महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या तीन वर्षांत दुप्पटीने वाढली
मुंबई – पर्यटन मंत्रालय देशातील विविध पर्यटन उत्पादने आणि ठिकाणांचा प्रचार करण्यासाठी जागतिक पर्यटन बाजारपेठेत भारताचा एक परीपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून प्रचार प्रसार करत आहे. विविध आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार विषयक प्रदर्शने, मेळावे आणि कार्यक्रमांमधील सहभाग, परदेशी पर्यटन नियोजक, प्रसारमाध्यमे आणि इन्फ्लूएन्सरसाठी सहलींचे (एफएएम) आयोजन, पर्यटन रोड-शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचे आयोजन, स्थानिक पर्यटन नियोजक आणि या उद्योग क्षेत्रातील इतर संबंधित भागधारकांसोबतचा संवाद तसेच समाज माध्यमांवरील प्रसिद्धी अशा विविध मार्गांना हा प्रचार प्रसार केला जातो. हे सर्व उपक्रम भारतीय दूतावास, संबंधित उद्योग आणि महाराष्ट्र सरकारसह इतर राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या सहकार्याने राबवले जातात.
याव्यतिरिक्त, देशातील पर्यटन विषयक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मंत्रालयाद्वारे, आपल्या स्वदेश दर्शन (एसडी), स्वदेश दर्शन 2.0 (एसडी 2.0), स्वदेश दर्शन 2.0 ची उपयोजना असलेली आव्हानांवर आधारीत स्थळांचा विकास (सीबीडीडी) ही स्पर्धा, राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य (एसएएससीआय) आणि प्रसाद (PRASHAD – Pilgrimage Rejuvenation and Spiritual Heritage Augmentation Drive) या योजनांच्या माध्यमातून संबंधित राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सल्लामसलतीने त्यांना आर्थिक मदत पुरवत आली आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राला भेट दिलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या अशी :
(दशलक्षमध्ये)
| 2022 | 2023 | 2024 |
| 1.512 | 3.388 | 3.705 |
2024 मध्ये भारताला भेट दिलेल्या एकूण विदेशी पर्यटकांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजेच 17.69 टक्के इतका होता. देशातील पर्यटनाचा विकास आणि प्रसिद्धीशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकारसह इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन विभागांसोबत नियमितपणे सल्लामसलत बैठक घेत आली आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
