सादर करून दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवली. २००७ मध्ये ७७७ व ८८८ रुपयांचे हँडसेट आणून ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ ही घोषणा प्रत्यक्षात उतरवली. यामुळे ‘हर मुठ्ठी में मोबाईल’ हे स्वप्न साकार झाले.

स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व काही घरबसल्या मिळू लागले. वयोवृद्ध, अपंग व आजारी व्यक्तींना ऑनलाईन सेवांचा मोठा फायदा झाला. नोकरीच्या मुलाखती, कार्यालयीन कामे, घरून काम (वर्क फ्रॉम होम) यामुळे विशेषतः महिलांना दिलासा मिळाला. त्यामुळे मोबाईल हा वरदानच वाटू लागला. मात्र कोणत्याही तंत्रज्ञानाला दोन बाजू असतात – फायदे आणि तोटे.

जानेवारी २०२० मध्ये कोरोना महामारीने संपूर्ण जग बदलले. शाळा, उद्योगधंदे बंद झाले. प्रत्यक्ष संवाद थांबून सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आणि भारत खऱ्या अर्थाने ‘डिजिटल’ झाला. शिक्षण ऑनलाईन झाल्याने लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन आले. आर्थिक परिस्थिती नसतानाही पालकांना मुलांसाठी मोबाईल घ्यावा लागला. लहान वयातच मुलांना स्मार्टफोनचे व्यसन लागले. ओटीटी प्लॅटफॉर्म, रील्स, शॉर्ट व्हिडीओ, ऑनलाईन गेम्स यामध्ये तरुण पिढी अक्षरशः गुरफटली.

मैदानी खेळ, पुस्तक वाचन, प्रत्यक्ष संवाद, कुटुंबासोबत वेळ घालवणे या सवयी लोप पावू लागल्या. अभ्यासासाठी वापरायचा मोबाईल हळूहळू करमणुकीचे साधन बनला. पाढे पाठ करणे, स्वतः विचार करून लेखन करणे, स्मरणशक्तीचा वापर करणे कमी झाले. ‘सगळं मोबाईलवर मिळतं, मग पाठांतर कशाला?’ असा प्रश्न मुले विचारू लागली. परिणामी सहनशीलता कमी झाली, चिडचिड वाढली, स्थूलता, मधुमेह, लहान वयात चष्मा लागणे यांसारख्या समस्या वाढल्या.

ऑनलाईन गेम्स, आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावरील भ्रामक जाहिराती, अपघात, सेल्फीचे वेड, सायबर गुन्हे, ई-कचरा – या सर्व समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. अलीकडील गाझियाबादमधील घटना, जिथे ऑनलाईन गेम्सच्या नादात तीन मुलींनी आपले प्राण गमावले, ही अत्यंत धक्कादायक आहे. अशा जीवघेण्या खेळांवर सरकारने कडक बंदी घालून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.

आज भ्रमणध्वनी हा अन्न, वस्त्र, निवारा यांच्याइतकाच महत्त्वाचा – किंबहुना चौथा मूलभूत गरज बनला आहे. माणूस काही दिवस अन्नाविना राहू शकतो, पण मोबाईलशिवाय एक दिवसही राहू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे स्मार्टफोनचा अतिवापर तरुण पिढीसाठी शाप ठरत आहे. तंत्रज्ञान वाईट नाही; त्याचा दुरुपयोग व अतिरेक घातक आहे.

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी काही उपयुक्त संकल्प :

  • कार्यालयीन कामानंतर लगेच मोबाईल न वापरता थोडा वेळ चालणे किंवा विश्रांती घ्या.
  • वृत्तपत्र किंवा आवडते पुस्तक वाचा, विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत.
  • आठवड्यातून एक दिवस ‘डिजिटल डिटॉक्स’ घ्या.
  • झोपताना मोबाईल डोक्याजवळ न ठेवता किमान दहा फूट अंतरावर ठेवा.
  • रात्री केवळ अत्यावश्यक फोनच घ्या किंवा फ्लाइट मोड वापरा.
  • स्क्रीन सुरू ठेवून झोपू नका; झोप महत्त्वाची आहे.
  • रात्री चार्जिंगला मोबाईल लावणे टाळा, बंद खोलीत तर अजिबातच नाही.
  • इअरफोन किंवा इअरबड्सचा अतिरेक टाळा.
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनावर ताबा ठेवा. आजची मुले ही उद्याच्या राष्ट्राची संपत्ती आहेत. त्यामुळे मोबाईलचा सुज्ञ, मर्यादित व योग्य वापर हाच सुख, आरोग्य आणि शांततेचा खरा मार्ग आहे.

Related posts

आयआयटी विद्यार्थ्यांची आत्महत्या- चिंतनीय बाब

वर्क-लाइफ बॅलन्स नव्हे, हे तर ‘अटेन्शन मॅनेजमेंट’ !

Neettu Talks : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!