पुसद ( जि. यवतमाळ) : हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी २८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृतिमानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याची पुसदच्या वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानची परंपरा आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागातून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करुन विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख (बायोडाटा) पाठवावा. त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनामध्ये) किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला, याची सविस्तर माहिती द्यावी.
यावर्षी कृषी शास्त्रज्ञांकरिता ‘उसाचे उत्पादन वाढण्याकरिता केलेल्या विशेष संशोधन कार्याबद्दल’ हा विषय निवडला आहे. ज्यांनी उसाचे उत्पादन वाढीकरिता विशेष संशोधनात्मक कार्य केलेले आहे, अशाच शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख (बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावा. शेतकऱ्यांना सोशल माध्यमांव्दारे नियमित कृषीविषयक मार्गदर्शनाबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांना नियमीत ( फेसबुक युट्यूब, इंस्टाग्राम) या सोशल माध्यमाव्दारे कृषीविषयक मार्गदर्शन करणाऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. कृषी संबंधित विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी, उत्पादक कंपनी, बचत गट व सामूहिक शेती करणाऱ्यांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पाठवावा. आपले प्रस्ताव दोन पासपोर्ट फोटोसह ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रव्यवहाराचा पत्ता –
अध्यक्ष, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान,
पुसद श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर,
पुसद ४४५२०४, जि. यवतमाळ
