स्टेटलाइन –
अजितदादांनी भाजपाच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढताच, भाजपने त्यांना सत्तर हजार कोटीची फाईल बंद झालेली नाही, असा इशारा दिला. पुणे व पिंपरी चिंचवडमधे भाजपाने प्रचारासाठी नेते व कार्यकर्त्यांची फौज उतरवली होती मग अजितदादांच्या मदतीसाठी पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते का फिरकले नाहीत ? सत्तेतील सहकारी नेत्यांना भाजपाशी पंगा घ्यायचा नव्हता, हेच त्याचे कारण होते. मराठवाड्यातील अजितदादांच्या पक्षातील एका नेत्याचे, लवकरच भाजपात असे स्टेटस होते. म्हणूनच अजितदादांच्या मृत्युनंतर विलिनीकरणाची चर्चा तूर्ततरी बंद झाली आहे.
सुकृत खांडेकर
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आणि वरळी येथील एनएससीआय डोममधे सर्व पक्षीय सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ते कर्तृत्ववान, शिस्तप्रिय होतेच पण मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असलेली संपूर्ण क्षमता, दृढनिश्चय व प्रामाणिकता होती. त्यांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला असता, मात्र ते आता आपल्यामधे नाहीत… अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांविषयी भावना व्यक्त केल्या. विधिमंडळात सर्व पक्षाच्या नेत्यांची अजितदादांना श्रध्दांजली अर्पण करणारी भाषणे झाली. शब्दाला जागणारे दादा, कठोर पण दिलखुलास, कठीण काळातही संयमी दादा, अनेक भाऊ येतील पण दादा मात्र एकच, लाखोंचा पोशिंदा, महाराष्ट्राला न मिळालेला सर्वोत्तम मुख्यमंत्री, शब्दाचा, वेळेचा नि कामाचा पक्का, लोकाभिमुख, प्रशानावर पकड असलेला, राजकारणापलिकडे मैत्री जपणारा , महाराष्ट्राचा आधारवड अशा शब्दात अनेकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, आदिती तटकरे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, रोहित पवार, भास्कर जाधव, चित्रा वाघ, सुनील प्रभू, अशा अनेकांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली.
भीषण आागीत विमानाचा ब्लॅक बॉक्स जळतोच कसा असा प्रश्न उपस्थित करून कंपनी कोणाची, मालक कोण, पैसे कुणाचे, विमानाची क्षमता किती होती, किती तास उड्डाण झाले, डीजीसीए कुणाच्या दबावाखाली काम करते काय, कोणत्या पक्षाच्या अधिपत्याखाली कंपनी काम करते अशा प्रश्नांचा भडिमार जितेंद्र आव्हाड यांनी केला. रोहित पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख जादूगार म्हणून केला. एक मराठी माणूस व अजितदादांचा पुतण्या म्हणून सत्य बाहेर येईपर्यंत लढणार, असा त्यांनी निर्धार बोलून दाखवला.
अजितदादा हे किती उत्तुंग व्यक्तिमत्व होते व त्यांची लोकप्रियता किती अफाट होती हे त्यांच्या अंत्ययात्रेला लोटलेल्या लाखोंच्या गर्दीवरून सर्व महाराष्ट्राने पाहिले. मग अजित पवार हे महाभ्रष्टाचारी नेते आहेत, सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे ते खलनायक आहेत, आम्ही सत्तेवर आल्यावर त्यांना जेलमधे पाठवू, असा महाभयंकर आरोप करणारा प्रचार भाजपने २०१४ च्या निवडणुकीत का केला ? देशाचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे जाहीरपणे आरोप करून त्यांची बदनामी का केली ? भाजप सत्तेवर आल्यावर त्या आरोपांचे काय झाले ? ज्यांच्यावर आरोप केले त्यांना जनतेने भरघोस विक्रमी मतांनी निवडणुकीत कसे निवडून दिले ? निवडणूक प्रचारात व नंतर ज्यांची भ्रष्टचारी म्हणून बदनामी केली त्यांनाच सत्तेत सहभागी कसे करून घेतले ? ज्यांना सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे व्हिलन ठरवले त्यांच्याकडेच राज्याचे अर्थमंत्रीपद कसे देण्यात आले ? या प्रश्नांची उत्तरे अजितदादांच्या मृत्युनंतरही मिळाली नाहीत. अजितदादांवरील आरोप सरकारने खोटे वा चुकीचे असल्याचे आजवर कधी म्हटले नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या मृत्युनंतरही ते आरोप मागे घेत असल्याचे सरकारने जाहीरही केले नाही.
