दोडामार्ग येथील 92 वर्षाचे वाचक एस. के. गवस यांना प्रभा प्रकाशनाकडून शंभर पुस्तके भेट
साहित्यिक संजय तांबे, मधुकर मातोंडकर, हरिश्चंद्र भिसे यांची उपस्थिती
कणकवली – प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे दोडामार्ग – शिरवल येथील 92 वर्षाचे वयोवृद्ध वाचक एस.के.गवस यांना ग्रंथ वाचनाची आवड. मात्र वयामुळे त्यांना बाहेर जाऊन ग्रंथ खरेदी करणे शक्य नाही आणि त्यांना घरी सोबत करण्यासाठीही कोणी नसल्यामुळे प्रभा प्रकाशनातर्फे त्यांना शंभर ग्रंथ त्यांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले. यावेळी प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर, प्रसिद्ध साहित्यिक संजय तांबे, मधुकर मातोंडकर आणि कवी हरिचंद्र भिसे आदी उपस्थित होते.
साहित्यिक संजय तांबे यांचा तमसोमा ज्योतिर्गमयम हा किरात साप्ताहिक मध्ये प्रसिद्ध झालेला लेख एस के गवस यांच्या वाचनात आला. त्या लेखाच्या खाली तांबे यांचा संपर्क नंबर होता. त्या नंबरवर गवस यांनी तांबे यांच्याशी संपर्क करून वाचनाची खूप आवड असून वयामुळे बाहेर जाऊन पुस्तके खरेदी करणे शक्य नाही तसेच घरी पुस्तके आणून देणारीही कोण व्यक्ती नाही अशी खंत व्यक्त केली. ही माहिती प्रभा प्रकाशनाचे संचालक अजय कांडर यांना तांबे यांनी देताच प्रभा प्रकाशनतर्फे 100 पुस्तके गवस यांना वाचनासाठी त्यांच्या घरी भेट देऊन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संजय तांबे आणि हरिचंद्र भिसे यांनीही आपली प्रकाशित झालेली पुस्तके गवस यांना भेट दिली.
गवस हे मुंबई येथे पीएसआय म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते गावी दोडामार्ग शिरवल येथे आले. मात्र मुळातच वाचनाची आवड असणाऱ्या गवस यांची गावी वाचनाची उपेक्षा झाली. वयामुळे ते बाहेर जाऊ शकत नव्हते आणि बाहेरून पुस्तके आणून देणारीही व्यक्ती त्यांना कोण सापडत नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रभा प्रकाशनाने त्यांना दिलेली पुस्तकांची भेट महत्त्वाची मानली जात असून याबद्दल श्री गवस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
