‘हुमणी- पिकांचा घातक शत्रू’ (उन्नी)
सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हुमणी/ उन्नी किडीचे प्रभावी नियंत्रण ‘प्रकाश सापळ्यांनी’ करावे असे आवाहन करण्यात येत आहे. औषध रोगाच्या मुळाशी लावलं म्हणजे रोग लवकर बरा होतो तसंच जर का हुमणी या पिकाच्या घातक शत्रूची आपण उत्पत्तीच थांबवली तर मग प्रादुर्भाव आपोआपच नाहीसा होईल अन् पिकांचं उत्पादन खात्रीशीर वाढेल.
निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन,
ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर.
9423180393
साधारणता आपल्या परिसरात आपण एक हंगामी ते उसासारख्या द्विवार्षिक पिकांवर आपण जास्त भर देतो. कोणतंही पिक घ्या त्याच्या पेरणी किंवा लागवडीनंतर ऐन मध्यावर उन्हाळी लागल्यासारखं जोमात असलेली रोपं/झाडं उभळायला लागतात तेव्हा आपण म्हणतो, “उन्नी लागली पिकाला!” अचानक एकामागून एक अशी वाळायला लागलेल्या रोपांची/ झाडांची संख्या इतकी होते की आपण हतबल होतो अन् परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. अनेक पिकांच्या बाबतीत ही उन्नी त्रासदायक असते.
आपलं क्षेत्र कांदा पिकासाठी जास्त म्हणून यासारख्या पिकात लागवड झाल्यानंतर सुरुवातीलाच महिन्याभरात ही कीड अगदी शेजाने कांद्याच्या मुळ्या फस्त करत करत ऐटीत पुढे पुढे जमिनीखाली सरकत असते ! वाफेच्या वाफे जागच्या जागी बसतात ! उसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण ऐन पाण्याच्या टंचाईत केलेली लागवड आणि मग पुढे वाढीच्या अवस्थेत उन्नीने त्याच्या मुळांवर केलेला महाभयंकर हल्ला हे पिकाला खूप मोठं नुकसान पोहोचवतं. भुईमुगाचं सुद्धा तसंच अगदी शेंगा लागायची अन् उन्नीने मूळ खायची वेळ इतकी तंतोतंत जुळते की आपल्याला सगळं पीक हातातून जातं की काय असं वाटू लागतं !
ही कीड फक्त पिकांच्या मुळ्याच खाते असं वाटतं ,“का खात असावी मुळ्या, त्यात कमी पोषक तत्व तरीही का ? असा प्रश्न पडतो. त्या रोपाला अलगद हात लावला तरी चिमटीने उपटताना कोणताही त्रास होत नाही. जोर न लावता रोप जेव्हा जमिनीतून वर येते तेव्हा खरं ‘समूळ नष्ट होणे.’ कशाला म्हणतात ते आपल्याला समजतं.म्हणूनच…..
याच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. जिथं हुमणीच्या / उन्नीच्या संख्यावाढीला सुरुवात होते ती अवस्था म्हणजे प्रजनन. तोच प्रजनन काळ सध्या सुरू आहे. यात का जर आपण चांगला बंदोबस्त करू शकलो तर पुढं जास्तीचा प्रादुर्भाव होणार नाही हे मात्र नक्की. संध्याकाळच्या वेळेला उन्नीच्या नर आणि मादी यांचा मिलन काळ आणि मुक्कामाचं ठिकाण म्हणजे आपल्या घराजवळचं कडू लिंबाचं झाड ! आपण बऱ्याच वेळा लक्षात आलं तरी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला खरी या किडीची प्रादुर्भाव करणारी अवस्था म्हणजे गोलाकार पांढरी अळी म्हणून मे चा शेवट ते जून ची सुरुवात या काळात पूर्ण वाढ झालेला उन्नीचा नर किंवा मादी यांचेकडे आपण कोणतातरी भुंगा आहे या सद्भावनेने बघत असतो आणि तिथेच आपण फसतो. बऱ्याच वेळा आपण “चोर सोडून संन्याशाला का फाशी ?” असं पण म्हणत त्या भुंग्याला आपण जीवदान देत असतो परंतु हाच इकडे तिकडे उडत असलेला संन्याशी भुंगा अळी अवस्थेत चोर बनून आपल्या पिकांना त्रासदायक असतो. हेही तितकेच आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणून येत्या हंगामात जर या हुमणीचा /उन्नीचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे तिच्या नियंत्रणाची !
‘प्रकाश सापळे’ हा हुमणी नियंत्रणाचा अगदी प्रभावी आणि घरच्या घरी करता येण्यासारखा साधा सोपा आणि अत्यंत कमी खर्चाचा उपाय आपण जर राबवला तर निश्चितच येत्या हंगामात आपल्याला नुकसानी पासून स्वतःला वाचवता येईल हे मात्र नक्की. या उपर शेतात जर भविष्यात थोडाफार प्रादुर्भाव झालाच तर मग आपण रासायनिक फवारणीच्या नियंत्रणाकडे जाऊ. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने हुमणी/ उन्नी किडीचे प्रभावी नियंत्रण ‘प्रकाश सापळ्यांनी’ करावे असे आवाहन करण्यात येत आहे. औषध रोगाच्या मुळाशी लावलं म्हणजे रोग लवकर बरा होतो तसंच जर का हुमणी या पिकाच्या घातक शत्रूची आपण उत्पत्तीच थांबवली तर मग प्रादुर्भाव आपोआपच नाहीसा होईल अन् पिकांचं उत्पादन खात्रीशीर वाढेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.