February 27, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Kusumagraj and author Vishwas Patil recalling memories of the Panipat novel on birth anniversary.
Home » कुसुमाग्रज म्हणाले, “ज्या मेजावर ‘पानिपत’ सारखी कादंबरी लिहून झाली, ते मला बघायचे आहे.”
मुक्त संवाद

कुसुमाग्रज म्हणाले, “ज्या मेजावर ‘पानिपत’ सारखी कादंबरी लिहून झाली, ते मला बघायचे आहे.”

मराठी साहित्यातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणजे कुसुमाग्रज. त्यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. काव्य, नाटक, कथा, कादंबरी आणि सामाजिक लेखन या सर्व क्षेत्रांत त्यांनी बहुमोल योगदान दिले. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पानिपतकार विश्वास पाटील यांनी केलेले त्यांचे स्मरण…

मिरजेला एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले, “मला पानिपतकरांना भेटायचे आहे. ती अभिजात कलाकृती ज्या टेबलवर लिहून झाली ते टेबल मला पाहायचे आहे.”
‘पानिपत’ प्रकाशित होऊन वर्ष झाले होते. महाराष्ट्रभर तिचे उत्तम स्वागत सुरू होते. तेव्हा माझे अवघे 29 वयमान. अशा भर तारुण्यात ज्ञानपीठ विजेते तात्यासाहेब घरी येताहेत त्याचा मला केवढा आनंद झाला होता.

नेहमीप्रमाणे तात्यांच्या बरोबर श्री. चुंबळे, श्री. पाटील वगैरे त्यांचे नाशिकचे दहा-पंधरा मित्र होतेच. मला प्रांताधिकारी म्हणून जो बंगला मिळाला होता, त्या ऐतिहासिक बंगल्यात तात्या मोठ्या अपूर्वाईने आले. अडीच तास रमले. माझी छोटी कन्या प्रियदर्शनी आणि पत्नी चंद्रसेना या दोघींसोबत त्यांनी छान गप्पा मारल्या. बंगलाही ऐतिहासिक. काही दशकापूर्वी जेव्हा माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई मिरजेचे प्रांत अधिकारी म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांचाही मुक्काम याच बंगल्यात होता.

कुसुमाग्रजांच्या कवितेने विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला वेडे केले होते. विशेषत: त्यांचे “मराठी माती” आणि “विशाखा” हे संग्रह तर जवळपास जिभेवर होते. त्यांच्या कोलंबसाच्या जबरदस्त कवितेने —
“लोटले तारू परताया मागे
असे का आपुला बाणा
त्यापरी जळी समाधी घेऊ सुखे
कशासाठी जपावे पराभूत प्राणा —
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला.”

तात्यासाहेबांना ज्ञानपीठ मिळण्यापूर्वी ते नाशिकमध्ये एका भाड्याच्या घरात राहत. त्या घरी मी विद्यार्थीदशेतच अनेक वेळा त्यांना जाऊन भेटलो होतो. तेव्हा फारशी गर्दी नसायची. ज्ञानपीठ मिळाल्यावर मात्र तात्यांच्या घराला एखाद्या गजबजलेल्या मठाचे स्वरूप आले होते.
खरे तर तात्यांना स्वतः पानिपतच्या रणसंग्रामावर कादंबरी लिहायची होती. त्यासाठी त्यांनी टिपण्याही तयार केल्या होत्या. पण ते झाले नाही. त्यामुळे माझी कादंबरी वाचल्यावर त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी कादंबरीचे अतिशय समृद्ध अशा शब्दात रसग्रहण करणारे चार पानी पत्र मला पाठवले. त्यामुळे मी आणि माझे प्रकाशक राजहंसचे दिलीप माजगावकर यांना खूप आनंद झाला.

नाशिकवरून पुढे कुठे जाताना आणि येताना तात्यांकडे थांबायचे हा माझा कायमचा शिरस्ता बनला होता. मग तात्यांशी होणाऱ्या संवादामध्ये रविकिरण मंडळाच्या कवितांपासून त्यांनी इंग्लंडमध्ये पाहिलेल्या बेकेटच्या प्रयोगापर्यंत अनेक विषयावर गप्पाटप्पा रंगायच्या. त्या मैफिलीतून उठताना एखाद्या युगाचेच दर्शन घडल्याचा आनंद मिळायचा.

तात्यांच्या “पृथ्वीचे प्रेमगीत”, “स्तंभ तिथे ना कोणी बांधला”, “अहिनकुल” आणि “स्वप्नांची समाप्ती” अशा कविता ह्या माझ्या खूप आवडत्या. तात्या जेव्हा मुंबईत एका वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करत होते, तेव्हा रात्री उशिरा टेलीप्रिंटरवर ब्रह्मदेशामध्ये तुरुंगवास भोगणाऱ्या अनेक भारतीय क्रांतिकारकांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला हे वृत्त कळताच त्यांनी त्याच रात्री त्यांची ती अजरामर कविता शब्दबद्ध केली —

“कशास आई भिजविशी डोळे
उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल
सरणावरती आज आमची पेटताच प्रेते
उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते
श्रृंखला तव पायामधल्या खळा खळा तुटणार
आई खळा खळा तुटणार
गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार!”

जेव्हा माझ्या “पानिपत” या कादंबरीवरील “पानिपतचे रणांगण” हे नाटक रंगभूमीवर येऊ घातले होते, त्याच्या मुंबईत तालमी सुरू होत्या. तेव्हा निर्माते मोहन वाघ काका यांनी त्या नाटकासाठी तात्यासाहेबांकडून गाणी लिहून घ्यायचे ठरवले. ती कल्पना तात्यांनी तात्काळ मान्य केली.
पुढे नाटकाच्या तालमी रवींद्र नाट्य मंदिरात सुरू झाल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे नाटकाचे दिग्दर्शन करत होते. एके दिवशी दुपारी नाशिकहून दैनिक सकाळचे संपादक उत्तम कांबळे यांचा फोन आला. तात्यांची प्रकृती कमालीची क्षीण झाली आहे. त्यांनी करूण शब्दात आम्हाला निरोप पाठवला होता की, “आता थकलो आहे. माफ करा, मनात असूनही तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ‘पानिपत’ साठी काव्यरचना आता होणे नाही. तुम्हाला खूप आशीर्वाद.” त्यानंतर पंधरा-वीस दिवसातच तात्या हे जग सोडून गेले.

कुसुमाग्रजांच्या निधनाची बातमी कळताच मी मोहनकाका आणि वामन तात्यांच्या अंतदर्शनासाठी नाशिकला मोटारीने निघालो. पण तोवर दहन पार पडले होते. हातामध्ये फुलांचे हार आणि डोळ्यांमधून वाहणारे अश्रू अशा स्थितीत आम्ही स्मशानातून माघारा परतत होतो. तेव्हा माझ्या ओठावर लोककवी मनमोहन यांच्या ओळी आपसुक अवतरल्या होत्या —
“शव हे कवीचे जाळू नका हो
जन्मभर तो जळतच होता.
फुले तयावर उधळू नका हो
जन्मभर तो फुलतच होता.”


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ

विश्वच ब्रह्मज्ञानी करण्याचे माऊलीचे स्वप्न

युनिफाईड पेन्शन स्कीम”( युपीएस)- यशस्वी संतुलित तडजोड !

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading