ज्येष्ठ साहित्यिक गजानन यशवंत देसाई यांचा व्यक्तीचित्रणाच्या ललित अंगानं जाणारा दवबिंदू हा कथासंग्रह यशअमृत प्रकाशन गोवा यांनी प्रकाशित केला आहे. मराठी आणि कोकणी भाषा यामध्ये गुण्या-गोविंदानं नांदनं आणि अवनी देसाई यांचं मुखपृष्ठ हे दोन्ही वाचकाला वश करतं. आपलं इवलंपण जपत लेखकाच्या मन ओंजळीत चमकत वसलेली ही मोत्यागत माणसं आपसूक वाचकाच्याही काळीज ओंजळीत बसून मोठी उंची गाठतात. लेखकानं हा कथासंग्रह प्रिय भैयाला समर्पित केला आहे.
रवींद्र शिवाजी गुरव
‘व्हडले आई कशी आसा गे?’
‘हय गे… बरी आसा मगे तू..?’ ‘हय रे बाबा.. असा बरी…आमचे कितें…धा गेले, दोन उल्ले.. बाबा बरे असात मरे…?
‘ हय….’,
तसेच
‘ काय म्हणतात मोमयकरांनो…? बरे आसात न्हू? काय म्हणता तुमचची मोमय? कितके दीस आसात..?’
असे कोकणी भाषेतले शेलके चाकरमानी आणि जिव्हाळ्यातील माणसांसाठीचे काळीज संवाद घेऊन हा संग्रह मिरवतो. विशेष म्हणजे टाळता न येणारे इंग्रजी भाषेचा प्रभाव असलेले इंग्रजी भाषेतील संवाद ही देवनागरीतून मांडले आहेत ते निव्वळ मराठी भाषेच्या प्रेमापोटीच. हा संग्रह बोलीभाषेत गोवा, वाडी-वस्ती रस्त्यावरून म्हणता म्हणता वाचकाला चक्क होडीतून हिंडवून आणतो. यातील एकूण २४ कथेंशी वाचक कधी एकरूप होऊन जातो ते कळतच नाही.
गंमतीने, माटोळी, मुंडली, काटे कणंग, किडूमिडूक, तपेलं, थातूरमातूर, पाडेली, पिडुका वतारी, आवाठा, मोन्या कासुट्या, नांगर चिन्या, कोकण दुधी (लौकी), परस, करमलीचं झाड अशा शब्दसंपदे सोबत ‘पोरांच्या मळणीला ना बी ना भात’ अशी एखादी म्हणही वाचक वावरात पेरतो.
लेकरा बाळांचा सांभाळ करणारी नाती जपणारी… गावकऱ्यांना धीर देणारी… गोमुत्राचे महत्त्व पटवून देणारी… दुसऱ्यांना जीव लावणारी… आपलं म्हणणारी कोठंबीची भटीण आई, कोकण दुधी आणि बोलीभाषा मन:पटलावर कोरणारी गंगु भाजीवाली, माडभर हसणारे बेळगावला हॉस्टेलमध्ये भेटलेले मित्र अमरचे वडील कॅप्टन काका, लेखकाच्या पाच हजारच्या डिमांड ड्राफ्टसह प्लॉटची फाईल हजर करायला लावणारे आय. ए. एस. सूर्यनारायण, नर्मदे हर मधील श्रीराम बाक्रे, करवंटीतून रस्सा मागून पिणारा शंकर ठाकर, चालता बोलता कम्प्युटर रोमिओ, बस मागची धाव काळजात साठवून ठेवावी असा लंगोटीयार अशोक, व्याकरणाची गमतीशीर वाक्ये काळजात खिळ्याने ठोकणारे जीके मणेर सर, दुसऱ्यांची मनं जपणाऱ्या निपाणी जवळील पडलिहाळच्या ताई, लेखकाच्या औदासिन्यात कौतुकाची थाप देऊन उभं करणारे..कठीण प्रसंग शांतपणे सोडवणारे…मशिदीतील अजानला कवितेची उपमा देणारे….माधवराव कामत सर, माणसं सांभाळणारी कोठंबीची टिपिकल व्हडली आई(आजी), सुकलेल्या नारळात गुळाचे खडे टाकून चाकरमानी मुंबईकरांची विचारपूस करत ते दान करणारी बाई, रोजंदारीवर प्रामाणिकपणे काम करीत दोन मुलं उघड्यावर टाकून पक्षाघाताने गेलेला नामदेव, एक रुपयाचं सोनेरी नाणं ओवाळणीत मागणारी… डोळे भरून आणणारी… जोडलेली खंभीर बहीण सुकांती, ५५ वर्षानंतर संस्कृत शिकणारे ब्राह्मणेतर दयानंद भाऊ, नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत सलग १४ तास कीर्तनात रंगणारे उदय बुवा फडके, लेखकाची पिढी घडवणारे दैनिक नवप्रभाचे संपादक सुरेश वाळके, देवदूत होऊन उपचारासाठी रुग्णांच्या घरी धावणारे…. आरोग्य मंत्री पदावर पोहोचलेले धन्वंतरी डॉक्टर सुरेश अमोणकर, हरहुन्नरी कलाकार गजानन नार्वेकर, धालो उत्सवाची आठवण करून देणारी…’फातोडीच्या पारा राया सूर्या माझ्या ध्यानी गे… कपाळाच्या कुंकवासाठी तुळशी घाली पाणी गे…’ असं गीत जिच्या मुखातून सांडायचं ती लोकगीतात रमणारी प्रेमा आई, रक्ताच्या नात्यातील नसूनही जिव्हाळ्याचा झालेला म्हादेव मामा असे सगळे हे दवबिंदू एक एक करून लेखकाच्या मनासोबत वाचकाच्याही मनात मोती होऊन चमकणारं घर करून राहतात.
आकर्षक मुखपृष्ठ, मजबूत बांधणी आणि मराठी कोकणी भाषेचा साज ल्यालेला हा व्यक्तिचित्रणात्मक ललित कथासंग्रह आवर्जून वाचावा. प्रत्येक वाचक मनानं या आणि अशाच दमदार साहित्यकृतीसाठी लेखकास आपसूक आभाळभर शुभेच्छा द्याव्यात असाच आहे.
पुस्तकाचे नाव – दवबिंदू (कथासंग्रह)
लेखक – गजानन यशवंत देसाई.
प्रकाशक – यशअमृत प्रकाशन, गोवा.
पृष्ठे –१४९
मूल्य – २२०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
