March 12, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Walug Marathi short story collection depicting agricultural and pastoral culture of Kolhapur
Home » वालुग : कृषी – पशुपालक संस्कृतीचा जिवंत आलेख
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वालुग : कृषी – पशुपालक संस्कृतीचा जिवंत आलेख

वालुग या प्रस्तुत कथासंग्रह मध्ये त्यांच्या १० कथा समाविष्ट केलेल्या आहेत. या संग्रहातील बऱ्याच कथा व्यक्तिचित्रणात्मक अशा आहेत. काळा सुरा, हजारे मास्तर, टाचरी सुंदरा, हजामत कथेतील गोविंदा, सावज कथेतील नामा या कथांमध्ये कथा नायकांचे चित्रणच लेखकाने ताकतीने केले आहे. ग्रामीण भागातील तानेबाणे, भाऊबंदकी आणि वृत्ती प्रवृत्तींचे चित्रण या कथांमध्ये येते. यापैकी वालुग ही शीर्षक कथा शिवाण्णा सारख्या नायकाची ढोल वाजण्याच्या कलेकडे झुकणारी तगमग व्यक्त करते.

प्रा. डॉ. गोमटेश पाटील, जयसिंगपूर

नवकथेनंतर मराठी कथा साहित्यात अनेक प्रवाह निर्माण झाले. 1980 नंतर मराठी कथेमध्ये अमुलाग्र बदल झाले. पारंपारिक साहित्य प्रवाहांबरोबरच अनेक प्रायोगिक कथांचा जन्म ८० नंतरच्या कथेमध्ये झाला. मराठी कथेमध्ये अनेक नवी तंत्रे आणि नवे प्रयोग केले गेले. कथेच्या निवेदनाच्या अनेक पद्धती आणि प्रकार मराठी कथेने अंगीकारले. नागरकथा आणि ग्रामीण कथा यातील सीमारेषा पुसट झाल्या. तरीही मराठी कथा साहित्यामध्ये जिला पूर्वपरंपरेने ग्रामीण म्हटले जात होते ती कथा वेगळ्या अंगाने अविष्कृत होऊ लागली. जिचा संबंध कृषीसंस्कृतीशी घट्ट राहिला होता. कृषी संस्कृती आणि तेथील परिसर पर्यावरणाचे चित्रण मराठी कथेमध्ये करणारे काही लेखक सातत्याने २१ व्या शतकातही दिसून येतात. भास्कर चंदनशिव, राजन गवस, आसाराम लोमटे, सीताराम सावंत, किरण गुरव, कृष्णात खोत अशा नव्या जुन्या पिढीतील लेखकांसह २१व्या शतकातही कृषी संस्कृतीच्या आणि त्यातील बदलाच्या जाणिवा कथाकारांनी अधोरेखित केलेल्या आहेत. रावसाहेब पुजारी हे कोल्हापूर परिसरातील ग्रामीण व कृषिसंस्कृतीशी जोडलेले लेखक आहेत. त्यांचे कथालेखन यापूर्वी विविध नियतकालिकातून प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांची कादंबरीही प्रसिद्ध झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्व भागातील कृषी जाणीवांचा आलेख त्यांनी या कथांमध्ये मांडला आहे.

रावसाहेब पुजारी हे गेली 30 वर्ष ग्रामीण साहित्य चळवळीशी संबंधित असून कृषी संस्कृतीची जपणूक करणारे शेतीप्रगती हे मासिकही त्यांनी चालवले आहे. त्यामुळे कृषी संस्कृतीच्या आणि त्यातील नाते संबंधांच्या बारकाव्यांची समज त्यांना आहे. वालुग या प्रस्तुत कथासंग्रह मध्ये त्यांच्या १० कथा समाविष्ट केलेल्या आहेत. या संग्रहातील बऱ्याच कथा व्यक्तिचित्रणात्मक अशा आहेत. काळा सुरा, हजारे मास्तर, टाचरी सुंदरा, हजामत कथेतील गोविंदा, सावज कथेतील नामा या कथांमध्ये कथा नायकांचे चित्रणच लेखकाने ताकतीने केले आहे. ग्रामीण भागातील तानेबाणे, भाऊबंदकी आणि वृत्ती प्रवृत्तींचे चित्रण या कथांमध्ये येते. यापैकी वालुग ही शीर्षक कथा शिवाण्णा सारख्या नायकाची ढोल वाजण्याच्या कलेकडे झुकणारी तगमग व्यक्त करते. रात्रभर ढोलांचा आवाज ऐकणारा शिवाण्णा आपल्याला वालुग साठी बोलावणे आले नाही म्हणून अस्वस्थ झाला आहे. अस्तंगत होत चाललेली धनगर मेंढपाळ यांची कला-संस्कृती आणि ती पुढच्या पिढीने जोपासावी यासाठी शिवाण्णाची होणारी तगमग या कथेत रावसाहेब पुजारी यांनी मांडलेली आहे.