भाजप सोबत येण्यापुर्वी झालेल्या निवडणुकीत अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपचा विरोधक होता. पण राजकीय विरोधकांवर कोणत्या थराला जाऊन आरोप करायचे, याची लक्ष्मणरेषा निवडणूक प्रचारात पाळली गेली नाही. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले- सत्तर हजार कोटीच्या आरोपाने अजित पवार कधी खचले नाहीत. दुसरा कोणी असता तर खचून जीव दिला असता. अजितदादांनी आपल्या कामातून त्या आरोपांना उत्तर दिले. म्हणूनच ज्यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांनीच त्यांना सत्तेत सहकारी म्हणून स्वीकारले… राजकारण्यांना जीव नकोसा होईल, एवढे कुणावर आरोप करू नका, असे आवाहन ठाकरेंनी या निमित्ताने केले. निवडणूक प्रचारात एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना मर्यादांचे भान सर्वच राजकीय पक्षांनी ठेवले पाहिजे, एवढा बोध जरी सर्वांनी घेतला तरी ती अजितदादांना श्रध्दांजली ठरेल.
उद्धव ठाकरे व अजित पवार हे एकाच सरकारमधे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील याची कोणी कल्पनाही केली नव्हती. दोघांची विचारसरणी भिन्न आहे. पण देवेंद्र फडणवीस व अजित पवार या जोडीचा २०१९ च्या निकालानंतरचा पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर महाआघाडीचे सरकार स्थापन झाले व उध्दव ठाकरे व अजितदादांचा त्याच राज्यपालांसमोर शपथविधी झाला. अडिच वर्षांनी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाआघाडी सरकार कोसळले व भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. नंतर स्वत: अजितदादांनी बंडाचा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेसमधे फडकवल्यावर ते भाजपसोबत आले. अगोदर एकनाथ शिंदे व नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. ठाकरे, शिंदे किंवा फडणवीस यांची विचारसरणी भिन्न असतानाही अजितदादांनी त्यांच्याबरोबर विश्वासाने व प्रामाणिपणे काम केले. त्यांचा कधी विश्वासघात केला नाही. महायुतीत काम करताना त्यांनी आपली ओळख व आपला अजेडा त्यांनी स्वतंत्र ठेवला. कटेंगे तो बटेंगे या मोहीमेशी ते कधीच सहमत झाले नाहीत.
समाजात मोठे स्थान असलेल्या एका मान्यवराची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्यात म्हटले आहे, सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी केले होते, त्याचे काय झाले ? गावातील सर्व मते मी सांगतो त्या उमेदवाराला मिळाली नाहीत तर या गावाला पाण्याचा थेंब मिळणार नाही, अशी धमकी दिली होती, त्याचे पुढे काय झाले ? एका आयपीएस अधिकाऱ्याला जाहीरपणे त्यांनी झापले होते, पुढे काय घडले ? औंधच्या महाराजांच्या अपघाताची चौकशी कोणाच्या दबावामुळे झालीच नाही ? लोकांच्या मनात प्रश्न असू शकतात, पण त्याची उत्तरे कधीच पुढे आली नाहीत.
अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी चौदा बैठका झा्ल्या. अजितदादा व जयंत पाटील यांच्यात थेट चर्चा झाली. नंतर शरद पवार यांच्या पक्षाचे अनेक नेते सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. पण अजितदादांबरोबर त्यांच्या पक्षाचे कुणीच कसे नव्हते ? दादांचा सहकारी नेत्यांवर विश्वास नव्हता का ? अजितदादांचे प्रमुख सहकारी २०२९ पूर्वी भाजपात जाण्याच्या विचारात होते का ? प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे नेते अजिदादांना मनापासून साथ देत नव्हते का ? पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणूक अजितदादांनी भाजपाच्या विरोधात जिद्दीने लढवली.
भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपाची शंभर कोटीची भ्रष्टाचाराची एक फाईल त्यांनी उघडही केली. अजितदादांच्या पक्षाचा पुणे व पिंपरी चिंचवडमधे पराभव व्हावा यासाठी भाजपाने सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दादांच्या पक्षाच्या पराभवासाठी पुण्यात तळ ठोकून बसले होते. अजितदादांनी भाजपाच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढताच, भाजपने त्यांना सत्तर हजार कोटीची फाईल बंद झालेली नाही, असा इशारा दिला.
पुणे व पिंपरी चिंचवडमधे भाजपाने प्रचारासाठी नेते व कार्यकर्त्यांची फौज उतरवली होती मग अजितदादांच्या मदतीसाठी पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते का फिरकले नाहीत ? सत्तेतील सहकारी नेत्यांना भाजपाशी पंगा घ्यायचा नव्हता, हेच त्याचे कारण होते. मराठवाड्यातील अजितदादांच्या पक्षातील एका नेत्याचे, लवकरच भाजपात असे स्टेटस होते. म्हणूनच अजितदादांच्या मृत्युनंतर विलिनीकरणाची चर्चा तूर्ततरी बंद झाली आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