ग्रामीण कला आणि विद्यांची जोपासना करण्यासाठी धडपडणारी माणसे आता दुर्मिळ होत चाललेली आहेत. कुस्ती हा तर कोल्हापूरचा प्राण आहे. पण कुस्ती सारख्या खेळाकडेही अलीकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यासाठी धडपडणारा आण्णा चिरगुळ्या अशा व्यक्तिमत्वा बरोबरच लाल बिरज्या आणि काळा सुर्या यांच्यातील रंगलेला कुस्तीचा सामना अटीतटीच्या संघर्षातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या कथेमध्ये रावसाहेब पुजारी यांनी केला आहे.

या कथासंग्रहातील पेरक्या दौलती आणि नामा समग्या ही दोन व्यक्तीचित्रे विशेष वाचकांच्या मनावर परिणाम करतात. ग्रामीण भागामध्ये उच्चशिक्षित तरुण सुद्धा व्यसनाच्या आणि मोहाच्या आहारी गेल्यानंतर त्याची होणारी नामुष्कीजनक स्थिती सावज या कथेमध्ये रावसाहेब पुजारी यांनी टिपली आहे. ही कथा ग्रामीण भागातील एक शोकात्मिकाच आहे. आपल्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने गावाचे नाव जगभरात करेल अशी आशा असणारा नाम्या समग्या जोगतिनीच्या नादी लागून आपल्याच गावात चौंडकं हातात घेऊन येतो. एखाद्या चित्रपटाची कथा होईल अशा ताकदीची ही कथा ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थ करते. त्याचबरोबर प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या पेरक्या दौलती सारखा कष्टाळू शेतमजूर नव्या पिढीकडे कारभार आल्यानंतर मालकाचा गमावत चाललेला विश्वास आणि विश्वासू नोकराकडे व्यावसायिकतेने पाहणारा मालक. ही व्यावसायिक दृष्टी जागतिकीकरणानंतर खेडोपाडी झालेली दिसते. आपल्या कामाची अनुबाई कारभाऱ्याला राहिली नसल्यामुळे शेती धंद्याचे बापजाद्यांच्या माघारी भविष्य काय ? या प्रश्नाने खिन्न झालेला दौलती या कथेत पहायला मिळतो.

खाउजा संस्कृती आणि जागतिकीकरणाचे परिणाम हे २१ व्या शतकातील मराठी ग्रामीण कथाकारानी कथेचे मुख्य विषय म्हणून अनेक कथाकारानी अधोरेखित केलेले आहेत. अशा कथांपैकीच हजामत नावाची कथा आहे. ८० च्या दशकानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था जी एकमेकांच्या विश्वासावर आलुत्या बलुत्यावर उभी होती ती उध्वस्त होताना गोविंदा सारख्या बलुतेदाराला आपल्या भविष्याची चिंता वाटते. आपला व्यवसाय आणि आपले जीवन याच्या विषयी त्याला वाटणारी भीती त्याने सुरु केलेल्या रोखीचे व्यवसायाने संपून जाते.

जागतिकीकरणानंतर संक्रमण काळातल्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून गोविंदाकडे या कथेद्वारे पाहता येईल. पेटता डोंगरसारखी कथा ग्रामीण भागातल्या पर्यावरण आणि निसर्गाची जाणीव व्यक्त करणारी कथा आहे. साहित्यातील पर्यावरणीय जाणिव हा आज मध्यवर्ती आलेला विषय रावसाहेब पुजारी यांनी या कथेद्वारे हाताळला आहे. या कथेच्या नायक रामू गावडे आपल्याकडून नकळत लागलेल्या वनव्याचा पश्चाताप करून घेतो. निरपराध झाडे आणि पक्षी, पक्षांची घरटी उध्वस्त झाली म्हणून तो स्वतःला दोषी समजतो. त्याबद्दल गावाने केलेली कोणतीही शिक्षा सहन करण्यास तयार राहतो. आजही ग्रामीण भागामध्ये पर्यावरण विषयीचे आस्था या कथेमध्ये आपणास पाहायला मिळते.

जमिनीचा तुकडा ही पहिलीच कथा कृषी संस्कृतीमध्ये जमिनीच्या तुकडा ही प्रतिष्ठेची बाब आणि आपल्या अस्तित्वाची ओळख असते हे दर्शविते. यासाठी ग्रामीण कृषी संस्कृती मधील जमिनीच्या तुकड्याचे महत्व सांगणारी ही कथा आहे. या कथेमध्ये करारी असणारी म्हातारी आणि तिची चार मुले यांनी अत्यंत कष्टाने जमीन विकत घेण्यासाठी केलेला आटापिटा मांडला आहे. हे मांडताना ग्रामीण भागातील ताणेबाणे राजकारण आणि जातीय मानसिकतेचे रूपही मांडले गेले आहे. मेंढपाळाच्या व्यवसायापेक्षा कृषी व्यवसाय हा प्रतिष्ठेचा आहे हेही यातून अधोरेखित होते. त्याचवेळी एकाच जातीचे लोक त्यांची स्वार्थी मानसिकता आणि त्याच वेळा त्याच जातीची उदात्त मदतीची मानसिकताही या कथेत अधोरेखित होते.

या कथा संग्रहातील पर्यावरण आणि परिसर आपणास ८० च्या दशकामध्ये घेऊन जाते. ऐंशीच्या दशकातील कृषी संस्कृती आणि त्या अनुषंगाने येणारे संदर्भ या कथांमध्ये पाहायला मिळतात. मध्यवर्ती वाडमय धारेमध्ये ही कथा मागच्या पिढीची असली तरी कथेतील पात्रे आणि कथेचे पर्यावरण वेगळा अनुभव देतात. विशेषता वालुग, जमिनीचा तुकडा, हजारे मास्तर, बनग्या अशा कथांमधून मेंढपाळ संस्कृतीचे चित्रण पाहायला मिळते.

कथेची भाषा हेही या कथांचे बलस्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक बोली पाहायला मिळतात. विशेषता कोकणच्या परिसरातील कोल्हापूर आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेले कोल्हापूर तसेच कानडी मुलखाशी सीमा संबंधित असणाऱ्या कोल्हापूरची भाषा अशा विविध भाषांचा प्रत्यय कोल्हापुरी लेखकांच्या लेखनांमध्ये पाहायला मिळतो. या कथांमध्ये येणारी पूर्व कोल्हापूर जिल्ह्यातील भाषा व तिचे वेगळेपण आपणास जाणवते. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामध्ये येणाऱ्या सपाट प्रदेशातील ही भाषा तिच्यावर असणारा कानडी संस्कृतीच्या प्रभाव त्याचवेळी लेखक ज्या समूहाचे प्रतिनिधित्व करतो त्या मेंढपाळ समूहाची एक स्वतंत्र भाषा आणि त्याचा शब्द संग्रह या कथांमध्ये पाहायला मिळतो.

या कथासंग्रहाचा एक स्वतंत्र शब्दसंग्रह तयार करता येईल अशा मराठीतील स्वतंत्र शब्दांची रेलचेल कथेच्या पानापानातून पाहायला मिळते. रावसाहेब पुजारी हे भाषिक आणि लेखन क्षमता असणारे लेखक आहेत. कादंबरी नंतर त्यांनी केलेला हा कथांचा प्रयोग मराठी साहित्य आणि भाषिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. वाचक निश्चितच या कथांचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

कृषी संस्कृतीचा अनमोल दस्तावेज

जागतिकीकरण आणि क्रुर भांडवलीशाहीनंतर सर्वत्र संस्कृतीचे सपाटीकरण आणि एकारलेपण दिसत असताना भाषा, संगीत, संबोधने, परस्पर संबंध आणि व्यवसाय एकमेकाच्या सहाय्याने समर्थपणे टिकून राहतात. मात्र जुन्या रसरशीत, सृजनशील, संस्कृतीचे दस्तऐवज जपण्याची जबाबदारी समाजातील लेखकांची असते. नव्या काळात संपूर्ण पिढी देखू पिढी बनलेली आहे, ती सत्व हारवून बसलेली आहे. रावसाहेब पुजारी यांनी लिहिलेला वालुग हा कथासंग्रह संपत चाललेल्या एकात्मिक पशुपालक आणि कृषी संस्कृतीचा अनमोल दस्तावेज आहे.

भाषा हा संस्कृतीचा आत्मा असतो. भाषेतील संबोधने, परस्पर जिव्हाळा व समाजाची सेंद्रिय वीण स्पष्ट करतात. प्रमाण मराठीपेक्षा वेगळी असलेली भाषा आणि संबोधने या कथासंग्रहाचे बलस्थान आहे. यामध्ये निसर्गाशी एकरुप झालेला ताल वालुगमध्ये प्रकर्षाने जाणवतो. जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी भेटते. या संग्रहात एकूण दहाच कथा आहेत, मात्र प्रत्येक कथा समाजाचा एक कोन दाखविताना दिसते. त्यामुळे कथासंग्रह छोटा असला तरी वाडःमयीन आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने या संग्रहाचे मोल खूप मोठे आहे.

प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पोवारीचा घाट मालवी तर थाट नागपूरी

समकाळाचे भान जपणारी कलानगरीची कविता

भांडी sss यो sss…!

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading